उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाकरेंचा आवाज शिवाजी पार्कवर घुमणार आहे.
नेपाळमध्ये इंटरनेट बंदीच्या विरोधात तरुणांनी उठाव केल्यानंतर यादवी सुरू झाली आहे. येथे प्रचंड विरोध वाढल्यानंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींही आपला राजीनामा दिला आहे. जमावाने संसद पेटवून दिली आहे. तर पंतप्रधानांचं घर पेटवलं. नेपाळमध्ये एवढी हिंसा ही फक्त सोशल मीडिया बंद करण्याने झाली की या मागे काही वेगळं कारण आहे याची चर्चा सुरू आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली असून याला अमेरिकेला जबाबदार धरलं आहे. त्यांनी, अमेरिका दक्षिण आशियात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी बांगलादेश आणि नेपाळमधील संकटांचा फायदा घेत असल्याचा दावा केला आहे.
नेपाळनंतर आता युरोपमधील एका बलाढ्य देशात सरकारविरोधात हिंसक आंदोलन सुरु झालं आहे. फ्रान्समधील जनता सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे असून इमॅनुएल मॅक्रोन सरकारच्या धोरणांच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन सुरु केलं आहे. राजधानी पॅरिसमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केली आहे. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ हे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे. देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळामुळे डाग लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे. छगन भुजबळांना आवर घालण्याची किंवा त्यांना तुरुंगात पाठवावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. येथे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर आहेत. त्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढू अशी ग्वाही देणाऱ्या खा.प्रणिती शिंदे यांनी मात्र तालुक्यातील बहुतांश गावातील प्रश्नाकडे पाठ फिरवल्याने आगामी निवडणुकीला कशा सामोरे जाणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
राज-उद्धव भेटीवरून भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, ‘एकदाचं काहीतरी ठरवा. दोघेही एकत्र येण्यास कुणालाही आक्षेप नाही. भेटींवरून अफवा पसरतात. कुछ तो होगा, पण काही घडत नाही.' महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्रित लढवावी, असे मुनगंटीवार म्हणाले.
ओबीसी आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीवर मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी, "जातीवाद करण्यासाठी ही उपसमिती असू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. गोरगरीब मायक्रो ओबीसींसाठी या उपसमितीच्या माध्यमातून काम व्हावं. जातीवादी दिसेल, असं आढळून येऊ नये. मराठ्याच्या उपस्थितीमध्ये ओबीसीचे मंत्री घेतले जातात. ओबीसीच्या उपसमितीमध्ये मराठ्यांचा एकही मंत्री नाही, हे विचार करण्यासारखी गोष्ट, यावर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्ष द्यावे," अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
आज झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, उद्या राज ठाकरेंनी मनसेंच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
नेपाळमधील परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील नागरिकांना केंद्राने सूचना दिल्या आहेत. नेपाळला प्रवास टाळावा. जे नागरिक तिथे आहेत त्यांनी घरातच सुरक्षित राहून स्थानिक प्रशासन व भारतीय दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
+977-980 860 2881 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध) +977-981 032 6134 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)
उद्धव ठाकरे शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीत राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेही उपस्थित राहणार आहे. ठाकरे बंधूंच्या या भेटीला विशेष महत्त्व दिले जात असून महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण घडण्याची शक्यता वर्तवली जाते.
छगन भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा आहेत , त्यांना जेलमध्ये घाला असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. भुजबळ हे सरकार आणि फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत. भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावं असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यातील आंबेडकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जनआंदोलन सुरू करण्यात आलं आहे. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. या कायद्याच्या आडून सरकार जनतेचा आवाज दाबत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे.
कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा काका अजित पवारांची पाठराखण केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत अजितदादांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचं म्हटलं आहे. तसंच मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील! राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो पक्षात "चहापेक्षा किटली गरम असणारे" एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज जिल्हा आणि विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम बीडमध्ये दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग रचनेनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत हे पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबक पालिका निवडणुकीची रणनीतीची चर्चा करण्यासाठी आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महापालिका निवडणुका स्वबळावर लढायच्या का महायुतीत लढायच्या यावर कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये निवडणूक लढण्याची रणनिती ठरवण्यासाठी मंत्री उदय सामंत पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. प्रभाग रचनेनंतर शिवसेना पदाधिकारी व्यक्त केली होती. बैठकीत निवडणुका स्वबळावर लढायची की महायुतीत लढायच्या यावर कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 14 वी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज होणार आहे. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार आहेत. विष्णू चाटे सुदर्शन घुले सह इतर आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आज न्यायालयामध्ये युक्तिवाद होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटण्यास सुरुवात केली आहे. २ सप्टेंबर रोजी काढलेल्या हैद्राबाद गॅझेटिअरच्या जीआरनुसार ही प्रक्रिया सुरू झाली.
मुरबाड नगरपंचायती परिवर्तन पॅनलमधील तब्बल 8 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. भाजपकडून निधी मिळत नसल्याचे सांगत शिंदेंना साथ देणार असल्याच्या प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी सांगितले.
लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे हप्ता न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र, लाडक्या बहिणींना लवकरच गूड न्यूज मिळणार आहे. सरकारने 344 कोटींचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा निधी जमा केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.