पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आता केवळ लोकनियुक्त लोकप्रतिनिधीच नव्हे, तर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीही आपला आवाज उठवताना दिसणार आहेत. राज्य शासनाने स्वीकृत सदस्य नियुक्तीची नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामुळे पुणे जिल्हा परिषदेत आता तब्बल ७ स्वीकृत सदस्यांची भर पडणार आहे. या नव्या नियमांमुळे वकील, डॉक्टर, सेवानिवृत्त प्राध्यापक, प्राचार्य आणि विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांना जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
जयंत पाटलांची पत्रकार परिषद सुरू झाली असून ते कालची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट ही इस्लामपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भातघेतल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ आधीच ठरली होती त्याच वेळेत भेटलो, असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं.
नीट पेपरफुटी प्रकरणाची धग अद्याप कायम असतानाच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ६ लाखांहून अधिक उमेदवारांचे भवितव्य ठरवणारी प्रश्नपत्रिका छापखान्यातून अवघ्या ८ हजार रुपयांत बाहेर काढून विकण्यात आल्याचा मोठा खुलासा तपासातून झाला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पुण्यात निलेश घायवळची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झालीय का हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण काल कोथरुडमध्ये ज्या अमित शिंदे वर कोयत्याने वार करण्यात आला तो निलेश घायवळच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यातील फिर्यादी आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे निलेश घायवळने अमित शिंदे यांच्या कोथरुड मधील मोबाईल दुकानातून सीम कार्ड घेतले होते.पोलिस तपासात ही बाब लक्षात आल्यानंतर अमित शिंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच अमित शिंदेवर काल कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला निलेश घायवळच्या विरोधात दिलेल्या तक्रारीची पार्श्वभूमी आहे.
हेरंब करमरकर यांचा मृतदेह ओमानच्या ताब्यात असुन पोस्टमॉर्टम करुनच तो हेरंब करमरकर ज्या गॅलेक्सी नौकेवर काम करत होते त्या नौकेच्या कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर तो अंत्यसंस्कारांसाठी पुण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बाळकुम येथे प्रस्तावित डेटा सेंटरच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नजीब मुल्ला यांनी १ ते ३ ऑगस्टदरम्यान नागरिकांसोबत व्यापक आंदोलनाची घोषणा केली आहे. डेटा सेंटरमुळे पर्यावरण, आरोग्य, वाहतूक आणि स्थानिक पायाभूत सुविधांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत नागरिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली. या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन, त्या चिंतेला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. तसेच, यापूर्वीही या विषयावर आंदोलन केल्याची आठवण नजीब मुल्ला यांनी करून दिली.
पनवेलमधील कामोठे सेक्टर-10 परिसरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अवघ्या काही तासांत सुमारे दहा जणांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन लहान मुले आणि एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात खेळणाऱ्या मुलांवर कुत्र्याने अचानक झडप घातली. मुलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 64 वर्षीय कृष्णा म्हात्रे यांच्यावरही कुत्र्याने हल्ला केला. त्यांच्या डोळ्याजवळ चावा घेतल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली. याशिवाय एका सहा वर्षीय मुलाच्या गालाला आणि आणखी एका ज्येष्ठ नागरिकाच्या हाताला चावा घेतल्याची माहिती आहे.
होमुर्झच्या सामुद्रधुनी मध्ये एका जहाजावर हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर या अभियंत्याचा मृत्यू झाला. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्ही मधे कार्यरत होते.एम व्ही जी एफ एस गॅलेक्सी या नौकेवर काम करत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतुन जात असताना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या नौकेवर हल्ला झाला. नौकेवरील २४ पैकी २३ जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली. मात्र हेरंब यांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत गेल्या दोन वर्षापासून मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना देण्यात येणारे अनुदान यावर्षीही निरंतर सुरू ठेवण्यात आले असून विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या देखरेखीखाली या निधीचे थेट बँक खात्यात वाटप सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या "मुख्यमंत्री वारकरी महामंडळ" मार्फत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी वारी सन २०२६ करीता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना दिलासा देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. २ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार यावर्षी वारीकरीता येणाऱ्या दिंड्यांना प्रत्येकी रु. २० हजार प्रमाणे एकूण रु. २ कोटी ८० लाख रुपये इतके वित्तीय अनुदान वितरित करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या तीन नेत्यांनी मंगळवारी रात्री अचानक 'वर्षा' बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सातारा जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप माडवे यांना पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात सातारा पोलिसांनी आयोगाने समन्स बजावले आहे. या प्रकरणी आयोगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना समन्स बजावून २५ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवालही आयोगासमोर पोलिस अधिक्षकांना सादर करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.