Pundalik Dalvi
Pundalik Dalvi Sarkarnama
कोकण

Sawantwadi News : दीपक केसरकर पुन्हा पक्ष सोडून जाणार काय? : राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी : राष्ट्रवादी पक्षामुळेच (NCP) शिक्षण मंत्री दीपक केसरकर व अनारोजीन लोबो यांचे राजकीय अस्तित्व निर्माण झाले. त्यामुळे जन्मदात्या पक्षाला तुम्ही अस्तित्व विचारात असाल तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. अर्चना घारे मतदार संघात फिरल्या, हे मंत्री केसरकरांच्या जिव्हारी लागते. आता भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलीसुद्धा आमदारकीसाठी तुमच्या मतदारसंघात फिरत आहेत. ही नाराजी मुख्यमंत्र्यांकडे मांडणार की पुन्हा पक्ष सोडून जाणार, असा टोला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज येथे लगावला. (Will Deepak Kesarkar leave the party again? : Question of NCP)

दळवी म्हणाले की, ‘‘शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी यापूर्वी दहशतवादाच्या मुद्द्यावरून राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेतली. मात्र, आज ज्यांच्यावर दहशतवादाचे आरोप केले, त्यांच्याच ओसरीला जाऊन बसल्यामुळे त्यांच्याकडे टीका करण्यासारखे काहीच उरले नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीवर आणि आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. दुसरीकडे त्यांची पाठराखण करणारे स्थानिक नेतेसुद्धा आमच्यावर टोकाचे आरोप करीत आहेत. मात्र, हे त्यांना शोभत नाही. केसरकर यांनी मतदारसंघात केलेला सर्वाधिक जास्त विकास राष्ट्रवादीकडून झाला आहे. नंतरच्या काळात त्यांनी किती विकास केला, हे जनतेनेसुद्धा पाहिले आहे.

आज आमच्या नेत्या अर्चना घारेंनी मतदार संघात लावलेला सामाजिक कार्याचा धडाडा पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणून ते आज त्यांच्यावर टीका करत आहेत. त्या मतदार संघात फिरल्या. मात्र, ठाकरेंना काहीच वाटले नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचे स्वातंत्र्य आहे. जर अर्चना घारे मतदार संघात फिरल्याने केसरकरांच्या जिव्हारी लागले, तर आज तेलीसुद्धा मतदार संघात फिरत आहेत. ही नाराजी ते मुख्यमंत्री शिंदेकडे व्यक्त करणार की पुन्हा हा पक्षही सोडून जाणार, असा सवाल दळवी यांनी केला.

टेमकर यांनी ‘अनारोजीन लोबो राष्ट्रवादीत असताना आमच्याकडून त्यांचा योग्य सन्मान झाला होता. त्यांना महिला जिल्हाध्यक्षपदासह फिरण्यासाठी गाडीसुद्धा दिली होती. मात्र, राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेल्यानंतर त्यांना सायकल तरी मिळाली का, असा प्रश्न उपस्थित केला. पक्ष सोडल्यानंतर पक्षाच्या आठवणीत रडणाऱ्या लोबो आज पक्षावर टीका करत आहेत. ज्या पक्षाने जन्म दिला, त्याचे ऋण त्या टीका करताना विसरत आहेत. मग त्यावेळी लोबोंच्या डोळ्यातून वाहिलेले अश्रू मगरीचे होते का, असा टोलाही त्यांनी लगावला.

घारेंवर उपऱ्याची टीका करणे एक महिला म्हणून लोबोंना शोभत नाही. त्या घारे यांना विद्यार्थी दशेपासून पाहत आल्या आहेत. याचा लोबोंना विसर पडला असेल तर घारे यांचे शाळेचे दाखले, सातबारा पाठवून देतो, असा टोला सौ. बाबर-देसाई यांनी लगावला.

आमच्या नेत्या घारे-परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निवडून येत चांगले काम केले आहे. त्यांचे शालेय शिक्षण येथेच झाल्यामुळे त्यांच्यावर उपऱ्याची टीका करणे योग्य नाही. महिलादिनी महिलांचा सन्मान करण्याची केलेली भाषणे लोबो विसरल्या का, असा सवाल दुभाषी यांनी उपस्थित केला.

... त्याच दिवशी राजकीय संन्यास घेईन

पुंडलिक दळवी मंत्री केसरकर यांच्याकडून कामे घेऊन जातात, असे वक्तव्य माजी नगरसेविका अनारोजिन लोबो यांनी केले होते. यावर मी केसरकरांकडून वैयक्तिक स्वार्थाचे एक जरी काम करून घेतले असल्यास ते जाहीर करा. त्याच दिवशी राजकीय संन्यास घेईन, असे प्रत्युत्तरात्मक आव्हान दळवी यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT