Narayan Rane
Narayan Rane  sarkarnama
कोकण

कुडाळमधील २०१४ चा पराभव आठवताच नारायण राणेंचा कंठ दाटला!

सरकारनामा ब्यूरो

सिंधुदुर्ग : विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत कुडाळमधून माझा पराभव झाला, त्याचे सर्वांत जास्त दुःख झाले. कारण, त्या अगोदर आयुष्यात कधीच पडलो नव्हतो. पराभव का झाला, हेच समजत नव्हते. त्या पराभवानंतर जे दुःख झाले, त्याच क्षणी ठरवलं की यापुढे कोणत्याही निवडणुका लढवायच्या नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या पराभवाची सल आठ वर्षांनंतर मनात सलत असल्याची भावना व्यक्त केली. त्यावेळी बोलताना त्यांचा कंठ दाटला होता. (The biggest grief of the 2014 defeat in Kudal : Narayan Rane)

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज (ता. २९ एप्रिल) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मालवण देवबाग येथील पारंपरिक मच्छीमारांशी संवाद साधला. जवळपास एक वर्षानंतर नारायण राणे देवबागमध्ये येणार असल्यामुळे मच्छीमारही मोठ्या संख्येने जमले होते. या वेळी मच्छिमारांनी येथे उद्‌भवणाऱ्या समस्यांकडे राणेंचं लक्ष वेधले. त्यावेळी राणेंनी आपल्या एमएसएमई विभागाच्या माध्यमातून देवबागचा विकास करणार असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचवेळी त्यांनी २०१४ मधील पराभवाची सल बोलून दाखवली.

राणे म्हणाले की, मी १९९० पासून सिंधुदुर्गमधून विधानसभेत निवडून जात होतो. तब्बल सहा वेळा मला येथील जनतेने आमदार म्हणून निवडून दिले. मात्र, सातव्या निवडणुकीत मला पाडलं. त्याचं मला प्रचंड दुःख झालं. मी या कार्यकाळात उद्योगमंत्री, मुख्यमंत्री, महसूल मंत्री अशा अनेक मंत्रीपदावर काम केले होते. ज्या ठिकाणी काम केले होते, त्या ठिकाणी छाप पाडली होती. राणे यांच्याकडे खात द्या, ते त्या खात्याला न्याय देतील, अशी भावना त्यावेळी सर्वांची असायची, त्यामुळे राज्यात माझा नावलौकीक झाला होता. याशिवाय मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात कामे केली होती, तरीही सातव्या वेळी का पडलो, हे मला समजलं नाही.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे मोठे दुःख झाले. पराभव झाला, त्यावेळी बाजूला हेलिकॉप्टर होते, त्यात बसून थेट मुंबई गाठली. सिंधुदुर्गमध्ये थांबावे, असे त्या क्षणी वाटलेच नाही. माझा पराभव करून तुम्ही ज्यांना निवडून दिले, त्या आमदाराला विधानसभेत नीट बोलता येत नाही. कुठलीही नवीन योजना आणू शकत नाही. कसलंही मोठे काम करू शकत नाही. मात्र, कुठलं काम आलंच तर टक्केवारी मागण्याचं काम करतो, असा आरोपही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर नाव न घेता केला.

राणे म्हणाले की, सिंधुदुर्गमधील जनतेशी माझं नांत हे मतदार आणि आमदार म्हणून नव्हतं. माझं आणि तुमचं नातं भावनिक आहे. आपली माणसे म्हणून आपलं नाते जोडले गेलेले आहे. मी १९९० मध्ये आमदार झालो, तेव्हा देवबाग येथील लोक माझ्याकडे आले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी समुद्री अतिक्रमणामुळे स्थलांतर करण्याची नोटीस तारकर्ली आणि देवबाग या दोन गावांना दिल्या होत्या. मात्र, ते स्थलांतर मी होऊ दिले नाही. पावसाळा कालावधीत मोठे अतिक्रमण होते. गावात रस्त्याची गरज होती, तीही पूर्ण करण्यात आली.

मी आमदार झालो, तेव्हा मालवणमधून कणकवलीपेक्षा जास्त मते मिळाली होती, त्यामुळे माझे प्रेम मालवण तारकर्ली देवबाग यांच्याशी जोडलेले आहे.आमदार होतो, त्यावेळी सिंधुदुर्गात अनेक योजना राबविल्या. ज्या दिवशी माझा पराभव झाला तो विश्वास न बसणारा होता. पण, कोकणी माणसासाठी जे शक्य होईल, ते सर्व काही करण्याचा माझा मानस आहे. केवळ कोकणी माणसाच्या प्रेमामुळे मला विविध मंत्रीपदे, मुख्यमंत्रीपद भूषविता आले आहे, अशी भावनाही नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT