MVA  Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election News : महाविकास आघाडीतील वाद विकोपाला? काँग्रेस भाजपला नव्हे ठाकरेंना देणार धक्का?

Rashmi Mane

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुणाळी सध्या सुरू आहे. कोणत्या मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार, कोणत्या पक्षाचा नेत्याला उमेदवारी जाहीर होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. त्यातच महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपावरून सुरू असलेली धुसफूस अखेरीस चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेने केलेल्या जागावाटपांचा फेरविचार केला जावा, ही काँग्रेसने केलेली मागणी शिवसेनेने फेटाळल्याने काँग्रेसने पाच लोकसभा मतदारसंघांत शिवसेना ठाकरे (ShivsenaUBT) गटाच्या विरोधात मैत्रीपूर्ण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काँग्रेसमधील काही लोकांनी दिली आहे.Election Strategies

महाविकास आघाडीमध्ये सहभागी असताना सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या पाच मतदारसंघांमध्ये काँग्रेस त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत. विशेष म्हणजे प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत झालेल्या या निर्णयाच्या प्रस्तावाला काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनीदेखील हिरवा कंदील दाखविला आहे. Current News about Maharashtra Mahavikas Aghadi Politics.

भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार उभे करून एकजुटीने लढा द्यावा, या हेतूने उभ्या राहिलेल्या महाविकास आघाडीला काँग्रेसच्या मैत्रीपूर्ण लढतींमुळे खीळ बसणार आहे. महाविकास आघाडीमध्ये सहभागी असताना 48 पैकी पाच ते सहा जागांवर काँग्रेस वेगळी चूल मांडण्याच्या विचारात आहे. या पाच जागेवर काँग्रेसचा उमेदवार उभा करत असल्याने महाविकास आघाडीतील वाद चव्हाड्यावर आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतील सहा जागांपैकी तीन जागा घ्याव्यात, असा प्रस्ताव काँग्रेसने शिवसेनेला दिला होता. मात्र, शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळत काँग्रेसला मुंबईत उत्तर पश्चिम मुंबई हा एकच मतदारसंघ दिला. काँग्रेस इच्छुक असणाऱ्या मतदारसंघात उमेदवारांची घोषणाही त्यांनी केली. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना काँग्रेसला (Congress) संपवत असल्याची नाराजी कार्यकर्ते उघडपणे करू लागल्याने अखेरीस वादग्रस्त जागांवर शिवसेनेच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाविकास आघाडीतील जागावाटपावरून काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला मुंबईचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 2004 आणि 2009 मध्ये मुंबईच्या सहा लोकसभा (Loksabha Candidate) मतदारसंघांपैकी पाच - पाच जागा काँग्रेसने जिंकलेल्या असताना आता केवळ एका जागेवर कसे काय लढायचे असा सवाल काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी केला. मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत एकही जागा मुंबईत काँग्रेस जिंकलेली नाही. मात्र, काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान झालेले आहे. आपले कार्यकर्ते आणि मतदार या दोघेही यामुळे विखुरतील अशी चिंता या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी कायम ठेवून मुंबई, सांगली, भिवंडी या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करण्यावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती मिळत आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT