Sunil Tatkare News Sarkarnama
कोकण

Sunil Tatkare : महायुतीचा नेताच खासदार तटकरेंना म्हणाला; 'रायगडमधून बाहेर पडा'

सरकारनामा ब्यूरो

Raigad News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू असतानाच आता रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ ही अलीकडे उमेदवारी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला मिळणार, की भाजपला मिळणार यावरून चर्चेत आला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य खासदार सुनील तटकरे यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी रायगडमध्ये जाहीरपणे जोरदार टीका करत सुनील तटकरे यांना सुनावले आहे. इतकेच नाही तर कळसेकर यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे पुढील खासदार हे धैर्यशील पाटील असतील, असा निर्धारच पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये बोलताना व्यक्त केला आहे.

सगळीच पदे तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी आहेत, असा थेट सवालच भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खासदार सुनील तटकरे यांची आम्हाला महाराष्ट्रासाठी गरज आहे. त्यामुळे तटकरे यांनी आता रायगडमध्ये अडकून न पडता महाराष्ट्रात फिरावे, असे सांगत रायगड सांभाळण्यासाठी तुमचा पुतण्या धैर्यशील पाटील आता समर्थ आहे, असे मोठे वक्तव्य अतुल काळसेकर यांनी केले आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येक गावात लोकसभा मतदारसंघात अवघा महाराष्ट्र फिरत आहेत. त्यांनी चंग बांधला आहे, की महाराष्ट्रात 48 च्या 48 महायुतीचे खासदार निवडून आणायचे आहेत. या मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हेसुद्धा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

आम्हाला त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरज आहे. ते प्रत्येक मतदारसंघात जाऊन महाराष्ट्रात जाऊन महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी तटकरे यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, पण दुर्दैवाने तटकरे या मतदारसंघात अडकून पडले आहेत. माझी त्यांना सूचना आहे की तुम्ही या मतदारसंघात अडकून पडू नका. हा मतदारसंघ सांभाळण्यासाठी तुमच्या पुतण्या धैर्यशील समर्थ आहे. सगळीच पदे तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी आहेत, असा थेट सवाल अतुल काळसेकर यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपण या केलेल्या विनंतीनुसार सुनील तटकरे अवघ्या महाराष्ट्रात फिरतील आणि त्यामुळे या मतदारसंघात धैर्यशील दादांना ही संधी प्राप्त होईल. या रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात पूर्णपणे भाजपचे (Bjp) वर्चस्व आहे. त्यामुळे भविष्यामध्ये या लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे धैर्यशील पाटीलच असतील, असाही निर्धार काळसेकर यांनी या सभेत बोलताना व्यक्त केला आहे.

सगळीच पद तटकरेंच्या घरात कशासाठी ?

रायगडमध्ये सुनील तटकरे यांचे गेले 30 ते 35 वर्षे मोठं काम केलं आहे. त्यांचे वडीलही राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे विद्यमान खासदार सुनील तटकरे व रायगड हे जुने समीकरण आहे. सुनील तटकरे (Sunil Tatkre) यांचा रायगडमध्ये मोठा संपर्क आहे. मात्र, आता विरोधकांकडून सगळीच पदं तटकरेंच्या घरात कशासाठी अशी टीका होऊ लागली आहे.

(Edited by Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT