Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
कोकण

Eknath Shinde : 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या भूमिकेमुळेच शिवसेचं नुकसान; मुख्यमंत्री शिंदेंची टीका

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : आपल्याच पक्षातील नेत्यांना संपविणारा पक्ष जागाच्या पाठीवर नाही. मात्र महाराष्ट्रात यापूर्वीच्या शिवसेनेने ते काम केले. आपला कार्यकर्ता मोठा होऊ लागला की त्यांच्या पोटात दुखू लागते. या पक्षातील कारस्थान राज ठाकरे, नारायण राणे, रामदास कदम यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी भोगले आहे. आपल्या पक्षातील लोक बाहेर जात असताना दरवाजे उघडे आहेत, असे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्या पक्षात बाप-लेकच राहणार आहेत. त्यांनी 'हम दो हमारे दो', 'माझे कुटुंब-माझी जाबाबदारी' असे काम केल्यामुळेच त्यांच्यावर एकटे पडण्याची वेळ आली आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

यावेळी शिंदे यांनी ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले यावरही भाष्य केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "ठाकरे म्हणत होते की मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. त्यानंतर शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री होण्याची गळ घातल्याचे ते सांगतात. मात्र मुख्यमंत्री होण्याच्या प्रक्रियेत सामिल सर्व नेते माझ्या परिचयाचे आहेत. तुम्ही सत्तेसाठी मिंदे झालात. त्यानंतर हिंदुत्वाबाबत विषय आले त्यावेळी तुम्ही शांत राहिलात. 'हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे' असे म्हणालायलाही तुमची जीभ कचरू लागली. तुम्ही बाळासाहेबांसारखी सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही."

ठाकरे शिंदे यांच्यावर काय मिंदे सरकार म्हणून टीका करत असतात. त्याचाही मुख्यमंत्री शिंदे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "तुम्ही २०१९ मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी मिंदे झालात. त्यानंतर तुम्ही हिंदुत्त्वाच्या विचारांशी प्रतारणा केलीत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर पडलो. त्यांच्या विचारानुसारच निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे वफादार आहे. गद्दार नाही खुद्दार आहे. त्याने कधी बेइमानी केली नाही. शिंदे सत्तेसाठी तुमच्यासारखा कधी मिंदे होणारा नाही. बाळासाहेबांचे विचार हीच माझी संपत्ती. तुमची संपत्ती तुमच्याकडे राहुद्या."

बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांचा विरोध केला त्यांच्यासाठी त्यांचा मुलगा आणि नातू मते मागत फिरणार, अशी टीकाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. शिंदे म्हणाले, "बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) राष्ट्रवादीला, काँग्रेसला दूर ठेवले. त्यांच्यासोबत तुम्ही जाता. राहुल गांधी राज्य जिंकू शकत नाही, तर देश कसा जिंकणार? तुम्ही अशा लोकांसाठी राष्ट्रवादी, काँग्रेससाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मते मागणार, यापेक्षा दुर्दैव ते काय असणार."

यानंतर ठाकरे यांनी आपली लोकं का सोडून जातात, याचे आत्मचिंतन करावे, असा सल्लाही दिला. शिंदे म्हणाले, "आज आपली माणसे का साडून जातात, याचा विचार करावा. ५० लोकांनी खोके घेतले, असा आरोप करताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही. ज्यांनी शिवसेनेसाठी आख्खं आयुष्य वेचले, त्यांना तुम्ही गद्दार म्हणता. मग तुम्ही काय केले? पक्षवाढीसाठी काम करताना एकनाथ शिंदेंवर १०९ केसेस आहेत. तुम्हाला बोलायचा काय अधिकार? रामदास कदमांनी कोकणात शिवसेना वाढविली. त्यांना तुम्ही संपवायला चाललात. त्यांच्या मुलाचेही राजकारण संपवायला निघालात. दोन नगरपालिका राष्ट्रवादीच्या खिशात घातल्या."

भारत जोडो यात्रेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले "बाळासाहेब म्हणते होते की काँग्रेसने देशाला लुटले. अशा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या गळ्यात गळे घालता. या यात्रेदरम्यान काँग्रेसने काश्मिरमध्ये तिरंगा फडकावला. मात्र तेथील कलम ३७० हटविण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतना नसता तर तुम्ही हे धाडस करू शकला असता का? काश्मिरमधील कलम ३७० हटविण्याचे बाळासाहेबांचं स्वप्न कोणी पूर्ण केले, त्यांच्यासोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यामुळेच जेथे जाईल तेथे हजारो लोक आशिर्वाद देण्यासाठी येतात. त्यातूनच आपला निर्णय चुकीचा नसल्याची जाणीव होते."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT