नाशिकच्या देवळाली ते लहवीत रेल्वे स्थानकादरम्यान मालागडीत बिघाड झाला आहे. मालगाडीच्या ब्रेक नादुरुस्त झाल्याने मागील दिड तासापासून अनेक रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला आहे. मालगाडीच्या बिघाडामुळे वंदे भारत एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस देवळाली कॅम्पजवळ थांबवण्यात आल्या आहेत. मालगाडी दुरूस्त करण्याचं काम सुरू असून पंधरा वीस मिनिटात रेल्वे वाहतूक पूर्ववत करू अशू माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
पश्चिम रेल्वे वर धावणाऱ्या AC लोकलमध्ये पावसाचं पाणी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने याबाबतचा व्हिडिओ पोस्ट करत एसी लोकलमध्ये पाणी गळत असल्याचं उघडकीस आणलं. पश्चिम रेल्वे वरील रात्री अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या AC लोकलमध्ये हा प्रकार घडला आहे.
मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळले आहे पण शासनाची मदत कोठे आहे? पुराचा असा हाहाकार गुजरातमध्ये घडला असता तर लष्कराचे विमान आणि हेलिकाप्टर घेऊन पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा गुजरातला पोहोचले असते व मदतीचे मोठे आकडे विमानातूनच जाहीर करून पुन्हा देशातल्या बडय़ा उद्योगपतींना त्यांचा निधी गुजरातकडे वळवायला लावला असता, पण आमचा मराठवाडा सुन्न आणि उपेक्षित आहे. दुःखाच्या आणि आपत्तीच्या काळात ही वर्गवारी पडली आहे. राज्यकर्ते संवेदनशीलता हरवून बसले आहेत. धाराशिव, लातुरात जी अन्नधान्याची मदत वाटली, त्या पिशव्यांवर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो व पक्षाचे चिन्ह आहे. भाजपने वाटलेल्या मदतीवर ‘देवेंद्र-नरेंद्र’चे फोटो व कमळ, अजित पवारांची मदत त्यांच्या चिन्हासह. मग या मदतकार्यात महाराष्ट्राचे शासन नेमके कोठे आहे? असा सवाल करत राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
'फडणवीस यांचे मंत्रिमंडळ कामचोर आणि बिनकामाचे आहे. ते मराठवाड्यातील पूरपरिस्थितीशी सामना कसा करणार? त्यात राज्याच्या विधिमंडळात विरोधी पक्षनेता नाही. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश सरकार दरबारी कोण मांडणार?' असा सवाल उपस्थित करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्राच्या रोखठोक या सदरातून राज्य सरकारवर टीका केली आहे. 'मराठवाड्यातील पुरात महाराष्ट्रातील लोकशाहीसुद्धा वाहून गेली आहे. कारण जनतेचा आक्रोश, पुराच्या नुकसानीची दाहकता सरकार दरबारी मांडण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत सरकारने विरोधी पक्षनेता नेमू दिलेला नाही. आज विरोधी पक्षनेता असता तर तो मराठवाड्यात फिरला असता. लोकांची दुःखे, महापुराची दाहकता सरकार दरबारी मांडली असती. सरकार मदत करत आहे, पण प्रत्यक्ष जमिनीवर अधिकाऱ्यांची काय मनमानी चालली आहे याची परखड माहिती विरोधी पक्षनेत्याने सरकारपर्यंत पोहोचवली असती, पण महाराष्ट्राचे महान मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या दोन ‘उप’टसुंभांनी राज्याला विरोधी पक्षनेता मिळू दिला नाही. विरोधी पक्षनेत्याशिवाय महाराष्ट्रात लोकशाही चालली आहे. मराठवाड्यातील 70 लाख एकर जमीन पिकांसह उद्ध्वस्त झाली आहे. 36 लाख शेतकऱ्यांचे जीवन या पुरात वाहून गेले. त्यांना 2215 कोटी रुपयांची मदत फडणवीस सरकारने जाहीर केली, पण ज्या सरकारवर 9 लाख कोटींचे कर्ज आधीच चढले आहे, ते सरकार मराठवाड्यातील जनतेचे जीवनमान कसे सावरणार?' असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.
पवना धरण 100% भरलेले आहे व धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात 1400 क्युसेक विसर्ग चालू आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसास सुरुवात झाली असून आज सकाळी 10:30 वाजेपर्यंत नदीपात्रात होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून एकूण विसर्ग 2880 क्युसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पवना काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांच्या दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
पूर ग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. आनंद दिघे युवा प्रतिष्ठान व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मोफत औषध पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी औषधांनी भरलेला एक मोठा टेम्पो पुणे येथून पूरग्रस्त भागाकडे रवाना झाला आहे. यावेळी पक्षाचे उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, पुणे जिल्हा प्रमुख उल्हासजी शेवाळे, राज्य संघटक वसंतजी मोरे, शहर प्रमुख संजयजी मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर मोडक, सुजित थेवरे, नितीन गावडे, प्रतिष्ठानचे अभिषेक जाधव, रोहन आंब्रे, संजय पाठक तसेच अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा टेम्पो रवाना झाला.
इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे इंद्रेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यावर पाणी साचून नागरी वस्तीत पाणी शिरले होते, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या नागरी वस्तीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे अध्यक्षपद मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. लवकरच ते दिल्लीत जातील, असे देखील बोलले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनीच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण 2029 पर्यंत महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 2029 ची विधानसभा निवडणूक देखील महायुती फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.