राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. राज यांनी गणरायाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. गणराजाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानाकडे सहकुटुंब रवाना झाले आहे.
ठाकरे बंधू गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येत आहे. यावर भाजप खासदार नारायण राणे यांना विचारलेल्या प्रश्नाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "तू का अपशकून करतोय, त्याचा काही संबंध आहे. महाराष्ट्रात अनेक बंधू एकत्र येत असतील. आम्ही आलो आहोत. आम्ही काही मुहुर्त पाहत नाही. देवाकडे यायला मुहुर्त नसतो. त्यामुळे या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकत नाही."
अहिल्यानगर शहरातील आनंदीबाजार परिसरातील धार्मिक स्थळाच्या तोडफोडप्रकरणी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन दंगखोरांवर कडक कारवाईची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाला धक्का देणारी ही घटना आहे. निष्पक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी, "अशा काही लहान गोष्टींची चर्चा आपण बाप्पांकडे करत नाहीत. आदरणीय न्यायालय आणि सरकार, काय आहे ते पाहून घेईल. मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचं काम पोलिसांचं आहे, ते बघतील काय ते! आपलं काम आहे, ते बाप्पांचा उत्सव आनंदात साजरा करणे."
लक्ष्मण हाके हा पाळीव श्वान आहे. त्याला भुंकण्यासाठीच सरकारमधील काही लोकांनी सोडले आहे, अशी घणाघती टीका मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रामभाऊ गायकवाड यांनी मराठा आरक्षण जनजागृती रथयात्रा काढली होती. या रथयात्रेचा काल सायंकाळी पंढरपुरात समारोप झाला.
सत्तेपेक्षा गोरगरिबांच्या वेदनांना समोरे जाणारा माणूस म्हणजे, एकनाथ शिंदेसाहेब आहेत. अजितदादांकडे देखील पक्षाच्या पलीकडे जाऊन काही मंत्री, आमदार अन् पदाधिकारी आहेत. भाजपमध्ये देखील तसेच काही मंत्री आणि पदाधिकारी आहेत. विरोधक पक्षाकंडे देखील असेच आमदार आणि पदाधिकारी आहेत. ते गोरगरिबांना वेगवेगळ्या पातळीवर मदत करतात.
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकार चर्चेसाठी तयारी असून, तसं नियोजन केलं जात आहे. परंतु ही चर्चा बंद दाराआड होणार नाही, असं जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितलं. त्यामुळे सरकारची अधिकच कोंडी झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) इथं जात मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आमदार क्षीरसागर यांनी यापूर्वी देखील जरांगे पाटील यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. आता पुन्हा भेट घेतली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने अंतरवली सराटी इथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
कर्जाला कंटाळून राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यातील महायुती सरकाराला शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी जाहीर करण्याची विघ्नहर्त्याने सद्बुद्धि द्यावी, अशी मागणी करणारे फलक जनशक्ती शेतकरी संघटनेने पंढरपूरच्या करमाळ इथं ठिकठिकाणी शेतात बॅनर लावले आहेत. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी केलेली ही बॅनरबाजी चर्चेत आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र मोरे यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष होते. मोरे यांच्या शिवसेना प्रवेशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेत प्रवेश करताच, रवींद्र मोरे यांची शिवसेना शेतकरी सेना उपाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा करणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मुंबईला रवाना होत असताना पोलिसांनी तब्बल 40 अटी असलेले पत्र त्यांना दिले आहे. या अटींमध्ये आक्षेपार्ह घोषणा तसेच जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होणार नाही. याची दक्षता घेणे, ठरलेला मार्ग न बदलणे, सदर प्रवासादरम्यान अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहन अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड यांना अडथळा होणार नाही याची काळजी घेणे मोर्चात सहभागी नागरिकांना घातक शस्त्र, लाठी, काठी, तलवार, ज्वलनशील पदार्थ बाळगता येणार आदी अटी घातल्या आहेत.
मराठा उपसमितीच्या धर्तीवर इतर मागासवर्गीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ही समिती स्थापन करण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. या समितीमध्ये महायुतीमधील नेत्यांचा समावेश असणार आहे.
पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर, पुणे , सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईल निघण्यापूर्वी 29 ला आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार असे जाहीर करत मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे सांगितले. कोर्टाकडून मुंबईत आंदोलनाला बंदी करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर जरांगेची घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (बुधवारी) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंतरवाली सराटी येथून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना होणार आहेत. मुंबईत आंदोलनासाठी परवानगी न दिल्याने जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे मराठा आंदोलकांचे लक्ष लागले आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘अन्नछत्र’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भक्तांची संख्या पाहाता ती व्यवस्था अपुरी असून चेंगराचेंगरीची भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला विरोध केला होता. आता जेथे अन्नछत्रासाठी मंडप उभारले आहेत. तेथे मुंबई महापालिकेच्या वतीने त्या पेरु पेरू कंपाऊंडच्या मूळ मालकाला थेट नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये उभारण्यात आलेला मंडप आणि संबंधित साहित्य त्वरित हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निफाड सहकारी साखर कारखान्यातील मौल्यवान यंत्रसामग्री व तांबे-पितळाचे भाग चोरून विकल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल कदम यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षातील नेते ज्यांनी हा कारखाना चालवण्यासाठी घेतला त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे.
विरारमधील रमाबाई अपार्टमेंट नावाची बिल्डिंग कोसळली आहे. स्वामी समर्थनगर येथे ही इमारत आहेत. इमारत कोसळून झालेल्या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, अजुनही 20 ते 25 जण अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफ आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून 9 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.