Sharad Pawar- Uddhav Thackeray
Sharad Pawar- Uddhav Thackeray  sarkarnama
कोकण

शिवसेनेचे तीन आमदार वैतागले : पवार आणि ठाकरेंच्या कार्यक्रमावर बहिष्काराचे धाडस

सरकारनामा ब्यूरो

अलिबाग : रायगड जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP) यांच्यातील मतभेद कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभ असताना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे त्यास ऑनलाईन उपस्थित राहणार असतानाही शिवसेनेच्या जिल्ह्यातील तीनही आमदारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. मुख्यमंत्री असलेल्या कार्यक्रमावर शिवसेनेच्या आमदारांचा बहिष्कार हा चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सेनेचे आमदार किती वैतागले आहेत, हेच त्यांच्या अनुपस्थितीवरून दिसते, असे यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे पडले.

पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावरील या आमदारांची नाराजी पुन्हा समोर आली आहे. उसर येथे 52 एकर जागेत जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारत आहे. यासाठी राज्य शासनाने 406 कोटी निधीही मंजूर करण्यात आला आहे. आज उसर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आणि शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. उपमुख्य मंत्री अजित पवार हे ऑनलाईन तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे आमदार, शिवसेना पदाधिकारी कोणीच उपस्थित राहिले नाहीत.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, महाडचे आमदार भरत गोगावले, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन विद्यमान आमदार आहेत. काही दिवसापांसून शिवसेनेने पालकमंत्री हटाव भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष सुरू आहे. आजच्या भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेत जिल्ह्यातील सर्वच आमदार यांची नावे टाकली असून आमंत्रणही देण्यात आली होती. मात्र आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे या तिघांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

कोकणासाठी हे महाविद्यालय महत्वाचे ठरणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. पाचशे खाटांचे हे रुग्णालय असणार आहे. कोकणातील विद्यार्थी मुंबईत जाऊन स्थिरावतात. या वैद्यकीय रुग्णालयामुळे मुंबईत स्थिरावण्याचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT