Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : गृहमंत्री फडणवीस म्हणतात, 'एन्काऊंटर फेक नाहीच, कोर्टाच्या टिप्पणीलाही महत्त्व नाही...’

Sachin Waghmare

Mumbai News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर या कारवाईवर अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर राज्यामध्ये चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणामुळे आंदोलन देखील झाले होते. त्यानंतर पोलिसांनी 23 सप्टेंबर रोजी मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर पोलिसांनी केला. पोलिसांसोबतच्या झालेल्या झटापटीमध्ये पोलिसांनी केलेल्या स्वरक्षणार्थ चकमकीमध्ये अक्षय शिंदे मारला गेला. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.

राज्य सरकारकडून या पोलीस कारवाईचे वारंवार समर्थन केले जात आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी भाष्य करीत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (Devendra Fadnavis News)

या कारवाईनंतर राज्य सरकारच्या कारभारावर विरोधकाकडून आरोप केले जात आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या दोन-तीन दिवसांपासून वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत. या मुलाखतींमध्ये ते वारंवार पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करीत आहेत.

अक्षय शिंदेच्या प्रकरणात पोलिसांची कारवाई योग्यच होती. आरोपीने गोळी चालवली म्हणून पोलिसांनाही स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडाव्या लागल्या. पोलिसांनी काहीही चुकीचे केले नाही. या घटनेला फेक एन्काऊंटर म्हणणे चुकीचे असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

धारावीतील अवैध धार्मिक स्थळावरील बुलडोझर कारवाई चर्चेचा विषय ठरली होती. महाराष्ट्रही आता उत्तर प्रदेशप्रमाणे बुलडोझर कारवाई आणि चकमकीच्या माध्यमातून आरोपींना ठोकण्याची प्रेरणा घेत आहे का का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता.

त्याला उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले, अक्षय शिंदेच्या प्रकरणात पोलिसांची कारवाई योग्यच होती. त्याने आधी पोलिसांवर गोळी झाडली. अशावेळी पोलीस त्याच्यासमोर हात जोडून त्याला शांततेचे आवाहन करू शकत नाही. त्याने गोळी चालवली म्हणून पोलिसांनाही स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडाव्या लागल्या. पोलिसांनी काहीही चुकीचे केले नाही. या घटनेला फेक एन्काऊंटर म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी बॊलताना स्पष्ट केले.

एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही

अक्षय शिंदेच्या पालकांनी या एन्काऊंटरच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, 'उच्च न्यायालयासमोर परिस्थिती अजून आलेली नाही. न्यायालयाने काही टिप्पण्या केल्या आहेत. न्यायालयात जे सांगितले जाते, ते महत्त्वपूर्ण नसते. न्यायालयात काय लिहिले जाते, त्याला महत्त्व असते. न्यायालयाने आपल्या लेखी आदेशात याबद्दल कोणतीही टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT