Bhaskar Jadhav, Sunil Tatkare
Bhaskar Jadhav, Sunil Tatkare sarkarnama
कोकण

सुनील तटकरेंना दिल्ली मीच दाखवली : भास्कर जाधवांचे शांत व्हायचे नाव नाही...

सरकारनामा ब्यूरो

चिपळूण : महाविकास आघाडीमध्ये धुसफुस सुरुच असते. मात्र, आता ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यामध्ये सुरु आहे. भास्कर जाधव यांनी तटकरे यांच्यावर विविध आरोप केले आहेत. खासदार सुनील तटकरे यांनी स्वतःच्या कुटुबियांसाठी आणि स्वतःसाठी विधान परिषदेची (Legislative Council) जागा घेतली. विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला मिळायला हवी असे म्हटंल्यावर त्यांना मिरच्या का झोंबल्या कळत नाही, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी तटकरे यांना लगावला.

भास्कर जाधव पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सुनील तटकरे यांनी खोट्या कंपन्या स्थापन करून सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावल्या असल्याचे आरोप झाले आहेत. तटकरेंचे माझ्यावर कोणतेच उपकार नाहीत, उलट मीच त्यांना दिल्ली दाखवली आहे. त्यामुळे जाणीव नसलेल्या या महान नेत्याला काय मार्गदर्शन करणार अशा खोचक शब्दात भास्कर जाधव यांनी तटकरे यांच्यावर निशाणा साधला.

जाधव म्हणाले, खेड तालुक्यातील आंबडस येथील मेळाव्यात २०२४ मध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत कुणबी समाजाला जागा मिळावी, असे मी म्हटले होते. यात कुणबी समाजाचा अपमान करण्याचा प्रश्नच नव्हता. कुणबी समाजाच्या मातृसंस्थेला राज्य सरकारने ५ कोटी निधीचे समर्थन दिले आहे. आणखी मदत लागल्यास ती करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला हवी म्हणताच तटकरेंना का झोंबले कळत नाही, असा सवाल त्यांनी केला. तटकरे यांनी स्वतःसाठी, मुलासाठी, पुतण्यासाठी विधान परिषद मिळवली. घरात मुलगी मंत्रीही आहे. त्यांना केवळ लोकांचे घेण्याची सवय आहे, देण्याची तर अजिबात नाही, असे जाधव म्हणाले.

नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे लावायचे आणि स्वतःमात्र कुटुंबवादी. खासदारकी, मंत्रीपद, विधान परिषद सगळे आपल्या कुटुबांतच ठेवायचे. ही त्यांची मनोवृत्ती आहे. उलट कुणबी समाजाला उमेदवारी देण्याचे टाळून त्यांनी समाजाचा अपमान केला आहे, असा आरोपही जावध यांनी केला. राजकारणात ज्यांनी ज्यांनी तटकरेंना सहकार्य केले, त्यांची तटकरेंनी माती केली. केलेल्या उपकाराची त्यांना कसलीच जाणीव नाही. उलट खोट्या कंपन्या स्थापन करून त्यांनी कोट्यावधींची माया जमवली होती. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हक्काची असलेली विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला मिळावी, ही भुमिका असल्याचे जाधव यांनी सांगितले. या वेळी गुहागरचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, माजी सभापती पप्या चव्हाण, फैसल कास्कर, राजू भागवत आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT