law and order Navi Mumbai : नवी मुंबईचा नागरीबरोबर औद्योगिक विस्तार वेगानं होत आहे. त्याच वेगाने गुन्हेगारीचा विळखा पडत आहे. गेल्या 24 तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
आरटीआय कार्यकर्ता अमित मौर्य आणि बिल्डर संदीप गवस यांच्यावर झालेल्या गोळीबाराने नवी मुंबई हादरली आहे. या जीवघेण्यात हल्ल्यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली. नवी मुंबईत वाढत्या गुन्हेगारीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहविभागाच्या पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं आहे.
नवी मुंबईत (Navi Mumbai) अवघ्या 24 तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी शहरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. किरकोळ वादातून झालेले दोन खून आणि एका प्रकरणात मृतदेह जाळल्याच्या स्थितीत आढळला आहे. गुन्हेगारीच्या या गंभीर चित्रामुळे नवी मुंबईतील शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रबाळे एमआयडीसी, एपीएमसी आणि पनवेल तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.
दिघा इथल्या इलठणपाडा परिसरात 13 एप्रिलला पहाटे अडीचच्या सुमारास सोनराज सुरेश शिंदे (30) याचा ओळखीच्या व्यक्तींनी खून (Crime) केला. घराबाहेर लावलेल्या शिडीच्या किरकोळ वादातून आरोपी कुणाल चौधरी याने आपल्या चार साथीदारांना बोलावले. सर्वांनी मिळून सोनराजला मारहाण करत दगडाने डोके व पोटावर प्रहार करून त्याचा जागीच जीव घेतला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वाशीतील एपीएमसी मसाला मार्केट परिसरात 12 एप्रिलला पहाटे राधे किशन उर्फ मोदी या मजुराचा खून करण्यात आला. आरोपी सिद्धार्थ म्हस्के याच्यासोबत झालेल्या वादातून त्याने फरशीने डोक्यात प्रहार केला. या घटनेत राधे किशनचा जागीच मृत्यू झाला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
तिसऱ्या घटनेत पनवेल तालुक्यातील जंगल परिसरात एका 20 ते 25 वर्षीय अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या तिन्ही घटनांच्या तपासासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
नवी मुंबईतील ऐरोली इथं सहा एप्रिलला आरटीआय कार्यकर्ता अमित मौर्य आणि बिल्डर संदीप गवस यांच्यावर गोळीबार झाला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिस दलातील गुन्हे शाखा युनिट-एकला यश आलं आहे. या प्रकरणातील मुख्य शूटर आणि कटाचा सूत्रधार असलेल्या बेकरी व्यावसायिकासह एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार गुरफान खान असून, तो आणि संदीप गवस हे 2016पर्यंत बांधकाम व्यवसायात भागीदार होते; मात्र आर्थिक वादातून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यानंतर गवस यांनी अमित मौर्य याच्या मदतीने आरटीआयच्या माध्यमातून गुरफानच्या बेकायदा बांधकामांविरोधात तक्रारी केल्या होत्या.
परिणामी त्याची काही बांधकामे पाडण्यात आली होती. याच रागातून गुरफान खानने गवस यांचा खून करण्याचा कट रचला. यासाठी त्याने मकोकाअंतर्गत 11 वर्षांची शिक्षा भोगून नुकताच तुरुंगातून सुटलेल्या राहुल ऊर्फ पवन सहानी याला सुपारी दिली होती. सेक्टर-1 परिसरात 6 एप्रिलला मध्यरात्री गवस आणि मौर्य हे आपल्या कारजवळ उभे असताना मोटारसायकलवरून आलेल्या राहुलने दोघांवर चार राउंड गोळीबार करत तेथून पळ काढला.
या घटनेचा रबाळे पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट-एकने तपास करत हल्लेखोरांना पकडले आहे. नवी मुंबई पोलिसांनी राहुल सहानीसह चोरीची दुचाकी पुरवणारा सय्यद खान, आर्थिक मदत करणारा नागेश माने आणि गवस यांच्या हालचालींची माहिती देणारा विशाल महाडिक, अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.