उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसंच यावेळी दोघांमध्ये सरकारनं काढलेल्या जीआरवरुन देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे.
आपण कामानिमित्त संभाजीनगरला आलो होतो. त्यामुळं जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असं भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना विखेंनी म्हटलं आहे.
आपण मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक भावनेने प्रयत्न केले आहेत. या निर्णयानंतर अनेकजण सरकारच्या जीआरवर भाष्य करत आहेत हे दुःखद आहे. केवळ चार भिंतीत बसून टीका टिप्पणी करणं चुकीचं आहे. सरकारच्या जीआरमध्ये कुठल्याही त्रृटी राहिलेल्या नाहीत, असंही यावेळी विखे यांनी सांगितलं.
माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.“छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी समजून घ्यायला हवं. छगन भुजबळ यांनी केवळ मतांसाठी समाजाला भडकवण्याचं काम करू नये. प्रसिद्धी व निवडणूक यापलीकडे त्यांच्या डोक्यात काहीच नाही”, असा हल्लाबोल शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीत राजकीय हस्तक्षेप सातत्याने दिसून येतो. बीडमधील गुन्हेगारी कमी होताना पाहायला मिळत नाही. आता, बीडच्या माजी जिल्हा परिषद सदस्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका शिक्षकेने दिलेल्या तक्रारीवरून हा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून नारायण शिंदे असं माजी जिल्हा परिषद सदस्याचे नाव आहे. शिंदे हे बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्ता आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी शहरातील विविध मंडळांना भेटी दिल्या. यानंतर त्यांनी ठाकरे सेना पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या निवास स्थानी भोजन केले. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.
अहिल्यानगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्रे पकडून व त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीसाठी एक गाडी व कर्मचारी, अशा चार नियुक्त कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जाणार आहे. तसेच, शहरात कुत्र्यांसाठी फिडिंग पॉईंट तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल. हॉटेल व स्लॉटर हाऊसमधील वेस्ट रस्त्यावर किंवा कचरा कुंडीवर येणार नाही, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या 17 सप्टेंबरला बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.
"केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जीएसटी संदर्भात घेतलेला निर्णय धाडसी आणि ऐतिहासिक आहे. यामुळे सर्व सामान्यांना शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. खरंतर विरोधकांना देखील याचा फायदा होईल, पण त्यांनाही चपराक देखील आहे. राहुल गांधी हे नेहमी पंतप्रधानांबद्दल अपमानजनक बोलत असतात, पण त्यांना लोकं मतातून जागा दाखवतात," असा टोला शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मुंबईच्या पनवेल शहरात काल रात्री कोयता अन् कुऱ्हाड हातात घेऊन नातेवाईकांना ओलीस ठेवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी तब्बल तीन तासांच्या थरारक कारवाईनंतर ताब्यात घेतले. या मोहिमेत चार पोलिस जखमी झाले असून, ओलीस ठेवलेले सर्व नातेवाईक सुखरूप सुटले.
बुलढाणा जिल्हा कामगार कार्यालयामध्ये विविध तांत्रिक अडचणीचा हवाला देत अधिकृत कामगारांची अडवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्याचबरोबर कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोपही आहे. वारंवार विविध तक्रारी येत असल्याने याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं. मनसेचे अमोल रिंढे यांनी बुलढाणा इथल्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यापुढे अधिकृत कामगारांना नाहक त्रास दिल्यास मनसे स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा अमोल रिंढे यांनी दिला आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 163 (1) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगणेशोत्सव व ईद-ए-मिलाद 2025 या कालावधीत लेझर लाईट, दबाव हॉर्न (प्रेशर मिड) व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर लागू राहतील. हे आदेश 3 ते 8 सप्टेंबर या कालावधीसाठी असतील.
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी (6 सप्टेंबर) सकाळी 9:30 वाजता सुरू होणार आहे. यासाठी मोठे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. सकाळी सातपासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील 17 प्रमुख रस्ते बंद राहतील. तसेच पुढील 48 तास जड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. पोलिसांनी नागरिकांसाठी पर्यायी मार्ग आणि पार्किंगची व्यवस्था केली आहे. वाहतूक नियमांचे पालन करून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे मिरवणूक सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यास मदत होईल.
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
पुण्यात ओबीसी समाजाकडून आरक्षण वाचवण्यासाठी मोठे महाघंटानाद आंदोलन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होईल. आंदोलनानंतर समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. ओबीसी समाजाची ठाम मागणी आहे की, मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करण्यात यावा. त्यांचे म्हणणे आहे की मराठा आरक्षणामुळे ओबीसींचे हक्क धोक्यात येत आहेत. त्यामुळे सरकारने याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी ओबीसी समाजाकडून जोरदारपणे केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, छगन भुजबळ नाराज नाहीत आणि त्यांच्या मनातील सर्व शंका दूर केल्या जातील. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, याची हमी त्यांनी दिली. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अनेक ओबीसी संघटनांनी स्वागत केले आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
उद्योगपती गौतम अदाणी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईच्या सिल्वर ओक निवासस्थानी अदाणी गेले आहेत.पवार व अदाणी यांच्यात कोणत्या मुद्द्यावरुन चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही.
नागपुरात ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु आहे. मंत्री अतुल सावेंनी आंदोलकांची भेट घेतली. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींना धक्का नाही अशी माहिती अतुल सावेंनी दिली. ओबीसी आरक्षणाला अडचण येणार नाही असं ते म्हणाले.
नागपूरमध्ये ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांची मंत्री अतुल सावे भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा करत आहेत. बैठकीत आंदोलनाची कारणे आणि तोडगा यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
नागपुरात ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंदोलकांची भेट घेणार आहे. आंदोलकांचे साखळी उपोषण सुरु असून फडणवीस आंदोलकांशी भेटून चर्चा करणार आहेत.
Maharashtra Today: भाजपकडून नांदेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाचे श्रेय देणारा यावर मजकूर लिहिलेला आहे.
'नेता शब्द पाळणारा' असा फडणवीसांचा उल्लेख करण्यात आला आहे. फडणवीसांसोबत मनोज जरांगेंचाही फोटो लावला आहे.
मराठा आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु असताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी त्याला विरोध केला आहे. त्यांनी मंत्रिमंडळाचा बैठकीला हजर न राहता अप्रत्यक्षपणे या निर्णयाचा निषेध केला आहै. सध्या राज्यात ओबीसी-मराठा आरक्षण मुद्या पेटला आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
कुणी कितीही समित्या बनविल्या तरी आरक्षण मिळणार, असा ठाम विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. जी.आर बनविण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे जरांगे म्हणाले.
Maharashtra Breaking News Today: नागपुरात ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु आहे. ओबीसी मंत्री अतुल सावे हे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत. नागपुरातील आंदोलनस्थळी जाऊन ते भेट घेणार आहेत. सावेंवर ओबसी समाजाची समजूत काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
जालना महापालिकेचा प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. आता नगरसेवकाची संख्या 65 वर जाणार आहे. 15 सप्टेंबर पर्यंत हरकती दाखल करता येणार असून 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार आहे.
बीडमध्ये स्वराज्यनगर भागात चाकूने हल्ला करून एका 25 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती आहे. किरकोळ वाद झाला आणि मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे समजते. या प्रकरणातील आरोपीला पाठलाग करून पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.विजय काळे असे मृत युवकाचे नाव आहे. अभिषेक गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.
कामगार टंचाईवर मात करणे, उद्योगांची कार्यक्षमता वाढवणे आणि राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण होऊन विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासात वाढ केली आहे. त्यानुसार यापुढे दुकानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 9 तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारास 12 तास काम करावे लागणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या उपसमितीत 8 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये गुलाबराव पाटील, संजय राठोड, छगन भुजबळ आणि दत्तात्रय भरणे या मंत्र्यांचा समावेश आहे. तर अतुल सावे, पंकजा मुंडे आणि गणेश नाईक हे देखील समितीचे सदस्य आहेत. ओबीसी समाजाकडून दीर्घकाळापासून या उपसमितीची मागणी करण्यात येत होती. अखेर ती मागणी सरकारने मान्य केली आहे.
राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेल्या जी.आर विरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. आरक्षणाच्या कृती समिती आणि समता परिषदेकडून पुण्यात हे आंदोलन केलं जाणार आहे.
मनसे नेते वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती होणार होता. मात्र, काही कारणामुळे आज होणारा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रासह गोव्याच्या किनारपट्टीसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये याबाबतचं सरकारने लेखी आश्वासन द्यावं, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी जिथून मराठा आरक्षणाच्या लढाईला सुरूवात केली त्याच अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आंदोलकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना तातडीने जसलोक रुग्णालयात दाखल केलं असून उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकार जीएसटीचे 12 आणि 28 टक्क्यांचे स्लॅब रद्द केले असून आता 5 आणि 18 टक्क्यांचा स्लॅब लागू राहणार आहे. त्यामुळे कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह इतर काही वस्तू स्वस्त होणार आहेत. तर नवा स्लॅब 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.