Marathwada Drought News Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Water Crisis: राज्यात टँकरची संख्या कमी, झळा मात्र कायम

Maharashtra Water Tankers Supply: राज्यात या आठवड्यात (२८ एप्रिलपर्यंत) एकूण ६४४ गावांत आणि २०५१ वाड्यांमध्ये ७९६ टँकर सुरू आहेत. त्यामध्ये ५५ शासकीय आणि ७४१ खासगी टँकर सुरू आहेत. गेल्या आठवड्यात ४४७ गावांमध्ये आणि १ हजार ३४२ वाड्यांमध्ये ५८० टँकर सुरू झाले आहेत.

दीपा कदम

राज्यात एप्रिलअखेरपर्यंत पाणीपुरवठ्यासाठी टँकर सुरू झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत टँकरची कमी संख्या दिलासा देणारी आहे. तरीही ग्रामीण भागातील टंचाईच्या झळा चुकलेल्या नियोजनावर बोट ठेवतात.

उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागते, तशी ग्रामीण भागातील पाणीटंचाई आणि त्यापाठोपाठ सुरू होणारे टँकर ही प्रशासनासाठी आव्हानात्मक गोष्ट असते. यंदाही उन्हाळ्याची तीव्रता जाणत आहे, मात्र पुरेशा प्रमाणात झालेल्या पावसामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या कमी असल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

राज्यात या आठवड्यात (२८ एप्रिलपर्यंत) एकूण ६४४ गावांत आणि २०५१ वाड्यांमध्ये ७९६ टँकर सुरू आहेत. त्यामध्ये ५५ शासकीय आणि ७४१ खासगी टँकर सुरू आहेत. गेल्या आठवड्यात ४४७ गावांमध्ये आणि १ हजार ३४२ वाड्यांमध्ये ५८० टँकर सुरू झाले आहेत.

सहा जिल्हे टँकरमुक्तच

टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांमध्ये आणि टँकरच्या संख्येमध्येही मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी वाढ झाल्याचे पाणीपुरवठा विभागाने मंत्रिमंडळात सादर केलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. मागील वर्षी याच काळात राज्यात २०२६ गावांमध्ये २ हजार ५६४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षी टँकर सुरू करावा लागलेल्या रत्नागिरी, धुळे, बीड, धाराशिव, लातूर आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये अद्याप टँकर सुरू करण्याची वेळ आलेली नाही.

नागपूर विभाग टँकरमुक्त

नागपूर विभागात गेल्या वर्षी याच सुमारास २ टॅंकर सुरू होते, यावर्षी एकही टॅंकर सुरू नाही. यामध्ये नागपूर जिल्ह्यासह वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर विभागाला लागूनच असलेल्या अमरावती विभागात मात्र अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यांतील ५४ गावांत ६७ टॅंकर सुरू आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये मात्र एकही टॅंकर मागच्या वर्षीही नव्हता आणि यंदाही सुरू झालेला नाही.

छत्रपती संभाजीनगर, जालन्यातच टँकर

मराठवाड्यात गेल्या वर्षी याच तारखेला बीड जिल्ह्यात २०६ गावांमध्ये २६३ टॅंकर सुरू होते. यंदा मात्र एकाही गावात एकही टॅंकर अद्याप सुरू झालेला नाही. शिवाय धाराशिव, लातूर आणि हिंगोलीमध्येही टॅंकर सुरू झालेला नाही. छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये १३० गावांमध्ये १९२ टॅंकर आणि जालना जिल्ह्यामध्ये ४४ जिल्ह्यामध्ये ८० टॅंकर सुरू झाले आहेत. परभणीमध्ये १ गावात १ टॅंकर सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता यंदा मराठवाड्याला टॅंकरची वाट पाहावी लागत नसल्याचे दिसते.

नाशिक विभागात १९४ टँकर

नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये टॅंकर सुरू झाले असले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत टॅंकर कमी आहेत. नाशिकमध्ये ८१ गावांत ७८ आणि अहिल्यानगरमध्ये ९२ गावांत १०८ टॅंकर सुरू झाले आहेत. जळगावमध्ये मागच्या वर्षी ६१ गावांत ८१ टॅंकर सुरू झाले होते. यंदा मात्र ७ गावांत ८ टॅंकर सुरू झाले आहेत.

कोल्हापूरमध्ये एकही टँकर नाही

पुणे जिल्ह्यात मात्र कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये टॅंकर सुरू झाले आहेत. पुणे जिल्ह्यात ६५ गावांत ६४ टॅंकर, सातारा जिल्ह्यातील ५५ गावांत ६० टॅंकर सांगली जिल्ह्यातील १६ गावांत १८ तर सोलापूर जिल्ह्यातील १८ गावांत १३ टॅंकर सुरू झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT