Shashikant Warishe News
Shashikant Warishe News Sarkarnama
कोकण

Shashikant Warishe News : दहा बाय दहाचे घर, एकही गुंठा जमीन नाही; वारीशेच्या कुटुंबाची वस्तुस्थिती

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे आज राज्याचे राजकारण ढवळून निघाले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. त्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने (State Government) एसआयटी नेमली आहे.

कोकणातील रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील कशेळीतून (ता. राजापूर) येथील वारीशे आहेत. त्यांच्या वाडीतील घरांपर्यंत पोहचण्यासाठी पायवाटेचाच पर्याय आहे. अशा अगदी ग्रामीण आणि मागासलेल्या भागात दहा बाय दहाचे छोडसे घर, घरासमोर छोटे अंगण. त्यामध्ये सांत्वनासाठी येणारी मंडळी आणि कुटुंबाचा आधार आणि बापाचे छत्र हरपल्यामुळे डोक्याला हात लावून ढसाढसा रडणारा निरागस मुलगा, असे सुन्न करणारे चित्र आहे ते अपघाती मृत्यू झालेल्या शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांचे आहे.

घर सोडले तर शेतीचा एक तुकडासुद्धा नाही. ज्याच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा तो कुटुंबप्रमुख गेल्याने पुढे काय, अशा यक्षप्रश्नात हरवलेल्या 70 वर्षाच्या आईकडे पाहिले तर आपोआप डोळ्याच्या कडा ओल्या होतात. अशी विदारक स्थिती वारीशे कुटुंबीयांची आहे.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला हादरा देणारे हे वारीशे मृत्यू प्रकरण. याविरुद्ध राज्यभरात आंदोलन करून संशयितावर कठोर कारवाईची मागणी पत्रकारांनी केली आहे.

त्यानंतर शशिकांत वारीशे (Shashikant Warishe) यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा ही विदारक परिस्थिती पुढे आली. या घटनेनंतर वारीशे यांचे चुलत भाऊ मुंबईहून आले आहेत. त्यांचा आणि वाडीतील ग्रामस्थांचा या कुटुंबाला मोठा आधार आहे. विचारपूस करताना वारीशे यांच्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याला धीर देण्याचा प्रयत्न सर्वजन करत आहेत. गावातील मंडळी मोठ्या संख्येने येऊन कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता एवढे काम करा की, या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल या दृष्टीने काही करता आले तर बघा. तेव्हा पत्रकारांनी संघटनेतर्फे आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले. वारीशे यांच्या मुलाची बारावी पूर्ण झाली आहे. आयटीआयमध्ये वर्षाच्या ट्रेडला आहे. त्यालाही पालकमंत्र्यांच्या सहकार्याने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीसाठी प्रयत्न सुरू झाले आहे.

वारीशे, त्यांची आई आणि मुलगा असे तिघेच राहात होते. ग्रामीण पत्रकारितेतून मिळणाऱ्या तुटपुंजा पगार आणि इतर किरकोळ कामांतून मिळणाऱ्या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. या कुटुंबाबाबत गावातील मंडळींनी सांगितले की, आजवर त्यांनी गावात एक तुकडा जमिनही घेतलेली नाही. आमची विनंती आहे की, या कुटुंबासाठी जेवढे काही करता येईल तेवढे करा. जमीनमाफियाने जमिनीचा एक तुकडाही नावावर नसणाऱ्या वारीशे कुटुंबीयाला अक्षरशः उघड्यावर पाडल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT