Mumbai News : गेल्या काही महिन्यांपासून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील वादाला आता पूर्णविराम लागला असून व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मागणी आणि मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या तीव्र नाराजीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे आता समोर येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आदेश दिले असून देशमुख यांच्या जागी अविनाश रणखांब यांची नवीन एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आदेशानंतर आता गेल्या काही महिन्यांपासून महामंडळात सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम लागल्याचे बोलले जात आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. या वादाची अनेकदा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत होती. यावरून नरेंद्र पाटील यांनी देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत देशमुख हे मराठाद्वेषी अधिकारी असल्याची टीका केली होती. तसेच देशमुख यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी केली होती. तसेच नरेंद्र पाटील यांनी नुकताच केलेल्या पाच जिल्ह्यांतील दौऱ्याचा अहवालदेखील मुख्यमंत्र्यांना दिला होता. ज्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या अनेक मराठा तरुणांना व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या कारभारामुळे धक्का बसत होता. या तरुणांना दिले जाणारे क्रेडिट लिंक्ड सबसिडी किंवा कर्ज मंजूर झालेले एलओआय (LOI) अचानक रद्द होत होते. यामुळे तरुण उद्योजकांमध्ये प्रचंड संताप उसळला होता.
यातच नरेंद्र पाटील यांनी नुकताच राज्यातील 5 जिल्ह्यांचा दौरा करत याबाबत अहवाल तयार केला होता. याच दौऱ्यादरम्यान अनेक तरुणांनी विजयसिंह देशमुख यांच्या विरोधात तक्रारी त्यांच्याकडे केल्या होत्या. तसेच महामंडळाच्या मिळालेल्या कर्जाच्या तुलनेत सुमारे 1500 कोटी रुपये मिळणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात केवळ 152 कोटी रुपयेच मिळाल्याचे समोर आले होते. यानंतर हा सर्व प्रकार व्यवस्थापकीय संचालकांच्या मनमानी कारभारामुळे झाल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता.
तसेच मराठा तरुणांनी केलेल्या तक्रारींचा पाढाच नरेंद्र पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन वाचला होता. यावेळी नरेंद्र पाटील यांनी विजयसिंह देशमुख हे 'मराठाद्वेषी अधिकारी' असल्याचा आरोप करत त्यांच्या कारभारामुळे मराठा समाजातील नवउद्योजकांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा केला होता. तसेच याबाबत सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी सादर केला होता.
दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी फडणवीस यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून देशमुख यांच्याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती. ज्यानंतर देशमुख यांच्याविरोधात तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. यामुळे आता या पदावर राहण्यात काहीच अर्थ नाही, असे म्हणत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा वजा अल्टिमेटम नरेंद्र पाटील यांनी दिला होता.
ज्यानंतर व्यवस्थापकीय संचालक देशमुख यांच्याविरोधातील मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या तीव्र नाराजीची आणि तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने कारवाई केली आहे. विजयसिंह देशमुख यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवे एमडी म्हणून अविनाश रणखांब यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.