Prakash Bhoir
Prakash Bhoir Sarkarnama
कोकण

'पायाखालची वाळू घसरली की..' ; माजी आमदार भोईर यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : ठाण्यातील ओवळा-माजीवडा मतदारसंघावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यात सध्या वादाची ठिणगी उडाल्याच्या चर्चा आहेत. याविषयी माजी आमदार आणि ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांनी प्रतिक्रीया दिली. "पायाखालची वाळू घसरली की माणूस पुढे जातो, तशा निवडणुका पुढे जात आहेत. प्रत्यक्षात निवडणुका लागल्या की प्रत्येकाची ताकद किती हे दिसून येईल, असे भोईर यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या दहिसर येथील प्राथमिक शाळेच्या इमारत नुतनीकरणाचा शुभारंभ शुक्रवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील व माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते पार पडला. जिल्हा पंचायतकडून या कामासाठी 34 लाखांचा निधी मंजूर झाला असून, यातून शाळेच्या खोल्या बांधण्यात येणार आहेत. यावेळी रमेश पाटील, विजय पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राज्यात खरी शिवसेना कोणाची यावरुन ठाकरे शिंदे गटात वाद सुरु आहेत. आपल्या गटाची ताकद वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न दोन्ही गटाकडून होताना दिसत आहेत. स्थानिक महापालिकेतील नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी याआधीही शिंदे गटाकडून दबाव तंत्राचा वापर केला गेल्याचे बोलले जात होते. सध्या प्रताप सरनाईक यांचे वर्चस्व असलेला ओवळा माजीवडा या मतदार संघावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक यांच्यात नवा वाद सुरु झाला आहे. हा मतदार संघ भाजपासाठी सोडण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरु आहेत याची चर्चा सुरु आहे.

याविषयी ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख भोईर यांना विचारले असता ते म्हणाले, यासंबंधी कल्पना नाही. परंतू तसे होऊ शकते. शिंदे यांच्या गटात या वादाने दुफळी निर्माण झाल्याची चर्चा असतानात माजी आमदार भोईर यांनी पायाखालची वाळू घसरु लागली की... असे सूचक विधान केले. ते पुढे म्हणाले, भविष्यात भाजपा व तो गट वेगवेगळे लढू शकतात.

आम्ही म्हणजेच ठाकरे गट व मनसे देखील वेगळे लढतील. जर तरच्या या गोष्टी आहेत. निवडणूका लागतील तेव्हा या गोष्टी समोर येतील. पायाखालची वाळू घसरली की माणूस पुढे पुढे जात असतो. त्या पद्धतीने निवडणुका पुढे पुढे जात आहेत. जेव्हा निवडणूका येतील तेव्हा नक्की सामना करण्याची प्रत्येक पक्षात ताकद असली पाहीजे, असा इशारा त्यांनी यावेळी शिंदे गटाला दिला आहे.

मनसे - ठाकरे गट युतीची चर्चा :

मनसेने याआधीही भाजपाला पाठींबा देऊ केला आहे. भाजपा शिंदे गटात स्थानिक पातळीवर वाद होत असतानाच दहिसर येथील शाळेच्या भूमिपुजनासाठी मनसे ठाकरे गटाचे आजी माजी आमदार एकत्र आल्याने मनसे ठाकरे गटाची युती झाली का ? याविषयी देखील चर्चा रंगू लागली आहे. याविषयी माजी आमदार भोईर म्हणाले, आत्ता नाही तर पूर्वीपासून आम्ही एकत्र आहोत.

लोकांच्या हिताचे काम असते तेव्हा आम्ही एकत्रच असतो. दहिसरला नाविन्यपूर्ण योजनेतून शाळेची इमारत उभी राहणार आहे. शाळेचे नूतनीकरण झाल्यानंतर सातवीपर्यंत गावातील विद्यार्थी येथे चांगले शिक्षण घेऊ शकतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही शेवटची योजना गावांतील शाळांची असेल. यानंतर ही गावे नवी मुंबईत समाविष्ट होतील. भविष्यात आम्ही या गावांचे योग्य नियोजन केले तर महानगरपालिकेच्या माध्यमातून येथे चांगले प्रतिनिधी येऊन विकास या भागाचा होऊ शकतो असे देखील ते म्हणाले.

तर मनसेचे आमदार राजू पाटील म्हणाले, आम्ही नेहमीच एकत्र असतो पण आता बोलायला हरकत नाही की, माझ्या विजयात येथील अनेकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या उपकाराची सतत जाणीव असते. आमचे पारिवारिक संबंध आहेत. निवडणूकांचे राजकारण आम्ही फक्त आचारसंहिता लागल्यापासून त्या संपेपर्यंत करत असतो. लोकांच्या हितासाठी आम्ही कायम एकत्र असू असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT