Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

सामंतांसारख्या गद्दाराला निवडणुकीत ठेचल्याशिवाय राहायचे नाही : भास्कर जाधवांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : आमदार उदय सामंत (Uday Samant) उद्योगमंत्री झाले. पण त्यांचा पाय गुण बघा. महाराष्ट्रातील लाखो तरुणांना रोजगार देणारा मोठा कारखाना गुजरातला गेला, असा आरोप शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला. ‘शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी करणाऱ्या सापाला कितीही दुध पाजलं तरी तो अमृत ओकणार नाही, तर तो विषच ओकणार. अशा सापाला लोकशाही मार्गाने, निवडणुकीच्या माध्यमातून ठेचल्याशिवाय राहायचे नाही, अशी प्रतिज्ञा सर्वांनी मिळून करू या,’ असे आवाहन करत त्यांनी उद्योगमंत्री सामंतांना लक्ष्य केले. (Bhaskar Jadhav's strong criticism of Uday Samant in Shiv Sena's Ratnagiri melava)

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संवाद निष्ठा यात्रेप्रसंगी रत्नागिरीत शुक्रवारी (ता. १६ सप्टेंबर) झालेल्या मेळाव्यात आमदार जाधव बोलत होते. ते म्हणाले की, ‘हे उद्योगमंत्री झाल्या झाल्या राज्यातील तरुणांना रोजगार देणारा कारखाना गुजरातला गेला. आता त्यावर सत्ताधारी सांगत फिरत आहेत की आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर बोलणं झाले आहे. ते आपल्याला वेदांतपेक्षाही मोठा कारखाना देणार आहेत. तो कारखाना खोक्यापेक्षाही मोठा असणार आहे.

शिवसेनेला महाराष्ट्रात अडचणीत आणण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. याचे दाखले मोठमोठे विचारवंत आपल्या लेखणीमधून देत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्र अखंड राहायला पाहिजे असेल, तर शिवसेनेचा भगवा तेजाने फडकत राहायला पाहिजे. म्हणून ही जबाबदारी तुम्ही सर्वांनी उचलली आहे. आज जमलेली ही उपस्थिती त्याची साक्ष देत आहे. अजून चार-पाच सभा आहेत, जिल्ह्यात एकच सभा नाही. आता सर्वांनी पेटून उठले पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली खऱ्या शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहनही भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांना केले.

सामंतांची खिल्ली उडवताना आमदार जाधव म्हणाले की, ‘राष्ट्रवादीत असतानाही आमदार सामंत यांनी वरिष्ठांना चुकीची माहिती देत माझ्यावर आरोप केले होते. त्याचीच पुनरावृत्ती ते आताही करत आहेत. युवा नेते आदित्य साहेबांनी फ्रॅंकी दिली म्हणून सगळ्यांना सांगत फिरत होते. त्यापेक्षा ती फ्रॅंकी राजन साळवी, वैभव नाईक यांना द्यायली हवी होती. त्यांनी शिवसेना वाढवली असती. म्हणूनच अशा सापाला लोकशाही मार्गाने निवडणुकीच्या माध्यमातून ठेचल्याशिवाय राहायचे नाही.

राज्यातील शिवसैनिक पेटून उठला आहे. मराठवाडा दौऱ्यावर असताना तेथील शिवसैनिकांनी ठणकावून सांगितले की, कोकणात शिवसेनेची मोठी ताकद आहे. मात्र, आता त्यापेक्षाही अधिक मराठवाडा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील. आता स्पर्धा लागली पाहिजे. जे-जे शिवसेनेकडून निवडणुकीत उभे राहतील, त्यांना निवडून आणण्याचे काम आपणा सर्वांना करायचे आहे, असेही जाधव यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT