महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीन परत यावी, अशी आमची भूमिका असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिली. तिची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांच पथक तयार करण्यात येईल. राज्य सरकार नांदणी मठासोबत पूर्ण ताकदीनिशी सोबत राहिल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दहा वाजता दिल्लीकडे रवाना होणार आहे. गेल्या आठवड्यातच एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करून आले होते. आता पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने त्यांचा हा दौरा चर्चेत आला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा उद्याचा दिल्ली दौरा नियोजित असतानाच, तत्पूर्वीच एकनाथ शिंदे दिल्ली गाठत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दिल्ली लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राहुल गांधी यांचा बालिशपणा देशानं पाहिला आहे. त्यांना बडबड करत राहू देत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली. एनडीएच्या बैठकीला पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. तसेच ऑपरेशन सिंदूर, राम जन्मभूमि, जन्मू-काश्मीरमधील कलम 370, बिहारच्या मतदार याद्या आणि अमित शाह यांच्या गृहमंत्रीपदाचा कार्यकाळाचं पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलं.
पुण्याच्या कोल्हेवाडी इथं वाहनाला कट मारल्याच्या रागातून हवेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. अभिजीत चव्हाण याने हा गोळीबार केल्याचे समजते. यासाठी गावठी पिस्तुलाचा वापर झाला असून, सहा आरोपी ताब्यात घेण्यात आले. गेल्या 24 तासांत पुण्यात दोन गोळीबाराच्या घटना झाल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या आर्थिक नियोजनावर ताण आला आहे. त्यामुळे यंदा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा परिणाम म्हणून आनंदाच्या शिधा योजनेला यंदा ब्रेक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, शिवभोजन थाळी या स्वस्तात भोजन पुरवणाऱ्या योजनेतही काटकसरीचे संकेत आहेत.
15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याच्या सुरक्षिततेमध्ये त्रुटी आढळल्याचे समोर आलं आहे. दिल्लीचे स्पेशल पोलिस पथक डमी बाॅम्बसह किल्ल्यात शिरल्यानं सुरक्षिततेवरील सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
माजी आमदार बाबाजानी दुर्रानी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याची मध्यतंरी चर्चा होती. परंतु सात ऑगस्टला मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्लीत एनडीएचं बैठक होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आपण गप्प बसायचं नाही, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. शिवाय राष्ट्रवादी ही एकमेव पार्टी आहे, जी युतीमध्ये असूनही छत्रपती, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
शक्तीपीठ महामार्ग आता तिलारी आणि रेडीपर्यंत विभागून नेण्याचा प्रयत्न सुरू असून या संबंधित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.
महादेवी हत्तीणी संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील कबुतरखान्यांवर महानगरपालिकेने कारवाई सुरु केल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला आहे. पालिकेने दादरचा कबुतरखाना बंद केल्यामुळे याठिकाणी खायला मिळत नसल्याने कबुतरांचा मृत्यू होऊ लागल्याचे सांगत जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या भुमिकेला राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या पाठिंबा दिला. शिवाय सरकारने कबुतरखाने तडकाफडकी बंद करु नयेत, अशी भूमिका घेतली. दरम्यान, याच प्रकरणी बैठक घेऊन मध्यम मार्ग काढण्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं होतं. त्यानुसार आज कबुतरखान्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज सकाळी साडे नऊच्या सुमारास एनडीएच्या सर्व खासदारांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू असतानाची ही पहिलीच महत्वाची बैठक आहे.
दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्य घटनेनंतर गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. त्यानंतर आता पाचव्या दिवशी गावातील दुकाने उघडण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे. मात्र, सकाळी 6 ते 11 पर्यंतच जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे. 11 नंतर पुन्हा जमावबंदीचे आदेश लागू असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.