Sindhudurg News : कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत सध्या जोरदार राजकीय बॅटींग पहायला मिळत आहे. शिवसेना-भाजप नेत्यांचे एकमेकांच्या जिल्ह्यात डोकावणे सुरू असून यावरून आता वाद सुरू झाला आहे. नुकतेच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीत भाजपच नंबर वन करू असे म्हटल्यानंतर उदय सामंतांनी सिंधुदुर्ग जिल्हा भगवा करू फक्त शिवसैनिकांनी पक्ष वाढीचे काम करावं असा सल्ला वजा आदेश दिले होते.
यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग येथे याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केलीय. यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, सुप्रिया वालावलकर आणि अन्य उपस्थित होते.
सावंत म्हणाले, महायुतीमध्ये पक्ष वाढविण्याचा हक्क सर्वांनाच आहे. त्यामुळे महायुतीची ताकद वाढत असेल तर आनंदच आहे. मात्र, महायुती व्यतिरिक्त लोकांचा प्रवेश करून घ्यावा, सल्ला देत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी टीका केली आहे. तर सध्या जो शिवसेनेत प्रकार सुरू आहे तो भरलेल्या जेवणाच्या ताटातील वाटीत किंवा वाटीतील ताटात करण्यासारखा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
उदय सामंत सिंधुदुर्गचे जिल्हा संपर्कप्रमुख असून त्यांनी येथील एका कार्यक्रमात प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. सिंधुदुर्गात आमचे दोन आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वर्चस्व शिवसेनेचं आहे. तसेच पक्षवाढीचा विचार केल्यास कोणाच्या पोटात गोळा येण्याचे कारण नाही. जसे नितेश राणे रत्नागिरीत येऊन पक्ष वाढवत आहेत तसेच आम्हीही करत असल्याचे म्हटलं होते, यावर सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तिन्ही आमदार महायुती असल्यामुळे मताधिक्याने निवडून आले आहेत. निधी आणि विविध समित्या वाटपाचे सूत्र ठरले आहे. त्यानुसार ते होईलच. पण आम्ही महायुती म्हणून शिवसेना असो की राष्ट्रवादीतील कार्यकत्यांचा प्रवेश करून घेणार नाही. तसेच त्यांनीही करावे, त्यांनी महायुती धर्म पाळावा, असे आव्हान केलं आहे.
तर पुढच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महायुतीची ताकद आणखी वाढत असेल तर आनंदच आहे. भारतीय जनता पक्षातील कार्यकत्यांचे शिवसेना पक्षात प्रवेश घेऊन ताकद वाढणार नाही. त्यामुळे आम्ही पक्ष वाढवितो म्हणून काहींच्या पोटात दुखते हे मंत्री सामंत यांचे विधान क्लेशदायक असल्याचेही सावंत यांनी सुनावलं आहे.
तसेच उदय सामंत यांनी किमान अशी वक्तव्य टाळावीत असे आवाहन केलं आहे. एकीकडे भाजपने सरकारमधील मंत्री असणाऱ्या सामंत यांना सल्ला देताना काळजी घ्या असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी भाजपचा इशारा समजत शिवसेना भाजपमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेणार नाही, असे आश्वासन दिल्याने त्यांचे आभार मानले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.