MLA yogesh Kadam_Nilesh Rane
MLA yogesh Kadam_Nilesh Rane Sarkarnama
कोकण

लाल दिव्यासाठी गद्दारी करणाऱ्या राणेंनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये

सरकारनामा ब्यूरो

खेड : लाल दिव्याच्या गाडीसाठी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या राणे कुटुंबीयांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवण्याची गरज नाही. गेल्या दहा वर्षांत फक्त आणि फक्त मंत्रिपदाच्या लालसेपोटी पहिल्यांदा काँग्रेस तिथून स्वाभिमान पक्ष आणि त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पुन्हा भाजप अशी वारी करणाऱ्या राणेंनी रामदास कदम यांच्यावर आरोप करणे, हेच हास्यास्पद आहे, असे उत्तर माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र, आमदार योगेश कदम यांनी नीलेश राणे यांना दिले. (Rane, who betrayed for ministerial post, should not teach us partiLoyality :Yogesh Kadam)

शिवसेनेमधून नारायण राणे बाहेर पडले, तेव्हा काँग्रेसमध्ये जाणाऱ्या आमदारांसह १३ जणांच्या यादीत रामदास कदम यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते, असा आरोप भाजपचे प्रदेश चिटणीस नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना आमदार योगेश कदम म्हणाले, राणे पक्ष सोडून गेले, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर शिवसेना नेतेपदाची धुरा दिली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या वेळी शिवसेनेचा झंझावात निर्माण करण्यामध्ये रामदास कदम यांची मुख्य भूमिका होती.

कदम यांना विरोधी पक्षनेतेपद दिले. पक्षाने भाईंना खूप दिले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राणे यांनी विरोधी पक्षनेते पद सोडल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर भाईंची पक्षनेतृत्वाने विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. त्यामुळे काँग्रेसच्या यादीत कदम पहिले होते, हे सांगणे म्हणजे पक्षांमध्ये वजन वाढविण्यासाठी केलेले नाटकच आहे. पण, अशा संधिसाधूंना कोकणातील जनता ओळखून आहे. ज्यांना पक्षाने मुख्यमंत्रीपदासह सर्वच गोष्टी भरभरून दिल्या. त्यांनी केवळ आणि केवळ फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पक्षनेतृत्वावर बिनबुडाचे आरोप करीत पक्ष सोडला, त्यांच्याकडून आम्हाला स्वाभिमानाचे सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही, असा सल्लाही त्यांनी राणेंना दिला.

आमच्या घरातील भांडणात राणेंनी पडू नये

पालकमंत्री ॲड अनिल परब यांच्यासंदर्भातील त्या क्लिप्सबाबत आमदार योगेश कदम म्हणाले की, आमची भांडणं आमच्या एका घरातील आहेत. ती आम्ही एकत्र घरात बसून सोडवू. या संदर्भात नीलेश राणे यांना तसदी घेण्याची गरज नाही.

राणे-रामदासभाईंची भेटच झालेली नाही

राणे हे ज्यावेळी पक्ष सोडून गेले, त्यावेळी रामदासभाईंची आणि राणे यांची कधीच भेट झाली नाही. त्यामुळे महाडपर्यंत आले आणि परत गेले या गोष्टीत कोणतेही तथ्य नाही, असे आमदार योगेश कदम यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT