<div class="paragraphs"><p>Nana Patole, Congress Buldhana</p></div>

Nana Patole, Congress Buldhana

 

Sarkarnama

महाराष्ट्र

Nana Patoleःमला मंत्री होण्याची वेळ आली तरी ऊर्जा मंत्री होणार नाही..

सरकारनामा ब्युरो़

बुलडाणा ः राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची काॅंग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती राष्ट्रीय अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे काॅंग्रेसमध्ये (Congress) आता मंत्रीमंडळातील बदलाच्या हालचालीची देखील चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra) काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या संदर्भात विचारण्यात आले, आपण मंत्री होणार का? ऊर्जा खाते तुमच्याकडे येणार का? याला पटोले (Nana Patole) यांनी ` माझ्यावर मंत्री होण्याची वेळ आली किंवा पक्षाने तशी जबाबदारी सोपवली तरी आपण ऊर्जा खात्याचे मंत्री होणार नाही? असे स्पष्ट केले.

बुलडाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना नाना पटोले यांनी राऊत यांचे काढण्यात आलेले अनुसुचीत जातीचे राष्ट्रीय अध्यक्षपद, विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका आदी विषयांवर भाष्य केले. काल टिळक भवनात विधानसभा अध्यक्षपदासाठी ज्यांचे नाव चर्चेत आहे त्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पटोले यांनी केक भरवला.

हा केक म्हणजे विधासभा अध्यक्षपदाची उमेदवारी समजायची का? या प्रश्नावर देखील पटोले यांनी गुगली टाकली. नाना पटोले म्हणाले, टिळक भवनात आम्ही क्रिसमस साजरा करत ऐकमेकांना शुभेच्छा दिल्या. तिथे आमचे पृथ्वीराज बाबा देखील उपस्थित होते. त्यामुळे मी त्यांना केक भरवला. विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा निर्णय हायकंमाडकडून घेतला जातो. आज त्या संदर्भात निर्णय होईल, त्यामुळे केक भरवण्याचा आणि उमेदवारीचा काही संबंध नाही.

उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून अनुसूचित जातीचे राष्ट्रीय अध्यक्षपद काढून घेण्यात आले, परंतु ही एक संघटनात्मक प्रक्रिया आहे. मी देखील भारतीय किसान मोर्चाचा अध्यक्ष होतो. संघटनेतील बदल हे नेहमीचेच असतात, त्यामुळे एखादी जबाबदारी काढून घेतली म्हणजे त्याला डावलले असे म्हणणे योग्य नाही, योग्यवेळी पक्ष त्या नेत्यावर दुसरी जबाबदारी सोपवत असते.

मला मंत्रीपद मिळणार अशा चर्चा प्रसार माध्यमांमधून केल्या जातात. पक्षाने निर्णय घेतला आणि मला मंत्रीपद स्वीकारावे लागले तरी आपण उर्जा खात्याचा कारभार घेणार नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे दुकान बंद करा, या आपल्या पक्षाच्या बैठकीतील विधानावरून दोन पक्षांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न माध्यम करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरण्यासाठी अशा प्रकारची विधाने करावी लागतात, शिवाय माझे विधान हे पक्षाच्या अंतर्गत बैठकीतले होते, जाहीर कार्यक्रम किंवा भाषणात मी ते केले नव्हते. शेवटी स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकी नको..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय नको अशी भूमिका काॅंग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी घेतली होती. तरी देखील काही निवडणुका झाल्या. आता राज्यावर आणि देशावर पुन्हा ओमीक्राॅन आणि कोरोनाचे सावट आहे, अशावेळी निवडणुका होणार की नाही? हे सांगता येत नाही.

पण केंद्रातील मोदी सरकारने कोरोना काळात देखील मागील काळात पाच राज्यांच्या निवडणुका घेतल्या. लोकांच्या जीवापेक्षा त्यांना निवडणुका महत्वाच्या वाटल्या. त्यामुळे केंद्र सरकार काय निर्णय घेते त्यावरच सर्व काही अवलंबून आहे, असा टोला पटोले यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढेल असे म्हटले आहे. यावर निवडणुका आल्या की त्यावर निर्णय घेऊ असे सांगत, अधिक भाष्य करणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT