Maharashtra Farm Loan Waiver News : राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीचा मुहूर्त दुसऱ्यांदा हुकला असून शेतकरी चिंतेत आले आहेत. यापूर्वी 30 जून आणि त्यानंतर 5 जुलै रोजी कर्जमाफीसंदर्भात तारखा महायुती सरकारने जाहीर केल्या होत्या. मात्र, अद्याप कर्जमाफी झालेली नाही. यावरून विरोधकांकडून सरकार 'तारीख पे तारीख' करत असल्याची टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, आता राज्य सरकारकडून दिलासादायक घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी जुलै महिना संपण्यापूर्वीच देण्यास सरकार कटिबद्ध असून ती याच महिन्यात, 2026 मध्येच दिली जाईल, असा दावा केला आहे. तसेच त्यांनी आयकरदात्या शेतकऱ्यांबाबत महत्त्वाची माहिती देताना या शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती दिली आहे. यामुळे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
कृषीमंत्री भरणे रविवार (ता. 12) रोजी आपल्या निवासस्थानी आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना विरोधकांकडून होणाऱ्या टीकेबाबत विचारले. कर्जमाफीसाठी सरकार 'तारीख पे तारीख' करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "हे सरकार शेतकरी हिताचा विचार करणारे असून आम्ही कर्जमाफीसाठी 5 जुलै ही तारीख दिली होती.
पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटींचे पुरवणी बजेट मांडून त्यासाठी तरतूदही केली आहे. पण मधल्या काळात कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करण्यावरून काही अडचणी आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या निकषांमध्ये बदल करत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता 2029 च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही सरसकट 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाईल. पण या योजनेचा लाभ आयकरदात्या शेतकऱ्यांना मिळणार नाही.
तर आता ही माहिती केंद्र सरकारकडून मागवण्यात आली असून त्या प्रस्तावावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्वाक्षरी झाली आहे. तो प्रस्ताव आता राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी गेला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर प्रत्यक्षात कर्जमाफीच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल. नक्कीच कर्जमाफी देण्यास थोडासा उशीर झाला असला तरी तो शेतकऱ्यांच्या हितासाठी भल्यासाठी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका असेही आवाहन कृषीमंत्र्यांनी यावेळी केले आहे.
तसेच त्यांनी, शेतकऱ्यांचा आकडा 56 लाख आहे. तो कमी होणारा नाही. कर्जमाफीची रक्कम 36 हजार 585 कोटींवरून प्राथमिक अंदाजानुसार थेट 40 हजार कोटींवर जाणार आहे. याआधी आम्ही 30 जूनची तारीख दिली होती. पण ती रक्कम बजेटमध्ये होती. त्यानंतर त्यावर राज्यपालांची सही होणे आवश्यक होते. कदाचित पुढच्या एक-दोन दिवसांत त्यावर सही होईल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की, ऑगस्ट महिना उजाडणार नाही. याच महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असा ठाम विश्वास कृषीमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.