ग्रामीण भागात रक्ताच्या नात्यांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरून होणारे वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असून, आता वडिलोपार्जित शेतजमिनीची वाटणी अवघ्या १०० रुपयांत होणार आहेत. या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावरील नावे वेगळी करण्यासाठी लागणारा मोठा खर्च आणि कायदेशीर कटकटीतून सामान्य शेतकऱ्याची मुक्तता झाली आहे.
राज्यावर यंदा एल निनोच्या संकटांचे ढग असल्यामुळे सरकारने एल निनोशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी जलसंपदा विभागाने राज्यातील सर्वच महापालिकांना पत्र पाठवून 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'एल निनो'चा परिणाम शेती, उद्योग आणि बांधकामावर होऊ शकतो. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. मनसेच्या वतीने आता, 'मला मराठी येते' अशा प्रकारचे फलक मराठी रिक्षांवर आजपासून लावले जाणार आहेत.
विधान परिषदेसाठी आज रात्री भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अशोक खरात प्रकरणात आर्थिक तपासाला वेग आला आहे. बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये खरातच्या खात्यांमध्ये वर्ग झाल्याचा संशय असल्याने आता अशोक खरात आणि कल्पना खरात ची बँक खाती ईडीच्या रडारवर आहे. यासाठी खरातच्या मागील 10 वर्षांतील व्यवहारांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निष्पाप जीवांचा बळी गेला. त्या सर्वांना आज आपण आदरांजली अर्पण करतो. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. एक राष्ट्र म्हणून, या शोककाळात आणि आपल्या निर्धारात आपण एकजूट आहोत. भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही, आणि दहशतवाद्यांचे अमानुष मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर असलेल्या मिसिंग लिंकचे उद्घाटन मे महिन्यात होणार आहे. या मार्गावरून सुरुवातीच्या सहा महिन्य जडवाहनांना प्रवेश असणार नाही. या मार्गावरून फक्त कार आणि बस गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
कंत्राटदाराकडून लाच घेताना नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात पकडले. महापालिकेतील त्यांच्या दालनातच ही कारवाई करण्यात आली. या गायकवाड यांच्या अटकेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. 42 हजारांची लाच घेताना गायकवाड यांना अटक करण्यात आली.
नारी शक्ती विधेयक विरोधी पक्षांनी मंजूर होऊ दिले नाही म्हणून मुंबईत रस्त्यात भाजपची महिला आघाडी मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थित आंदोलन करत होती. मात्र, रस्ता आडवल्याने आपल्या मुलाला आणण्यासाठी निघालेली महिला अडकून पडली. तिने प्रचंड संताप व्यक्त करत रस्ता मोकळा करण्यास सांगितले. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओवरून भाजपच्या महिला आघाडीला वाटलं असेल की घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडला की महिलांचे प्रश्न सुटले! पण भाजपच्या कार्यकर्त्यांना काय माहित, की खरी नारी शक्ती काय असते! त्यांच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा इथून चालते व्हा हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला. इव्हेंटच्या कॅमेऱ्यात शक्ती प्रदर्शन शूट होत असताना अचानक सामान्य मुंबईकर महिलेने भाजपला आरसा दाखवला, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य निरीक्षक, पोलीस निरीक्षक, खर्च निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस सामान्य निरीक्षक डॉ. बिद्या नंद सिंह, पोलीस निरीक्षक एन. कोलंची, खर्च निरीक्षक बनोथ अखिल राम नाईक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे जितेंद्र डूडी तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वरील कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव / कुसगाव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबईकडे जाणारी वाहतूक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने किवळे – देहूरोड–तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येतील.
तसेच, पुण्याकडे येणारी वाहतूक दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील.
नाशिक TCS प्रकरणातील 6 आरोपींचा जामिनासाठी अर्ज केला आहे. आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 2 तारखेला त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. यापूर्वी संशयित निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने सुनावणी 27 तारखेपर्यत पुढे ढकलली. दानिश शेख, आसिफ अन्सारी,तौसिफ अत्तार,शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि शफी शेख या संशयित आरोपींकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.