राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. पवार यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधत उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. मात्र ते आमच्या विचारांचे नसल्याने आम्ही नकार दिला. इंडिया आघाडीकडून सुदर्शन यांनी उमेदवारी दाखल केली असून आमच्याकडे मतसंख्या कमी असली तरी चिंता नाही.
राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. दरमहा मिळणारा पगार यंदा 5 दिवस आधी देण्यात येणार आहे. 27 ऑगस्टला गणेशोत्सवाचे आगमन होत असून, सणासुदीच्या खर्चामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पगार आगाऊ मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यभरात आज बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जीवनातील सोबती असलेल्या बैलांचे औक्षण करून त्यांचे पूजन करण्यात आले. पारंपरिक रितीरिवाजांनुसार बैलांची नजर उतरवून त्यांना सजवण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून शेतकऱ्यांनी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण भागासह शहरांमध्येही हा उत्सव जल्लोषात पार पडला. यावेळी शेतकरी आणि बैलगाडीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सणाला रंगत आणली. बैलपोळ्याच्या निमित्ताने गावोगावी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात अखेर तोडगा निघाला आहे. गणेश मंडळांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून मानाचे गणपती सकाळी 9:30 वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांकडून ढोल-ताशा पथकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मिरवणूक अधिक शिस्तबद्ध आणि वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी प्रशासनासोबत सहकार्याची भूमिका घेतली असून विसर्जन सोहळा उत्साहात, पण शिस्तीत पार पडावा यासाठी एकमत साधले गेले आहे.
नंदुरबार जिल्हा हा संवेदनशील जिल्हा असल्याने येणाऱ्या सण उत्सव आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या विशेष उपस्थितीत शांतता समितीची महत्त्वाची बैठक नंदुरबार पोलीस मुख्यालयात पार पडली. शांतता समितीच्या बैठकीला समितीचे सदस्य पदाधिकारी यासोबतच गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रीय ध्वज फडकवला म्हणून नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बिनागुंडा गावात ही घटना घडली. कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा गावात मुनेश नूरूटी या तरुणाची स्वातंत्र्यदिनी भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकावल्याने नक्षलवाद्यांनी हत्या केली.
नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन अजित पवारांनी सूचक विधान केलं आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील. कुणाचे ७ आमदार कुणाचा एक आमदार हे विचारायचं कारण नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन केली असून विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ तपास पथकाचे प्रमुख असणार आहेत.
लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे." ओबीसीमध्ये फूट पाडणे, हा षडयंत्राचा भाग आहे. मी अशा पद्धतीने बोलणं म्हणजे एवढा, पण लक्ष्मण हाके मूर्ख नाही किंवा माझी एवढी पण वैचारिक दिवाळखोरी नाहीये. ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे, यापुढे अशा पद्धतीने प्रयोग होणार आहेत, या अगोदर देखील असे प्रयोग झालेले आहेत. माझी गाडी देखील फोडण्यात आली आहे. मला मारहाणीचा देखील प्रयत्न झालेला आहे. ओबीसी चळवळीमध्ये फूट पडेल किंवा ओबीसी चळवळ डॅमेज करण्याचा प्रयत्न होत असेल तर, ओबीसी बांधवांनी ते करू नये," असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती', मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांची फक्त सभा घेण्यापूर्वी ताकद, त्यांना मत पडत नाहीत, त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट फक्त जमत, असे म्हणत आठवलेंनी डिवचलं आहे. रामदास आठवले धाराशिव दौऱ्यावर आहेत.
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करणारे लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावर तोफ डागली. "राष्ट्रवादीने मनोज जरांगे पाटलांना मोठं केलं. शरद पवार,राजेश टोपे, बजरंग सोनवणे, पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसनं जरांगे यांना रसद पुरीली. जरांगेच्या भूमिकेबद्दल या लोकांनी सांगावं आणि मग मंडल यात्रा काढावी. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, यांना मंडल यात्रा काढण्याचा नैतिक अधिकार कोणी दिला? स्वतःचं कुटुंब सांभाळणारे शरद पवार त्यांच्याच घरात सर्व पदे आहेत. ओबीसी तरुणांना चांगलं कळतं हे मगरीचे आसू आहेत," असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.
भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये टाकण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचा आदेश बदलला असून, कुत्र्यांना वैक्सीन दिली जाईल आणि पुन्हा त्याच क्षेत्रात सोडले जाईल. परंतु सार्वजनिक ठिकाणी अन्न दिलं जाणार नाही. अन्न देण्यासाठी वेगळी सोय करावी. नसबंदी करून पुन्हा कुत्र्यांना सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना, या केसचा पॅन इंडिया विस्तार केला आहे. भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना 25 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. प्राणीप्रेमी कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी एमसीडीकडे अर्ज करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
पंढरपुरातील चंद्रभागा नदीला महापूर आला असून, महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. उजनी व वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. सध्या पंढरपुरात चंद्रभागा नदीमध्ये एक लाख 70 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या सकल भागामध्ये पुराचे पाणी शिरले असून, जवळपास 300 हून अधिक कुटुंबांना व 700 ते 800 नागरिकांना सुरक्षित स्थळी घालवण्यात आले आहे..
धाराशिवच्या सारोळा गावात मराठा आंदोलकांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा ताफा अडवला आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबई येण्याची वेळ येऊ देवू नका, त्यापूर्वीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आंदोलकांनी मंत्री आठवलेंकडे केली. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची रामदास आठवले यांच्यासमोर 'एक मराठा लाख मराठा' अशी जोरदार घोषणाबाजी केली.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "संविधान पायदळी तुडवून, पक्ष फोडणं, आमदार फोडणं, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, शरद पवारसाहेबांचा पक्ष फोडला, याच पक्षांकडे आता मतं मागत आहात. आपल्याकडे बहुमत असून, इतर पक्षांकडे मत का मागता? तुम्हाला भीती वाटते की, तुमची मतं फुटतील, डुप्लिकेटचे शिवसेनेचे मतं फुटतील? अशी भीती आहे. पण त्यांनी फोन करणं, म्हणजे शिष्टाचार आहे." देवेंद्र फडणवीसांनी चाणक्य नीती शिकवू नये,असा देखील टोला संजय राऊतांनी लगावला.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार नवाब मलिक यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानच्या 'मुंबई निवडणूक व्यवस्थापन समिती'च्या अध्यक्षपदी नवाब मलिक यांच्याकडे देण्यात आले आहे.
अमित शाह यांच्यावर सोराबुद्दीन प्रकरणी सामना अग्रलेखात टीका करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोम्बा. हिंदुत्व सोडून राहूल गांधीचे मांडलिकत्व स्वीकारून कॅाग्रेस अंकीत झालेल्या संजय राऊत हे ‘नया मुल्ला जोरसे बांग देता है’ या म्हणी प्रमाणे भाजपा नेत्यांवर रोज टीका करत असून राहूल गांधी सुंध्दा त्यांचे चाळे पाहून ‘नया है वह…’ म्हणत हसत असेल. बाकी सोडा आपले पूर्वीचे सोहराबुद्दीन प्रकरणातील सामनाचे अग्रलेख तरी आठवायचे होते, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले, खिलार किंवा देशी गाईची कधीच विक्री होत नाही. जेव्हा शेतकऱ्यांच्या गाड्या अडवायला सुरवात झाली तेव्हा मी त्यांची बाजू घेतली. मला धमक्या आल्या. अरे धमक्या कोणाला देता, शेतकऱ्यांच्या पोराला म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय, तुम्ही जर माझ्या वाटेला गेला. तर तुमच्या **** नांगर फाळ घातल्याशिवाय राहणार नाही.
बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये औषध कंपनीत वायूगळती होईन चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, चार जणांनची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती, कमलेश यादव यांचा समावेश आहे. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ १३ मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड कंपनीत ही वायुगळती झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.