नाशिकचे सुधाकर बडगुजर यांचे संबंध कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी आहेत. त्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत जाहीर केले होते आणि आता त्याच बडगुजरला भाजपाने पायघड्या घालून स्वागत केले. आधी इक्बाल मिर्चीशी संबंधित नेत्याच्या पक्षाला सत्तेत घेऊन मिरची गोड करून घेतली व आता कुत्ताशी सोयरिक केली आहे. आता फक्त दाऊद इब्राहिमलाच भाजपात प्रवेश देणे बाकी आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
काल नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे गटातून हाकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाला भाजपमध्ये मोठा विरोध झाला. तर ठाकरे गटाकडून टीकाही झाली. यानंतर आता बडगुजर यांनी भाजप प्रवेशानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, भारतीय जनता पार्टीच पक्ष नेतृत्व जर बघितलं तर दूरदृष्टी आहे. त्यांच्यात काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा रोख कोणाकडे होता अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या फ्लाईट्स सतत रद्द केली जात आहेत. एअर इंडियाचे गेल्या पाच ते सहा दिवसात तब्बत 66 विमानं रद्द केली आहेत. तर मंगळवारी (ता.17) एका दिवसात 7 विमानं रद्द केलीत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्या. त्यांनी एअर इंडियाला टॅग करत खूप वाईट सेवा असल्याचे म्हटलं आहे.
आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा प्रस्थान करत आहे. पण याचदरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील देहू आळंदी रोडवर वारकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अहिरे गावचे रहिवासी असलेले नारायण गोरावे (वय : 56 वर्ष) या वारकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर देहू आळंदी रोडवर एका क्रेन वाहनाने दिलेल्या धडकेत नारायण गोरावे यांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. मिरज शहरातल्या चर्च जवळ एका सलून दुकानात हा प्रकार घडला असून दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली आहे. यावेळी सलून दुकानाची देखील तोडफोड करण्यात आली आहे.
राजद नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींच्या बिहार दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी, पंतप्रधान मोदी येथे रोजगार देण्यासाठी, गरिबी कमी करण्यासाठी किंवा स्थलांतर थांबवण्यासाठी येत नाहीत. ते शिक्षण, औषध, उत्पन्न, शिक्षण, सिंचन याबद्दल बोलण्यासाठी येत नाहीत. तर पंतप्रधान पुन्हा एकदा लोकांना फसवण्यासाठी येथे येत असल्याचे म्हटलं आहे.
माळेगाव कारखाना निवडणूकीत आम्ही सभासदांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांबरोबर युती केली नाही. युती झाली असती तर साखर धंद्यात निर्भीड व सडेतोड धोरणात्मक निर्णय घेण्यास बंधने आली असती. सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे उमेदवार सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत लोक संपर्कातील आहेत. त्यामुळेच उपमुख्यमंत्र्याना गावोगावी सभा घेत फिरावे लागते, असा खोचक टोला विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता मारला.
डोंबिवलीतील बहिणाबाई उद्यानाच्या परिसरात वाचनालय उभारणीच्या कामावरुन शिवसेना ठाकरे गटाने - शिंदे गटाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता भाजपची देखील शिवसेना शिंदे गटाविरोधात असलेली नाराजी उघड झाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांची समाज माध्यमावरील ही नाराजीची पोस्ट व्हायरल होत आहे. 'मतलबी आणि स्वार्थी मित्रपक्षाचा जाहीर निषेध करतो', असे उघड उघड त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटल्याने डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
सांगलीत आगामी स्थानिकच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायाला मिळत आहेत. काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यांचा आज मुंबईत प्रवेश होणार आहे. पण त्याआधीच मित्र पक्ष राष्ट्रवादीसह भाजपमधील दुसऱ्या फळीतील नाराजी समोर आली आहे. या प्रवेशाला भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.