Pre-marital background check Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

Lohgad Murder Case : लोहगड हत्याकांडाचे पडसाद! लग्नाआधी 'प्री-मॅरिटल बॅकग्राउंड चेक'मध्ये मोठी वाढ

Pre-marital background check Maharashtra : लोहगड हत्याकांडानंतर महाराष्ट्रात लग्न ठरवण्यापूर्वी वधू-वरांची पार्श्वभूमी तपासण्याचा ट्रेंड वाढत आहे. जाणून घ्या नेमकं काय बदललं.

Rashmi Mane

लोहगड किल्ल्यावर घडलेल्या गाजलेल्या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लग्न ठरवण्यापूर्वी होणाऱ्या वधू किंवा वराची सखोल माहिती मिळवण्यासाठी अनेक कुटुंबे आता खासगी गुप्तहेर संस्थांची मदत घेत असल्याचे समोर आले आहे. केवळ नातेवाईकांकडून चौकशी, नोकरीची माहिती किंवा पत्रिका जुळवणे यावर विसंबून न राहता, व्यक्तीची संपूर्ण पार्श्वभूमी तपासण्याकडे पालकांचा कल वाढला आहे.

पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर जून महिन्यात केतन अगरवाल या तरुणाचा त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने कड्यावरून ढकलून खून केल्याचा आरोप असलेल्या घटनेनंतर अनेक कुटुंबांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. या प्रकरणामुळे विवाहापूर्वी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याची भावना बळावली असून, "प्री-मॅरिटल बॅकग्राउंड चेक" करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे सांगितले जात आहे.

खासगी तपास संस्थांकडून सर्वप्रथम संबंधित व्यक्तीचे पूर्वीचे प्रेमसंबंध, सोशल मीडियावरील हालचाली आणि मित्रपरिवाराची माहिती पडताळली जात आहे. त्याचबरोबर मोठे आर्थिक कर्ज, न्यायालयीन खटले, व्यावसायिक वाद किंवा फसवणुकीशी संबंधित बाबींचीही माहिती गोळा केली जाते. बायोडाटामध्ये नमूद केलेले शिक्षण, नोकरी, पगार आणि व्यावसायिक माहिती खरी आहे का, याचीही खात्री केली जाते. याशिवाय मद्यपान, जुगार किंवा इतर कोणत्याही गंभीर व्यसनांचा इतिहास आहे का, याची गोपनीय चौकशीही केली जात आहे.

या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याने काही विवाह प्रस्ताव सुरुवातीलाच रद्द होत असल्याची माहिती तपास संस्थांनी दिली आहे. एका प्रकरणात तरुणीचे तिच्या जुन्या महाविद्यालयीन मित्राशी साधे संभाषण सुरू असल्याचे समजल्यानंतर मुलाच्या कुटुंबाने साखरपुडा मोडल्याचे सांगितले जाते. तर मुंबईतील एका प्रकरणात मुलाने स्वतःवरील मोठे कर्ज आणि सुरू असलेले कायदेशीर वाद लपविल्याचे उघड झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबाने विवाहास नकार दिला.

ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाइट्स आणि डेटिंग ॲप्सच्या वाढत्या वापरामुळे अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढला आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी पालक आणि कुटुंबिय अधिक सतर्क झाले असून विवाहापूर्वी सखोल पडताळणी करण्यावर भर देत आहेत.

दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी आणि वकील वाय. पी. सिंग यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे की, "कायदेशीर आणि सुरक्षित मार्गाने सार्वजनिक नोंदी तपासणे हा गुन्हा नाही. खाजगी गुप्तहेरांद्वारे सामान्य माहितीची शहानिशा करणे किंवा विचारपूस करणे गुन्हा ठरत नाही. मात्र, कोणाचा बेकायदेशीर पाठलाग करणे, खाजगी कॉल डिटेल्स, मेसेजेस किंवा ईमेल हॅक करणे हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT