Pravin Darekar, Ramdas Kadam  Sarkarnama
महाराष्ट्र

Bjp News : फडणवीसांच्या जवळच्या नेत्याच्या तोंडी महायुती तोडण्याची भाषा; म्हणाले, 'भाजपही मनावर दगड ठेवूनच...'

Sachin Waghmare

Mumbai News : महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप-शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या तीन पक्षातील नेत्यांनी एकमेकांना टार्गेट करीत टीका केली आहे. नेतेमंडळीत रंगलेल्या या कलगीतुऱ्याने आता महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या संयमाला दुबळेपणा समजू नका. महायुतीमध्ये भाजपही (Bjp) मनावर दगड ठेवूनच असल्याचे सांगत महायुतीची गरज एकट्या भाजपला नाही, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते असलेल्या आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिला.

गेल्या दोन दिवसांपासून महायुतीमधील भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घ्या, अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. त्यावर लगेचच भाजपकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांच्या यात्रेवेळी भाजपच्या आशा बुचके यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंवर टीका केली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आमदार अमोल मिटकरींनी टीका केली. त्यानंतर संतापलेल्या भाजप नेत्यांनी मिटकरींची लायकीच काढली. त्यामुळे महायुतीमधील वातावरण गेल्या काही दिवसापासून चांगलेच तापले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, 'महायुतीची गरज ही सर्वांना आहे. राज्यात आता एवढं चांगलं वातावरण असताना मिठाचा खडा टाकू नये. महायुती फक्त भाजपची गरज नाही. आमचे कार्यकर्तेही मनावर दगड ठेवून महायुतीत लढत आहेत. अशाप्रकारचे आरोप करणे कुठल्या युतीधर्मात बसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीमधील ज्येष्ठ नेते असलेल्या रामदास कदम यांनी काही समस्या असेल तर चार भिंतीच्या आत ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडायला पाहिजे होती. पण त्यांचा स्वभाव हा खळबळजनक बोलण्याचाच आहे. महायुतीचा धर्म हा पाळलाच गेला पाहिजे. अन्यथा उत्तर आम्हालाही देता येते, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.

वैफल्यातून ही खदखद बाहेर आली

रामदास कदम यांचा मुलगा जिकडे आमदार आहे, तिकडे परिस्थिती अशी आहे की, भाजप नसेल तर त्यांना निवडून येणे अवघड आहे. त्यांच्या मुलाला मंत्री व्हायचे होते. त्यामुळे रामदास कदम अस्वस्थ आणि बैचेन आहेत. ते राजकीय पटलावरुन गायबही आहेत. या सगळ्या वैफल्यातून ही खदखद बाहेर येत आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. राज्यभरात आमचे नेटवर्क आणि संघटना आहे. त्यामुळे आमच्या संयमाला दुबळेपणा समजू नका, असेही दरेकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT