Uddhav Thackeray, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : ठाकरे गटाचे खासदार असलेल्या 'या' तीन जागांवर भाजपचा 'डोळा'; लढण्याची तयारी पूर्ण

Sachin Waghmare

Mumbai News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास फायनल होत आलेले आहे. दुसरीकडे मात्र महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील जागावाटप रखडले आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत पुढील आठवड्यात दिल्लीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपचा डोळा उद्धव ठाकरे गटाचे पाच खासदार निवडून आलेल्या जागांवर असून त्यापैकी तीन जागासाठी भाजप आग्रही असल्याचे समजते.

महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वीच दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर शुक्रवारीच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिल्लीवरून बोलावून घेण्यात आले होते. त्यामुळे आता लवकरच महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु होण्याची होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यातील 30 ते 32 जागा लढविण्याची शक्यता आहे. त्यापैकी उर्वरित 16 ते 18 जागा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोडण्यात येणार आहेत. त्याशिवाय शिंदे गटातील काही खासदारांनी कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महायुतीचा फॉर्म्युला काय असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

'या' तीन जागा भाजप लढणार

शिवसेनेचे जे पाच खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत, त्या जागांवर भाजपचा डोळा आहे. पाचपैकी तीन जागा लढविण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. दक्षिण मुंबई, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, ठाणे, धाराशिव, परभणी या पाच जागापैकी धाराशिव, सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि ठाण्याच्या या तीन जागा भाजप लढणार असल्याचे समजते. ठाण्यातून संजीव नाईक, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर हे इच्छूक आहेत तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून शिवसेनेतील एक बडा नेता कमळ चिन्हावर लढण्यास तयार असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतील सहापैकी चार जागा भाजप लढणार

मुंबईतील सहा जागापैकी चार जागा भाजप (BJp) लढणार आहे तर दोन जागा एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाला सोडण्यात येणार आहेत. मुंबईत अजित पवार (Ajit Pawar) गटाला एकही जागा दिली जाणार नसल्याचे समजते. तर विदर्भातील दहा जागांपैकी सहा जागा भाजप लढणार आहे तर तीन जागा शिंदे गटाला तर एक जागा अजित पवार गटाला सोडण्यात येणार असल्याचे समजते.

SCROLL FOR NEXT