Aditya Thackeray Sarkarnama
कोकण

Aditya Thackeray : "श्रावण आहे नाहीतर..." मालवणमधील राड्यानंतर पावसात भिजत आदित्य ठाकरेंचं धडाकेबाज भाषण, राणेंसह भाजपवर हल्लाबोल

Jagdish Patil

Sindhudurg News, 28 August : मालवणधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते घटनास्थळी गेले होते.

यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दाखल होताच प्रवेशद्वारावरच राडा झाल्याचं पाहायला मिळाला. ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झाला. यावेळी ठाकरे आणि राणे यांचे समर्थक एकमेकांना भिडले. यावेळी काही कार्यकर्त्यांना मारहाण देखील करण्यात आली.

दरम्यान, या सर्व राड्यानंतर महाविकास आघाडीची निषेध सभा पार पडली. यावेळी भर पावसात भिजत आदित्य ठाकरेंनी धडाकेबाज भाषण करत राणेंसह भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. भाषणाच्या सुरुवातीलाच 'आज मोर्चा होता पण काही चिंधी चोर आले होते, श्रावण आहे म्हणून नाहीतर त्यांच्या खिशातून कोंबड्या पण काढल्या असत्या', अशा शब्दात त्यांनी भाजप नेते नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना डिवचलं.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, "मी त्यांच्याकडे जास्त लक्ष नाही देत, ती घाण आहे. आपण कचऱ्याचं विलीनीकरण करतो त्याकडे लक्ष देत नाही. आज त्यांनी केलेला हा सर्व बालिशपणा होता त्यांच्यामुळेच तो जगासमोर आला. येथे घडलेल्या घटनेनंतर स्थानिक खासदार चार दिवसांनी आले. मात्र, आमचे वैभव नाईकांनी लगेच उस्फुर्त प्रतिक्रिया दिली होती."

काम केलं तिथे गळती लागली

दरम्यान, भाजपने जिथे जिथे कामे केली त्याला गळती लागली असून प्रत्येक कामात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, "जे काही घडलं भले ते काम भ्रष्टाचारी 'भ्रष्टाचार जनता पार्टी'ने केलं असेल पण, घडलं ते चुकीचं आहे, म्हणून आपण महाराजांची माफी मागायला आलो होतो. कारण आपण महाराजांचे मावळे आहोत."

दरम्यान, भाजपने जिथे जिथे काम केलं त्या त्या कामांना गळती लागली आहे. भाजपने एकही असा भाग भ्रष्टाचार करायचा सोडलेला नाही. मुंबई महापालिकेतही मिंधे सरकारने भ्रष्टाचार केला. या मुर्तीचं केलं तसंच राम मंदीराचं, संसदेला गळती लागली आणि दिल्ली विमानतळाचं छत पडलं, अशा अनेक गळती लागलेल्या कामांचा पाढाच त्यांनी यावेळी वाचला.

ते महाराज वाटतंच नव्हते...

तर आता कोसळलेला आमच्या दैवताचा पुतळा बघितला तर ते महाराज वाटतंच नव्हते. पुतळा 8 महिन्यात पडला. गेट वे ऑफ इंडियाला महाराजांचा पुतळा आहे तो तसाच आहे. हा आपटे कुठे आहे? त्याला भाजपने कुठे पळवून लावलं? असा प्रश्न उपस्थित करत भाजप आपला स्वाभिमान आणि आत्मा मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आदित्य यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT