Congress Sarkarnama
महाराष्ट्र

Congress : बहिणींना पैसे नको, रक्षा हवी! काँग्रेसनं शिंदे, फडणवीसांवर निशाणा साधला

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारची यंत्रणा काय करते, असा प्रश्न विरोधकांकडून केला जात आहे. 'योजना नको, सुरक्षा हवी', असे म्हणू लागलेत. काँग्रेसने या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई आणि नवी मुंबई महिलांसाठी सुरक्षितेचं शहर मानलं जाते. आलीकडच्या काळात मात्र दिल्लीमध्ये निर्भयासारख्या घटना घडू लागल्यात. काँग्रेसने यावरून महायुती सरकारवर टीका सुरू केलीय. काँग्रसने त्यांच्या 'एक्स' खात्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीप्रमाणे नवी मुंबई आणि उरण इथं महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेला काळिमा फासणारी घटना घडली असून, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी, अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करावी.

"राज्याचे मुख्यमंत्री जनतेचाच पैसा, योजनेतून जनतेला वाटून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण सत्य परिस्थिती लपून राहत नाही, असे म्हणत योजना नको, सुरक्षा हवी, महिलांच्या सुरक्षितेची हमी हवी", असे काँग्रेसने त्यांच्या समाज माध्यमांवर पोस्ट शेअर केली आहे. काँग्रेस (Congress) महिलांच्या सुरक्षितेवर आगामी काळात राज्य सरकारविरोधात आक्रमक होणार असल्याचे दिसते. दिल्लीतील घटनेचा संदर्भ देताना, त्यावेळी काँग्रेस सरकारविरोधात भाजपने देशभर रान उठवले होते.

मुंबईतील दोन दुर्दैवी घटना

मुंबईच्या उरणमधील यशश्री शिंदे (वय 22) या युवतीची क्रूरपणे हत्येच्या प्रकरण समोर आले. तत्पूर्वी नवी मुंबईमधील अक्षता म्हात्रे या युवतीची अत्याचारानंतर हत्या झाली होती. या दोघींच्या शरीराची विटंबना झाली आहे. या घटनेमुळे मुंबई हादरली असून, उरणमध्ये या घटनेच्या निषेधार्थ पूर्ण व्यवहार बंद ठेवून आज मोर्चा काढण्यात आला. या युवतींच्या मारेकऱ्यांच्या हत्यारांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी सात पथके रवाना केली आहेत. या मोर्चात महिलांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर राज्य सरकार काम करताना दिसत नसल्याने जोरदार टीका करण्यात आली.

ठाण्यातील घटना

ठाणे जिल्ह्यातील शिळ-डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका धार्मिक स्थळाच्या परिसरात 30 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आली. शिळ-डायघर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत गुन्ह्यात तिघांना अटक केली आहे. ही घटना 9 जुलैला उघडकीस आली. ही युवती घराजवळील धार्मिक स्थळी गेली होती. त्यानंतर ती घरी आलीच नाही. तिचा मृतदेह घरापासून 17 किलोमीटर अंतरावर 9 जुलैला दुर्गम भागात मिळाला. युवती बेपत्ता झाल्याच्या तक्रार पोलिसांना देण्यात आली होती. परंतु त्यांची गंभीर दखल न घेतल्याचा आरोप युवतीच्या नातेवाईकांनी केला आहे.

लाडक्या बहिणी असुरक्षित

युवतींवरील अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी सुरक्षित नाही, असेच चित्र राज्यात उभे राहिलेय. सरकार महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक बळकटीसाठी विविध योजनांच्या घोषणा करत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढ होताना दिसते. 2023 मध्ये एकूण 7 हजार 521 बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT