Aaditya Thackeray | Narayan Rane | Nilesh Rane Sarkarnama
कोकण

Rajgad Fort Rada : अंगावर धावून गेले, मारामारी, दगडफेक अन्...; असा झाला राजकोट किल्ल्यावर राडा

Akshay Sabale

Rajkot Fort Incident: मालवणधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा पडला. या घटनेचे पडसाद राज्यात उमटत असून संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून राजकोट किल्ल्यावर मोर्च्याचं आयोजन केलं होतं.

दुसरीकडे महायुतीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे सुद्धा किल्ल्यावर पोहोचले. तेव्हा, ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे राजकोट किल्ल्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

किल्ल्यावर नेमकं काय घडलं?

दुपारी 12 वाजून 10 मिनिटांच्या आसपास माजी केंद्रीय मंत्री, नारायण राणे (Narayan Rane ), माजी खासदार निलेश राणे हे समर्थकांसह राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले. विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार हे सुद्धा तिथे आले होते. वडेट्टीवार यांनी किल्ल्यावर नारायण राणे यांच्यासोबत हस्तांदोलन केलं.

नारायण राणे आणि निलेश राणे कार्यकर्त्यांसह पाहणी करून जात असतानाच 12 वाजून 18 मिनिटावेळी विरोधी पक्षनेते, अंबादास दानवे, शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी यांनी कार्यकर्त्यांसह किल्ल्यात प्रवेश केला.

आदित्य ठाकरे यांनी किल्ल्यात प्रवेश करताच राणेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यातील राणेंच्या काही कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या अंगावर धाव घेतली. दुसरीकडे प्रत्युत्तरात ठाकरेंचे कार्यकर्ते आणि आमदार वैभव नाईक हे राणेंच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा, पोलिसांना दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना रोखताना नाकीनऊ आले. आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि पुतळ्याच्या पाहणीसाठी निघून गेले.

पोलिसांनी आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, विनायक राऊत राजन साळवी, वैभव नाईक यांच्यासह पुतळ्याची पाहणी केली. मात्र, नारायण राणे, निलेश राणे हे कार्यकर्त्यांसह तिथेच थांबून राहिले थांबले होते.

माझ्या खिशात कोंबड्या नाहीत...

याप्रकरणावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी राणेंवर 'प्रहार' केला. "आम्ही किल्ल्यात निट येते होतो. ही लढाई करण्याची जागा आहे का? ही बालबुद्धी किती दिवस सहन करायची. 100 टक्के माझ्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कारण, ते मला ते घाबरतात. माझ्या खिशात कोंबड्या नाही आहेत," अशी टीका आदित्य ठाकरे यांनी.

यावेळी पोलिस नारायण राणे आणि निलेश राणे यांना समजविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ते ऐकण्याचा परिस्थितीत नव्हते. राणे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना आव्हान आणि प्रतिआव्हान देण्याचं काम सुरू होते. यावेळी दगडफेकही झाली. आदित्य ठाकरे हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असलेल्या ठिकाणी राणेंच्या कार्यकर्त्यांनी धावून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी राणे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकारही घडला. पोलिसांनी नारायण राणे, नितेश राणे आणि कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, नारायण राणे म्हणाले, "आम्ही आमच्या भागात आहोत. बाहेरचे येऊन येथे दादागिरी करणार असतील, तर आम्ही येथून जाणार नाही. वाटल्यास आम्हाला गोळ्या घाला. असे आं***, पां**** आयुष्यभर पाहिले आहेत."

निलेश राणे यांनी पोलिसांना म्हटलं, "तुम्ही त्याला आणलं कशाला... तुम्हाला वेळ सांगितली होती. चूक पोलिसांची आहे."

यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नारायण राणे आणि निलेश राणे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, निलेश राणे यांनी 10 फूटांचा रस्ता सोडलाय त्यांनी जावं, असं सांगितलं. तब्बल दीड तासानंतर, म्हणजे 1 वाजून 30 मिनिटांनी आदित्य ठाकरे किल्ल्याबाहेर पडले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी कोंबडी, पेंग्विन अशी जोरदार घोषणाबाजी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT