<div class="paragraphs"><p>Rajan Teli</p></div>

Rajan Teli

 

Sarkarnama

कोकण

पराभवानंतर जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा मोबाईल बंद अन् भाजप नेतृत्वाचं वाढलं टेन्शन

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) भाजपचा (BJP) विजय झाला आहे. पण भाजपचे जिल्हाध्यक्ष व पॅनेलप्रमुख राजन तेली (Rajan Teli) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. यामुळे तेली यांनी तडकाफडकी पक्ष नेतृत्वाकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला आहे. यानंतर ते मोबाईल स्वीच ऑफ करून विजनवासात गेले आहेत. यामुळे पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे.

जिल्हा बँकेत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सिद्धीविनायक पॅनेलचे 11 उमेदवार निवडून आले असून, महाविकास आघाडीला (MVA) 8 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात राजन तेलींना पराभूत करून सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत.

पराभवाचा धक्का बसताच राजन तेलींनी तडकाफडकी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर मोबाईल स्वीच ऑफ केला आहे. भाजप नेत्यांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेलींची मनधरणी करण्याचा नेतृत्वाकडून प्रयत्न केला जाणार आहे. पण त्यांच्याशी संपर्कच होऊ शकत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तेली यांच्या पराभवामुळे जिल्हा बँकेतील विजय हा गड आला पण सिंह गेला, अशी भावना व्यक्त होत आहे. यानंतर तेलींनीही तातडीने पक्ष नेतृत्वाकडे राजीनामा पाठवला आहे. यावर नारायण राणे यांनी ठाम भूमिका घेत तेलींच्या पुनर्वसनाचा जाहीर शब्द दिला आहे. राणे म्हणाले की, गड आला की सिंह गेला हे आम्ही पाहू. गड न जाऊ देता सिंह सगळेच जिंकतो. इथून दिल्लीपर्यंत आमचीच सत्ता आहे. आम्ही कुठेही राजन तेलींची वर्णी लावू. तेलींनी राजीनामा वरिष्ठांकडे पाठवला आहे. यावर पक्षाचे वरिष्ठच निर्णय घेतील.

आमदार वैभव नाईक यांनीच विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे राणे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या तेली यांचा पराभव हा पुन्हा नाईक यांनी दिलेला आणखी एक धक्का मानला जात आहे. तेली यांच्या नशिबात जिल्हा बँक नसल्याचे या निकालातून दिसून येत आहे. या आधी ते दोनदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. आता त्यांनी पराभवाची हॅटट्रिक केली आहे. शिवसेना नेते व जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) हे चिठ्ठीवर पराभूत झाले आहेत. कणकवलीत सतीश सावंत यांचा पराभव नशिबाचा कौल ठरला. त्यामुळे नारायण राणे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा दिलासा मिळाला. मात्र, राणे यांना तेली यांच्या पराभवामुळे मोठा धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT