Hitendra-Thakur
Hitendra-Thakur 
कोकण

राज्यसभा निवडणूक : तीन आमदार असलेल्या हितेंद्र ठाकूरांची चलाख खेळी..

संदीप पंडित

विरार : राज्यसभेसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात काॅंटे की टक्कार असल्याने या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे मत महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे छोपे पक्ष आणि अपक्ष आमदार यांचा भाव वधारला आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) तीन आमदारांच्या मतांवर दोन्ही बाजूंचे डोळे असताना बहुजन विकास आघाडीने आपले पत्ते खुले केलेलेे नाहीत. त्यामुळे ही मते कोणाला मिळणार, याचे तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

आमदार हितेंद्र ठाकूर (वसई) त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर (नालासोपारा) आणि राजेश पाटील (बोईसर) असे बविआचे तीन आमदार आहेत. वसई-विरार पट्ट्यात ठाकूर यांचे राज्य आहे. महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी बविआने सुरवातीला पाठिंबा दिला होता. ठाकूर यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने वादग्रस्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली होती. तेथे त्यामुळे या दोन्हींतील संघर्ष होताच. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नसल्याचे लक्षात येताच ठाकूर हे महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन मोकळे झाल्याचे तेव्हा बोलले जात होते.

सेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र त्यानंतर सेनेने येथे विस्तारासाठी आणि आपली ताकद वाढविण्यासाठी जोर लावला. त्यातही येथे आतापर्यंतचा राजकीय सामना हा शिवसेना विरुद्ध ठाकूर असाच राहिला. त्यामुळे सत्ता आल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणे सेनेला शक्य नव्हते. त्यातही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाणीवपूर्वक लक्ष दिले. सत्ता आल्यानंतर सेनेने त्रास दिला, अशी बविआची मनोभूमिका झाली आहे. या साऱ्या परिस्थितीत बहुजन विकास आघाडी काय निर्णय घेणार, याचे औत्सुक्य राहणार आहे.

याबाबत बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. परंतु बविआच्या गोटातून मिळालेल्या माहिती नुसार अजून कोणाला पाठिंबा द्यायचे ते अद्याप ठरलेले नाही. त्यावर येत्या काही दिवसांत होईल. आतापर्यंत वसई- विरार महापालिकेची निवडणूक सातत्याने पुढे जात असून प्रशासकाच्या माध्यमातून येथील सत्तेवर सेनेची पकड राहावी यासाठी सेना प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे, त्याविषयी बविआची काही मते आहेत. याबद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांशी बोलल्यानंतर सारे प्रश्न सोडवून घेण्याकडे बविआचा कल आहे. त्यामुळे ठाकूर यांनीही आता आस्ते कदम चालत आपल्या मतांचा ठावठिकाणा लागू दिलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT