Uday Samant
Uday Samant Sarkarnama
कोकण

'मीदेखील कोकणातला; धमक्या अन्‌ दादागिरीला घाबरणारा नाही'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कोकणातील (konkan) रिफायनरीच्या बाजूचे आणि विरोधातील अशा दोन्ही बाजूंशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मी उद्योगमंत्री झाल्यापासून सांगत आहे. संवादाने काही प्रश्न सोडवले पाहिजेत. दादागिरीला मी तर घाबरत नाही. मी देखील कोकणातला असून राजापूरला लागूनच माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे अशा धमक्यांना मी काही घाबरत नाही, असे उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जाळून टाकण्याची धमकी देणाऱ्याला दिले. (I am also from Konkan; Not afraid of threats and bullying : Uday Samant)

रिफायनरीला विरोध दर्शविणाऱ्या एका व्यक्तीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर ‘उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकू,’ अशी भाषा वापरली होती. त्याला मंत्री सामंत यांनी आज उत्तर दिले आहे.

सामंत म्हणाले की, रिफायनरीला विरोध दर्शविणाऱ्यांनी ‘उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकू,’ अशी भाषा वापरली आहे. त्यासंदर्भात माझी कोकणचे आयजी, एसीपींशी चर्चा झाली आहे. विरोध असू शकतो, हा लोकशाहीतील एक भाग आहे. पण, मंत्र्यांनी पाऊल टाकलं तर तंगड्या तोडू, त्यांना जाळून टाकू, ठार मारू, ही भाषा अत्यंत वाईट आहे. संबंधित व्यक्तीचा यामागचा हेतू काय आहे. आता पोलिसांकडून असं कळतंय की एनजीओंनी त्या व्यक्तीला बोलायला लावले आहे. पोलिस त्याचा तपास करतील आणि योग्य तो निर्णय घेतील.

एनजीओला मी ओळखतही नाही. संबंधित व्यक्ती ही मुंबईस्थित असून त्यांचा ट्रान्सपोर्टचा मोठा उद्योग आहे. कोकणातील नागरिकांच्या भावनांशी खेळणं, त्यांच्या भावना भडकावणं. दादागिरी करून दबाव आणणं, असं त्यांचं वागणं असतं. त्यांच्यावरही काही गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्याबाबतची माहिती पोलिस सविस्तरपणे घेतील आणि योग्य ती कारवाई करतील, असेही उद्योगमंत्री यांनी नमूद केले.

सामंत म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर असं वक्तव्य झाले असेल तर त्यांनी त्या व्यक्तीला तिथेच थांबवायला हवे होते. कारण, तेसुद्धा रिफायनरी समर्थकांशी चर्चा करण्यासाठीच गेले होते. भावनेच्या भरात एखादी व्यक्ती बोलत असेल तर ते योग्य की अयोग्य, हे शेजारी बसलेल्या नेत्यांना कळलं पाहिजे. सर्वांत महत्वाची बाब म्हणजे, ती व्यक्ती कोणाला जाळून टाकणार बोलला ही नंतरची बाब आहे. एखादी गुंड प्रवृत्तीची व्यक्ती मंत्र्याला जाळून टाकू, मंत्र्याच्या तंगड्या तोडू, असं वक्तव्य करते आणि पोलिस त्यावर काहीही कारवाई करत नाहीत, ही दखल घेण्यासारखी बाब आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT