Uday Samant Latest Marathi News
Uday Samant Latest Marathi News Sarkarnama
कोकण

राऊतांच्या प्रचाराची पत्रके काहींनी गटारात फेकली! उदय सामंत यांचा लेटर बॉम्ब

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झालेले माजी मंत्री उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांना खुलं पत्र लिहिलं आहे. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी हे पत्र प्रसिध्द केलं आहे. यामध्ये त्यांनी रत्नागिरीत झालेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) मेळाव्याच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त करत खासदार विनायक राऊतांवर (Vinayak Raut) टीकेचा बाण सोडला आहे. तसेच आणखी काही गौप्यस्फोट केले आहेत. (Uday Samant Latest Marathi News)

विनायक राऊतांच्या उपस्थितीत सोमवारी रत्नागिरीत शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात सामंत यांच्यासह बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करण्यात आली. याविषयी सामंत यांनी म्हटलं आहे की, भाषणादरम्यान काहींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रति निष्ठा व्यक्त केली. पण ती 'काही मंडळी' कोण होती? ज्यांनी विनायक राऊत यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या निवडणुकीला नारायण राणे यांच्या आदेशाचे पालन केले...काहींनी तर प्रचाराची पत्रके गटारात फेकून दिली होती. त्यातील एकाने तर विनायक राऊत माझ्या अन्नावर जगतात नाहीतर त्यांना जेवण पण मिळू शकत नाही, असे जाहीर वर्तमान पत्रातून दिले होते.

माझा कोणावरच राग नाही पण दु:ख एकच आहे की, विनायक राऊत यांच्यासारखी एक अनुभवी व्यक्ती ज्या व्यक्तीला मी आपलं मानलं आणि आजही मानतो त्यांनी मला गद्दार, उपरा...अजून बरंच काही म्हणणं मला रुचले नाही, अशी खंत सामंत यांनी व्यक्त केली आहे. सामंत यांनी आपण उठाव केल्याचे सांगत त्याची कारणेही दिली आहेत. तसेच ही गद्दारी की धाडस हे आपण ठरवा, असं आवाहनही केलं आहे.

मी गुवाहाटीला जाईपर्यंत सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत होतो, ह्याचे साक्षीदार स्वत: राऊतसाहेब, अनिल देसाई हे आहेत आणि ज्यांच्या मध्यस्थीने मी करत होतो त्यांचं नाव मी योग्यवेळी जाहीर करेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उद्धव साहेबांचं जुळू नये यासाठी काम करणारी काही माणसं तिथं होती. हे विनायक राऊत यांनाही माहित आहे. तसं त्यांनी मला बोलूनदेखील दाखवलं, असंही सामंत यांनी म्हटलं आहे.

कालच्या मेळाव्यानंतर कुणाच्या मनात संभ्रम राहू नये म्णहून पत्रातून संवाद साधत आहे. घटक पक्षासोबतची अनैसर्गिक आघाडीसोबत राहण्यापेक्षा बाळासाहेब आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचाराने निर्माण झालेल्या युतीसोबत राहण्याचा मी निर्णय घेतला तर आत्ता सांगा माझं काय चुकलं, असा सवाल करत सामंत यांनी पत्राचा शेवट केला आहे. यापुढे कुणीही कितीही टीका केली तरी माझी प्रतिक्रिया हीच असणार, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT