Ajit pawar- Uddhav Thackeray- Narayan Rane
Ajit pawar- Uddhav Thackeray- Narayan Rane  Sarkarnama
कोकण

त्या' घटनेनंतर उद्धव ठाकरे यांच्या उजव्या हाताला नारायण राणे बसणार

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : श्रेयवादाच्या लढाईत अडकलेल्या सिंधूदुर्गातील (Sindhudurg) चिपी विमानतळाचे (CHIPI Airport) उद्घाटन आज (9 ऑक्टोबर) होत आहे. आज दुपारी साडेबारा वाजता या विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया (Jotiraditya Sindhiya) यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खूर्ची तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खूर्ची ठेवण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब, असे अनेक नेतेमंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. श्रेयवादाच्या लढाईत अडकलेल्या या विमानतळाचा उद्घाटन सोहळा मात्र वेगळ्याच कारणाने रंगला आहे. याचे कारण म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधीया एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

गेल्या महिन्यात, भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर रत्नागिरीत अनेक नाट्यमय घडामोडींनतर नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नावही छोट्या अक्षरात छापल्याने त्यांनी शुक्रवारी जाहीर सभेत नाराजीही व्यक्त केली. विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर नारायण राणे यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यावरुन नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. माणसाने किती संकुचित असावं हे यातून दिसंत, असा टोला राणेंनी लगावला होता. तर आज एकाच व्यासपीठावर हे दोन्ही मंत्री उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

तर नारायण राणेंच्या टिकेला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार टोला लगावला आहे. सरकारने प्रोटोकॉलप्रमाणेच निमंत्रण पत्रिका दिली आहे. विकास कामांवर बोलण्याआधी तुम्ही काय विकास केला ते बघा. ज्यांना सूक्ष्म खातं देण्यात आलं आहे त्यांचं नावही तसंच छापलं आहे. नारायण राणेंनी जिल्ह्याचा नाही तर व्यक्तिगत विकास जास्त केलाय. ते जी यादी जाहीर करणार असल्याचं म्हणत आहेत, तर त्यांनी त्या यादीत स्वत:चं नाव सर्वात वर टाकावं, असा सणसणीत टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र कार्यवाही वेळेत पूर्ण न झाल्याने मी पुन्हा एकदा दिल्लीला गेलो होतो. आम्ही हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची भेट घेऊन विमानतळाचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यानंतर लायसन्स मिळालं. चिपी विमानतळ सुरू करण्यास अखेर डीजीसीआयने परवानगी दिली. आता अवघ्या 2500 रुपयात सिंधुदुर्ग ते मुंबई हा प्रवास करता येणार आहे. याशिवाय, 'या विमानतळाच्या कामाचं श्रेय कोकणातील जनतेलाच असल्याचं'त्यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT