CM Pramod Sawant sarkarnama
महाराष्ट्र

Goa Political News : मुख्यमंत्री सावंतांचे विश्वासू अन् पक्ष आदेशामुळे राजीनामा दिलेल्या काब्राल यांचा CM पदावरच डोळा?

Deepak Kulkarni

Goa News : लोकसभा निवडणुकीनंतर आता गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोव्यामधील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा जोर धरू लागली आहे. यातच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या एका नेत्याला मंत्रिपद देण्याचा शब्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पूर्ण केला.

मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या निलेश काब्राल यांनी पक्ष आदेशाला मान देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये आलेल्या सिक्वेरांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. पण, माजी मंत्री निलेश काब्राल यांचा आता थेट मुख्यमंत्रिपदावरच डोळा असल्याचे त्यांच्या अलिकडच्या वक्तव्यावरुन दिसत आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी भाजपसह सरकारला पाठिंबा दिलेल्या मित्रपक्ष आणि अपक्षांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीनंतर आता एक-एक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. पक्षाने संधी दिल्यास मुख्यमंत्री पदाची धुराही सांभाळू असे वक्तव्य करत निलेश काब्राल यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.

निलेश काब्राल म्हणाले, पक्षाच्या आदेशाप्रमाणे मी मंत्रिपद सोडले. मी कधीच पक्षाशी बंडखोरी केली नाही. भाजप हा हुशार पक्ष आहे. कोणाला काय द्यायचे ते पक्षच ठरवेल. मुख्यमंत्रिपदाची संधी दिल्यास तीही स्वीकारण्यास मी तयार आहे. माझी क्षमता मी सिद्ध केली आहे. लोकांनाही माझ्या क्षमतेबद्दल चांगलेच ठाऊक आहे.''

काही महिन्यांपूर्वीच निलेश काब्राल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. गोव्यात आता लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ फेररचनेच्या चर्चांना उधान आले आहे‌. सोमवारी भाजपचे सर्व आमदार मंत्री तसेच सरकारला पाठिंबा दिलेल्या मगो पक्षाचे आमदार आणि अपक्षही या बैठकीला हजर होते.

या बैठकीनंतर आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ही बैठक 15 जुलैपासून सुरु होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाबाबत तयारीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत मंत्रिमंडळ फेररचनेबाबत चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीतून मंत्री गावडे, सिक्वेरा आणि हळर्णकर सर्वात आधी बाहेर पडल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू तर मिळणार नाही ना अशी चर्चा सुरु झाली. कला अकादमीच्या मुद्यावरुन गेल्या काही दिवसांपासून सावंत सरकारला विरोधकांकडून घेरले जात आहे. विशेष म्हणजे, विरोधकांनी मंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. त्यामुळे आता गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे, मंत्रिमंडळ फेररचनेनंतर नवख्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे. तर नाराज आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय मुख्यमंत्री अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात संधी देणार का? हे देखील पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT