Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

शिवसेना नेतृत्वाने तीन मंत्रीपदे अपक्षांना का दिली? : भास्कर जाधवांचा खडा सवाल

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काही आमदारांच्या मनात मंत्रिपदावरून नाराजी आहे. महाविकास आघाडी स्थापन करताना शिवसेनेने (shivsena) महत्वाची खाती घेतली नाही. फक्त मुख्यमंत्रीपद घेऊन महत्वाची खाती सोडून दिली. त्याउपरही वाट्याला आलेल्या मंत्रीपदांपैकी तीन मंत्रीपदे अपक्षांना का देण्यात आली, ती सुद्धा आमदारांच्या मनात खदखद होती, असे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी स्पष्टपणे सांगितले. (Why Shiv Sena leadership gave three ministerial posts to independents: Bhaskar Jadhav)

शिवसेनेतील बंडानंतर आमदार जाधव हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी बंडखोरी, ती मिटविण्याची गरज यावर भाष्य केले. ते म्हणाले की, काही आमदारांच्या मनात मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी आहे. काही आमदारांचे म्हणणं आहे की तीन पक्षाचे सरकार स्थापन झालं. या तीन पक्षांची गोळाबेरीज ही आपल्याला आवश्यक असल्यापेक्षा जास्त असते. शिवसेनेने तीन अपक्षांना मंत्रीपदे देण्याची गरज काय होती. ज्या अपक्षांना मंत्रीपदे दिली, ते आता कुठं आहेत. त्यांना मंत्रीपदे कशाबद्दल दिली होती. सरकार स्थापन करताना मी म्हटले होते की सर्वात जास्त वेळा मी शिवसेनेत निवडून आलेलो होतो, त्यामुळे मला अपेक्षा हेाती. मात्र, त्यामुळे मी आता त्यावर बोलतोय अशातला भाग नाही. मी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कधीही बोलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जाधव म्हणाले की, आजही आमदारांच्या मनात तीच खदखद आहे. एकतर शिवसेनेने महत्वाची खाती घेतली नाहीत. आपण, फक्त मुख्यमंत्रीपद घेतले आणि महत्वाची मंत्रीपदे सोडून दिली. त्यावरही काही हरकत नाही. पण, वाट्याला आलेल्या मंत्रीपदापैकी तीन मंत्रीपदे अपक्षांना का दिली. हीसुद्धा आमदारांची खदखद होती. आता आम्ही मनाने जोडले पाहिजे. झालेल्या चुका मनमोकळ्या पणाने कबूल केल्या पाहिजेत. झाल्या नसतील तर त्यांच्या मनातील क्लिमीष दूर केले पाहिजे.

संजय राऊतांना सुनावले

संजय राऊत हे फार मोठे नेते आहेत, आमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत. त्यांना सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही. तरीही मी संजय राऊत यांना नम्रपणे सांगतो की, आव्हाने देण्याची ही वेळ नाही. ही जोडण्याचीच वेळ आहे. सतत आव्हाने कसली आणि कोणाला द्यायची. आपल्याच माणसांना आव्हाने किती द्यायची. या बंडखोरांना आव्हाने द्यावीच लागतील; पण ती योग्य वेळेला द्यावी लागतील. सगळं तुटलं आहे, असे समजून आव्हानं देण्याची ही वेळ नाही, असे माझे स्पष्ट मत आहे, असे भास्कर जाधव यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सुनावले.

बंडखोरांसोबत संवाद वाढविण्याचा सल्ला

शिवसेनेचे आमदार नाराज का आहेत, हे शोधण्याची ही वेळ आहे. त्यांची नाराजी खरी, खोटी आहे, हे समजून घेऊन ती दूर करण्याची ही वेळ आहे. आपण एकमेकांना आव्हान देण्यापेक्षा लोकशाहीचे तत्व आहे, ते संवादाचे तत्व आता अंगिकारण्याची आवश्यकता आहे. बंडखोरांसोबत संवाद वाढवण्याची गरज आहे, आव्हानं देऊ नका. संवादातून मतभेद दूर होतील, त्यातून पुन्हा कुटुंब एकरूप होऊ शकतं, असा आशावादही भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT