रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील तणाव कमी होण्याचे संकेत
सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यात वाढती जवळीक
पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटण्याची शक्यता
कर्जत : कैलास म्हामले
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली दिसून येत असून, दीर्घकाळ सुरू असलेला शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष आता मवाळ होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.
रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आणि त्यांच्या विरोधात तटकरे असा राजकीय संघर्ष अनेक वर्षे पाहायला मिळाला. या वादामुळेच जिल्ह्याचे पालकमंत्री पद तब्बल दीड वर्षांपासून रिक्त असल्याची स्थिती आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळातही पालकमंत्री पदावरून मतभेद झाले होते.
दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात रायगडच्या राजकारणाचा खारीचा वाटा आहे. आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला रायगड मधूनच शिवसेनेतून विरोध होत होता त्यामुळे शिंदे गट स्थापन होऊन नव्या समीकरणे उदयास येण्यास रायगड जिल्ह्याच्या राजकारणाची किनार असल्याचे बोलले जाते. यामुळेच त्या काळात रायगडमधील आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि भरत गोगावले यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. मात्र, स्थानिक पातळीवर तटकरे आणि या आमदारांमध्ये संघर्ष कायम राहिला.
२०२४ च्या निवडणुकांदरम्यानही हा संघर्ष तीव्र झाला होता. कर्जत मतदारसंघात सुधाकर घारे यांनी अपक्ष उमेदवारी देत थोरवे यांच्याविरोधात जोरदार लढत दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचा पाठिंबा घारे यांना असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर थोरवे यांनी तटकरे यांच्यावर अनेकदा टीका केली होती.
मात्र, अलीकडील घडामोडींनी चित्र बदलताना दिसत आहे. म्हसळा आणि खोपोली येथील कार्यक्रमांमध्ये आमदार थोरवे यांनी तटकरे यांचा “तटकरे साहेब” असा उल्लेख करत, “आम्ही एकत्र काम करू” असे संकेत दिले. यामुळे दोन्ही नेत्यांतील तणाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरही भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर तिन्ही पक्षांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पूर्वी तटकरे यांच्याविरोधात भूमिका घेणारे तीनही आमदारही आता मवाळ झाले आहेत. या नव्या समीकरणाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याबाबतही चर्चांना उधाण आले आहे. थोरवे–तटकरे जवळिकीमुळे घारे नाराज असल्याची चर्चा असून, त्यांचा फोन सध्या बंद आहे. १ मे रोजी मोहपाडा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळ्यांच्या तटकरे यांच्यासोबत घरे सुद्धा व्यासपीठावर होते. त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून काही दिवस ते सार्वजनिक संपर्कात नसणार आहेत.
एकंदरीत, रायगडच्या राजकारणात “कोण कुणासोबत?” हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आगामी काळात आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी तिन्ही पक्ष एकत्र येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1. रायगडमध्ये कोणत्या नेत्यांमध्ये जवळीक वाढली आहे
सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे
2. कोणत्या पक्षांमध्ये संघर्ष होता
शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस
3. पालकमंत्री पदाचा तिढा काय आहे
दोन्ही पक्षांमध्ये या पदावरून वाद होता
4. आता काय बदल दिसत आहेत
दोन्ही नेते एकत्र काम करण्याचे संकेत देत आहेत
5. या घडामोडीचा पुढील परिणाम काय असू शकतो
पालकमंत्री पदाचा प्रश्न लवकर सुटण्याची शक्यता आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.