एकंदरीत बीड धाराशिव संभाजीनगर जिल्ह्यातून जे काही चित्र येत आहे तिथं भयानक असं नुकसान झाला आहे. हे नुकसान मोजू पण शकत नाही. त्यामुळं केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यापेक्षा मदतीचा हात पुढे जाणं गरजेचं आहे. त्यांच्यावर दमदाटी करण्यापेक्षा जे पाहिजे ते त्यांना भेटणे अपेक्षित आहे. सरकारने जास्तीत जास्त मदत वितरित करणे गरजेचे आहे, केवळ घोषणा करून चालणार नाही. बिहार राज्यामध्ये निवडणुका आहेत तिथे पैशांच्या अमाप घोषणाच नाही तर पैसेही वितरित करायला लागले आहेत. इतर राज्यांतही नुकसान झालं आहे पीएम केअर फंडातून मदत यावी ही आमची अपेक्षा आहे.
ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा ठिणगी पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही. यातच नाईकांच्या जनता दरबारानंतर ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलंच बिनसल्याची चर्चा आहे. ठाणे जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीसाठी वनमंत्री गणेश नाईक गैरहजर आल्यामुळे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या बांधवांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे. आत्महत्या करण्याच्या वाटेला अजिबात जाऊ नका, काळजी करू नका. आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. मला खात्री आहे की, आम्ही त्यामध्ये विजय मिळवणार असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
28 सप्टेंबर 2025 ला होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आता 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
शेतातील पाणी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पाहिले आहे. नुकसान मोठे आहे. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढणे गरजेचे आहे. सध्या शासनाकडून दिली जाणारी हेक्टरी साडे आठ हजाराची मदत पुरेशी नाही. वाढीव मदत मिळाली पाहिजे. या करिता मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून आपण पाठपुरावा करणार असल्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या लातूर पाहणी दौऱ्यात म्हटले आहे.
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या सरकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांच्यावर असलेल्या आरोपांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच संकेत घरत यांचा तात्काळ चार्ज काढून टाका, असे स्पष्ट आदेश देत, योग्य अधिकाऱ्याची निवड का झाली नाही, याचाही तपास करण्याचे निर्देश शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.
पुणे दौऱ्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवारांनी राजकीय भूमिका मांडली. यावेळी, नाव न घेता त्यांनी आपल्या चुकांवर पांघरुन घालायला आधी साहेब होते, आता आपल्यालाच पांघरुन घालायचे आहे, असे म्हणत शरद पवारांची आठवण काढली. तसेच, कार्यकर्त्यांना सबुरीने वागण्याचा सल्लाही दिला.
काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi) मराठवाडा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून दसऱ्या आधीच राहुल गांधी मराठवाड्यातील पूरग्रस्त पीडितांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली. तसेच, आपल्या दौऱ्यात कल्याणमधील साडी प्रकरणातील जेष्ठ कार्यकर्त्याची भेट घेऊन काँग्रेसच्यावतीने त्यांचा सन्मानही केला जाणार असल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाचा तपास अतिरिक्त करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २६ जुलै २०२३ रोजी तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई केली होती. यामध्ये तपासाअंती सात सराईत गुन्हेगारांना अटक केली.
दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राऊत यांनी दिला. जनतेच्या , शेतकऱ्याच्या प्रश्नांवर या विषायवर 11 ऑक्टोबरला शिवसेना प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहे, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील असंही राऊतांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा हा भव्य मोर्चा असेल. यापूर्वी 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात शिबीर होणार होतं. मात्र या परिस्थिती ते शिबीर घेणं शक्य नाही. म्हणून सर्व जिल्ह्यातून शेतकरी एकत्र येणार होते, त्याचं रुपांतर मोर्चात व्हावं आणि आपल्या मागण्यासाठी सरकार दरबारी आवाज उठवावा असं ठरलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
'तेरे मे इतकी हिमत है तो माजलगाव मे आ, आय लव बॅनर लगाने वाले को तू अरेष्ट करेगा, तो कसम खुदा की, मुस्तफा मशिद के सामने से उस टकले को चॅलेंज करता हु, यहा तुझे दफना दिया जायेगा', असं वादग्रस्त वक्तव्य बीडच्या माजलगाव इथल्या 'आय लव मोहम्मद' या कार्यक्रमात एका मौलवीने केला आहे. या विधानावरून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ इथल्या स्मशानभूमीत झेंड्याचे चौथऱ्याचे बांधकाम करण्याच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राज्य बाजार समितीचे सभापती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब बन्सी नाहाटा यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलिस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
धाराशिव इथले जिल्हाधिकारी यांच्या नृत्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टिका केली. जिल्हाधिकारी असंवेदनशील वागले, कारवाई झाली पाहिजे. शेतकरी आत्महत्या करत आहे अन् कार्यक्रम घेणं चुकीचे आहेत, असे खासदार निंबाळकर यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौऱ्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या शनिवारी सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. सीना नदीला आलेल्या पूर परिस्थिती आणि नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी ही माहिती दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा काँग्रेस कार्यकर्त्याकडून त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला, यावेळी कर्जमाफी झाली पाहिजे, अशा जोरदार घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.
अमरावती पंचवटी चौकात काँग्रेस अन् भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमने-सामने आले. काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला, तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी बँड बाजा वाजवत मोठा जल्लोष केला. काँग्रेसने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. परंतु काँग्रेस अन् भाजप आमने-सामने आल्याने जोरदार घोषणाबाजी झाली. ट्रॅक्टरवर चढून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस अन् भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमने-सामने आल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. भाजपचा अमरावती इथं मेळावा होत आहे.
शक्तिपीठ आणि कुंभमेळ्यासाठी ठेवण्यात आलेला निधी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याकंडे वळवावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीकेली. मदतीच्या संदर्भात पैशाचे सोंग आणता येत नाही, असे अजित पवार यांच्या विधानावर किती असंवेदनशील आहे, अशी टिका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
लेहमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस आणि निमलष्करी दलाने गुरूवारीपासून जमावबंदी आदेश लागू केले. तसेच एकूण ५० जणांना अटक केली. कारगिलसह इतर प्रमुख शहरांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालणारे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
बीडच्या टोकवाडी येथे आत्माराम भांगे यांनी ओबीसी आरक्षण संपल्याच्या विवंचनेतून गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. भांगे हे ऑटोचालक असून त्यांची दोन मुलं पोलीस भरतीची तयारी करत होते. अशातच ओबीसी आरक्षण संपल्याच्या धक्क्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती भांगे कुटुंबियांनी परळी ग्रामीण पोलिसाना दिली आहे. त्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महिला व बालविकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2 हजार रूपये देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी दिली आहे. यासाठी शासनाने 40.61 कोटींचा निधी उपलब्ध करत त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधकांसह शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी सुरू आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंजाब सरकार शेतकऱ्यांना जास्तीची मदतं देऊ शकतं तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने आणि जगण्यासाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. आज पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला 50 हजार रुपये आर्थिक मदत करत असेल एका हेक्टरला, तर मग महाराष्ट्रानं साडेआठ हजार रुपये का करावे?'
पुणे शहरातील ट्रॅफिकपासून सुटका व्हावी यासाठी आता पुणे पोलिसांकडून शहरातील सुमारे 500 सिग्नल जंक्शनवर AI तंत्रज्ञानावर आधारित 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (ITMS) उभारण्यात येणार असून या नव्या सिस्टीमसाठी तब्बल 1100 कोटींचा खर्च होणार आहे. ही नवी सिस्टीमचं काम येत्या 3 महिन्यांत सुरू होणार असल्याची पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' ही सिग्नल यंत्रणा गाड्यांचा वेग, त्यांची संख्या तसंच प्रवासाचा वेळ आणि पीक अवर मधील ट्रॅफिकचा अभ्यास करून ऑटोमॅटीक सिग्नल सेट करते. 'एआय'च्या साहाय्याने सिग्नल सिंक्रोनायझेशन साधले जाते. त्यामुळे अनावश्यक वाहनांची गर्दी होत नाही आणि वाहतूक सुरळीतपणे सूरू राहते. या सिस्टीममुळे शहरात नेत्यांचे दौरे असतात त्यावेळी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय टाळली जाईल आणि रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे काम या तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
हुथी बंडखोरांनी इस्त्रायलच्या तेल अवीव शहरावर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर इस्त्रायलने आक्रमक भूमिका घेत येमेनची राजधानी असलेल्या सना शहरावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 9 पेक्षा अधिक लोक मारले गेल्याची माहिती आहे. येमनेचे लष्करी ठिकाणांना सुद्धा इस्त्रायलने टार्गेट केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मोबाईल ॲपला प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून सध्या या ॲप चे सुमारे १० लाख वापरकर्ते आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, एस.टी. महामंडळाने मोबाईल ॲप काही महिन्यांपूर्वी सुधारणा करुन नवीन आवृत्ती (व्हर्जन) मध्ये सुरू केले आहे .त्याचा मुख्य हेतू प्रवाशांना बसची आरक्षण सेवा अधिक सुलभ पद्धतीने उपलब्ध करणे असा आहे. पारंपरिक तिकीट खरेदी व थेट बस स्थानकावर अवलंबून राहण्याऐवजी प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करू शकतात, प्रवासाची माहिती तपासू शकतात.
मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना लष्कराने बढती दिली आहे. सेवाज्येष्ठनेतनुसार ही बढती मिळाल्याचे देखील लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने प्रधानमंत्री आदर्श ग्रामयोजना, जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व निराकरण, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती आणि शिष्यवृती संदर्भात महाविद्यालयाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधाळकर, यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, समिती सदस्य, साखर कारखान्याचे अधिकारी , स्थानिक पदाधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानाची माहिती ते पंतप्रधानांना देण्याची शक्यता आहे.
पदवीधर व शिक्षक मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून सन २०२० मध्ये नाव नोंदणी असलेल्या पदवीधर व शिक्षकांना पुन्हा नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे यादृष्टीने राजकीय पक्षांनी व शिक्षण संस्थांनी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.