नितेश राणे यांनी मशाल चिन्ह दिसल्यास निधी रोखण्याचे विधान केल्याने तळकोकणात वाद पेटला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत राणेंची खिल्ली उडवली आहे.
अखिल चित्रे आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दमबाजीच्या भाषेवर सडकून टीका केली आहे.
Sindhudurg politics : भाजप मंत्री नीतेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची मशाल चिन्हं दिसताच, निधी रोखला जाईल, अशा विधानावरून तळकोकणात राजकीय वाद पेटला आहे. मंत्री राणे यांच्या दमबाजीच्या भाषेवर शिवसेना ठाकरे सेनेकडून, मंत्री राणे यांची खिल्ली उडणवण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे सेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी मंत्री राणे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
शिवसेना ठाकरे सेनेचे अखिल चित्रे यांनी, 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर करत, भाजप मंत्री राणे (Nitesh Rane) यांच्या 'टिल्लू लेव्हल बुद्धी'वर सडकून टोलेबाजी केली आहे. अखिल चित्रे यांनी म्हटले आहे की, अरे टिल्लू, सरकारी तिजोरीतला पैसा जनतेचा आहे, सरकारी तिजोरी स्वतःची piggy बँक नाही टिल्लू. सरकारी निधी हा सार्वजनिक पैसा आहे. तो पक्ष, चिन्ह किंवा राजकीय निष्ठेनुसार वाटता येत नाही हे 'टिल्लू-लेव्हल बुद्धी' असणाऱ्याला कसं कळणार?'
'आमचं चिन्ह, तर पैसा; नाहीतर शिक्षा, हा कारभार लोकशाहीचा नसून सत्तेच्या दडपशाहीचा भेदभावाचा कबुलीजबाब देणारा आहे. मंत्री शपथ घेतो की तो, संविधानानुसार काम करेल, कोणताही पक्षपात करणार नाही. पण असं वागणं म्हणजे लोकप्रतिनिधींच्या शपथेचा भंग आणि मंत्रीपदाचा गैरवापर ठरतो,' याकडे शिवसेना ठाकरे सेना (ShivsenaUBT) पक्षाचे अखिल चित्रे यांनी लक्ष वेधलं.
'या घटनाविरोधी, लोकशाहीविरोधी, कायदेशीर दृष्ट्याअयोग्य वागणाऱ्या सत्तेचा गैरवापर करून सरकारी निधीसाठी ब्लॅकमेलिंगग आणि सौदेबाजी करणाऱ्या ‘टिल्लू बुद्धी’च्या मंत्र्यावर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी,' अशी मागणी अखिल चित्रे यांनी केली. अशा लोकप्रतिनिधीविरोधात कारवाई न होणे म्हणजे, संविधानाच्या शपथेचा भंग, मंत्रीपदाचा उघड गैरवापर, निधीचा राजकीय सौदा करणाऱ्याला लोकशाहीला धमकावणाऱ्याला मुक संमती आहे? असा सवाल देखील अखिल चित्रे यांनी केला.
भाजपचे प्रतिनिधीच निधीसाठी वणवण फिरतात
शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत, मंत्री राणे यांच्या विधानावर टीका केली. ते म्हणाले, 'मागील निवडणुकीत माझ्या उमेदवारांना निवडून द्या, असे अनेक वेळा मंत्री नीतेश राणे बोलले आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला यश आलं. मग तुम्ही किती निधी दिला हा प्रश्न आहे? नीतेश राणेंनी आधी आपल्या लोकप्रतिनिधीना निधी द्यावा, त्यांचे प्रतिनिधी वणवण फिरत आहेत, याकडे लक्ष द्यावे,' असा टोला वैभव नाईक यांनी लगावला.
मंत्री राणे यांचे विधान काय होते
नीतेश राणे म्हणाले होते की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाजपचा पालकमंत्री असल्याने तिजोरीच्या चाव्या या माझ्याच ताब्यात आहेत. निधी कमळ आणि धनुष्यबानलाच दिला जाईल. पण कदाचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचा उमेदवार निवडून आलाच तर दिलेला निधीही मागे घेणार. त्यामुळं महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे विधान केले होते.
1. नितेश राणेंनी नेमकं काय विधान केलं?
मशाल चिन्ह दिसल्यास विकास निधी रोखला जाईल, असे विधान त्यांनी केले.
2. या विधानावर कोणाची प्रतिक्रिया आली?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
3. कोणत्या नेत्यांनी राणेंवर टीका केली?
राज्य संघटक अखिल चित्रे आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी टीका केली.
4. हा वाद कुठे पेटला आहे?
तळकोकण भागात हा राजकीय वाद अधिक तीव्र झाला आहे.
5. या वादाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
राजकीय ध्रुवीकरण वाढण्याची आणि प्रचार अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.