कागल नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शारदा गुनाजी नागराळे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. नागराळे यांनी निवडणुकीतून माघार घेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कागलच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
वाशिमच्या मालेगाव नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश अहिर यांच्या प्रचारार्थ मालेगाव इथं सभा पार पडली. या सभेत अकोल्याचे आमदार साजीद खान पठाण यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. माझ्या मतदार संघात बटेंगे तो कटेंगेचा नारा चलला नही, असे म्हणत मालेगावातील धार्मिक एकता, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुना संस्कृतीचे कौतुक केले.
अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी निवडणूक आयोगाचा निषेध केला. इतकंच नाही तर कुणाच्यातरी दबावाखाली निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक निवडणूक पुढे ढकलण्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.
अनगरमधील स्वतःला सर्वेसर्वा म्हणून घेणाऱ्यांचा पापाचा घडा आता भरला. हा नियतीचा फेरा आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली म्हणून दोन वेळा फुगड्या खेळून झाल्या आहेत. कदाचित वयोमानाने तिसऱ्यांदा खेळताना पाय घसरू शकतो. त्यामुळे न झालेल्या लढाईमध्ये विजयाचा आनंदोत्सव साजरा केला आहे. कदाचित नियतीला आवडला नाही. राज्याच्या निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. आमचं अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आम्ही हायकोर्टात अपील करणार आहोत, असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश पाटील यांनी म्हटले.
महायुतीमधील सत्ताधारी मित्रपक्षातील प्रमुखांमध्ये नगरपालिका निवडणुकींमध्ये निधी वाटपावरून कुरघोडीचं राजकारण रंगलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड इथं सभेत, कुणी ठाण्याचा, तर कुणी नागपूरचा निधी देताना विचार करणार, मग माझ्याकडे फाईल आली, तर मीही माझ्याच जिल्ह्याचा प्राधान्याने विचार करणार ना, असा सूचक टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
जत नगरपरिषद निवडणुकीला हिंसक वळण लागलं आहे. जतमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला झाला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालं. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विलासराव जगतापांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर किती बोलले तरी, त्यांचा आशीर्वाद आमच्या उमेदवाराबरोबर आहे. ते तीन तारीखचा गुलाल उधळण्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून असतील. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे शेवटची सही मुख्यमंत्र्यांचीच असते हे त्यांना माहित आहे. कोणाला निधी द्यायचा, कोणाची यादी नक्की करायची, हे सगळे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सहीने होतात, असा टोला भाजप मंत्री नीतेश राणे यांनी लगावला.
सामना हे काही वर्तमानपत्र आहे? त्यात अग्रलेख असतो? ही तर मला नवीनच बातमी आहे. त्यामुळे कात्राने भाद्रविण्यापेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष हा घाबरलेला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या वाक्याचा विपर्यास करणं भारतीय जनता पार्टीची भीती सामनाच्या अग्रलेखातून दिसते, असा टोला सिंधुदुर्ग इथं मंत्री आशिष शेलार यांनी लगावला.
वर्ध्याच्या देवळी इथं नगर परिषदेची निवडणूक लांबनीवर टाकण्यात आली. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर इथला प्रचार थांबला. पण जे उमेदवार रिंगणात होते, त्यांचा हिरमोड झाला. देवळी इथं जनशक्ती आघाडीचे उमेदवार किरण ठाकरे यांनी निवडणूक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून लक्ष वेधलं. कोणत्याही एका राजकीय पक्षाला मदत करण्यासाठी व अपक्ष उमेदवारांना आर्थिक कमकुवत करण्यासाठी निवडणूक आयोगाचा डाव असल्याचे सांगत किरण ठाकरे यांनी आयोगाचा निषेध केला.
अकोला जिल्ह्यातील शेगाव अकोट रस्त्यावर प्रेम प्रकरणातून एका युवकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. गौरव बायस्कार असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. प्रेम प्रकरणातून गौरवची 4 जणांनी चाकू भोकसून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलं आहे. मारेकरी हे लोहाऱ्यातील एकाच कुटुंबातीलच असल्याचे समोर आले. तर इतर आणखी दोन जणांचा हत्येमध्ये समावेश असल्याचा समजते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने अहिल्यानगर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार, शिवसैनिकांच्या मुलाखती येत्या गुरुवार (ता. 4) अहिल्यानगर शहरात उत्साहात पार पडणार आहेत. यावेळी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.
राज्यसभेतील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी जोरदार टीका केली आहे. खडगे म्हणाले की, देशासमोर असलेल्या खऱ्या आव्हानांवर बोलण्याऐवजी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा “ड्रामेबाजीची डिलीवरी” दिली. त्यांच्या मते, गेल्या 11 वर्षांत सरकारने संसदीय परंपरा, चर्चा संस्कृती आणि लोकशाही प्रक्रियेचा सातत्याने अवमान केला आहे. महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून केवळ राजकीय संदेश देण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. खडगे यांनी सोशल मीडियावरून सरकारला लक्षित करत संसदेचे महत्त्व पुनर्स्थापित करण्याची मागणीही केली.
अंबरनाथमध्ये निवडणुका पुढे ढकलल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी उसळली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयाविरोधात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याच्या दालनाबाहेर मोठ्या आवाजात घोषणाबाजी केली.
महिनाभराच्या विश्रांतीनंतर संजय राऊत पुन्हा आक्रमक झाले असून पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. उपचारांमुळे काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर असलेले राऊत आता परतल्यावर पुन्हा एकदा ‘मराठी बाणा’ दाखवत राजकीय वातावरण तापवल्याचे दिसत आहे.
राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच आहे, परंतु आम्ही विरोधक असलो तरी राणे साहेबांबद्दल एक सन्मान आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळं राणे कुटुंबात सुरु असलेला वाद योग्य वाटत नाही, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, भावकी-भावकीत वाद लागल्यानंतर काय होतं, वाद लावणाऱ्यांचा हेतू काय असतो? हे आम्ही अगदी जवळून बघितलंय. राणे बंधूनी कुटुंबात, भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा ओळखून तसंच दुसऱ्याचं महत्व कमी करणं ही भाजपची रणनीती समजून त्या जाळ्यात न अडकता आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकाला पाहिजे!
शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर गुन्हे शाखा आणि निवडणूक आयोगाने धाड टाकली. सांगोला नगरपरिषद निवडणुकीपूर्वी झालेल्या कारवाईने खळबळ उडाली. भाजप आणि शेकाप कार्यालयांचीही देखील झडती घेण्यात आली आहे.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरपूरमध्ये बोलताना बाहेरून येणाऱ्यांना पक्षात सध्या जागा नाही, असे सांगत जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्याआधी भाजपने विरोधी पक्षांना मोठा दणका दिला आहे. विरोधी पक्षातील तब्बल 21 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून 11 जणांना प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल भाजप वरिष्ठांनी दिल्याची माहिती आहे.
खासदार संजय राऊत आजपासून पुन्हा राजकारणात सक्रीय झाले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. मी मी डिसेंबरपर्यंत पूर्ण बरा होईन, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याच्या विरोधात राज्यभर येथील दहशतीची मोठी चर्चा झाली होती. आता या निवडीला स्थगिती देण्यात आली असून सुधारित कार्यक्रमानुसार येथे पुढील कार्यवाही होणार आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून (सोमवार 1 डिसेंबर) सुरू होत आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर होत असलेले हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विविध मुद्द्यावरून सरकार आणि विरोधी पक्षांमधील वातावरण तापले आहे. हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुख मैदानी तोफ खासदार संजय राऊत आजपासून पुन्हा राजकारणात सक्रीय होत आहेत. आज ते माध्यमांशी बोलणार आहेत. तब्येत ठीक नसल्यामुळे राऊत काही दिवसापासून माध्यमांपासून दूर होते.
नगरपालिका, नगरपंचायतींसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या सभा होणार आहे. फडणवीस यांची भोरमध्ये सभा तर एकनाथ शिंदे यांची चाकण आणि जुन्नर येथे सभा घेणार अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर,चाकण,आळंदी येथे सभा होणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी होणार चुरशीच्या लढती होत आहेत.
Maharashtra Politics: नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या आज शेवटचा दिवस असून रात्री 10 वाजता प्रचाराची मुदत संपणार आहे.आज नेत्यांच्या प्रचार रॅली आणि जाहीर सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. उद्या मतदान असून बुधवारी निकाल लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.