Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : बीडमध्ये धक्कादायक प्रकार; शेतकऱ्याने बांध पेटवून देताच, गाडी देखील पेटली

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: विधान परिषदेच्या निवडणुका अपडेट, भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयात हजर करणार, नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण यासह राज्य आणि देशभरातली घडामोडी एका क्लिकवर.

सरकारनामा ब्यूरो

Beed News : बीडमध्ये धक्कादायक प्रकार; शेतकऱ्याने बांध पेटवून देताच, गाडी देखील पेटली

बीडच्या आष्टी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आष्टी तालुक्यातील जामगाव ते हरिनारायण आष्टा या रस्त्यावर एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील बांधावरचे गवत पेटवून दिले होते. या शेतापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाखाली एक कार उभी होती. त्या कारपर्यंत ही आग पोहचली. परंतु त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने या कारलाही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. परंतु तोपर्यंत गाडीचे मोठे नुकसान झाले होते.

Water Issue : कल्याण डोंबिवलीत 12 तास पाणीपुरवठा बंद,नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देखभाल व दुरुस्ती कामांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत व यांत्रिक उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या नियोजित कामांमुळे मंगळवार, 28 एप्रिलला सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत (12 तास) पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Jain community : जैन समाजाला कुठलंही आरक्षण नको, जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललीत गांधी यांची भूमिका

जैन समाजासाठी कुठल्याही आरक्षणाची मागणी नसून आम्हाला आर्थिक सक्षमता, शिक्षणाच्या सोई सुविधा मिळाव्या इतकीच आमची माफक अपेक्षा असून मेरीटवरच विद्यार्थ्यांना शिक्षणात संधी मिळावी अशी जैन समाजाची भुमिका असल्याचे मत राज्याच्या जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललीत गांधीनी व्यक्त केले आहे. ललीत गांधी यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या यंत्रणांचा जैन समाजाच्या अनुशंगाने आढावा घेतला. शहादा तालुक्यातील जैन लेणीचे योग्य पद्धतीने संवर्धन केले जाईल, यासाठी कुठलाही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही,अशी ग्वाही गांधी यांनी दिली. जैन समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी शासन सर्वंकष पावले उचलत असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी व्यापक उपक्रम राबविले जात आहेत, असे जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

Buldhana Update : 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाचं वंचितकडून बुलढाण्यात सामूहिक वाचन

'शिवाजी कोण होता?' या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत, काल एकनाथ शिंदे पक्षाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकालाच अर्वाच्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याच अनुषंगाने आज आणि उद्या बुलढाणा वंचित बहुजन आघाडीकडून बुलढाण्यात 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच उद्या जयस्तंभ चौकात सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. या सामूहिक वाचनाच्या कार्यक्रमाला हजारो आंबेडकर अनुयायी व शिव प्रेमींनी उपस्थित राहावं, असं आवाहन बुलढाणा वंचितचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी केलं आहे.

Ahlyanagar Update : 17 कोटी 72 लाख 51 हजार 134 रुपये; कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटपास सुरवात...

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत कर्जत-जामखेड तालुक्यातील 2025 खरीप हंगामाच्या पीक विमा दाव्यांच्या प्रत्यक्ष वाटपास आजपासून सुरुवात झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व अनियमित पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विमा रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून गतीने सुरु झाली आहे . जामखेड तालुक्यात खरीप 2025 हंगामात उडीद व सोयाबीन या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानुसार ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून उडीद पिकासाठी सुमारे 6 कोटी 5 लाख 87 हजार रुपये, तर सोयाबीन पिकासाठी सुमारे 11 कोटी 65 लाख 74 हजार रुपये, असा एकूण 17 कोटी 71 लाख 61 हजार 736 रुपयांचा (सुमारे 17.71 कोटी) पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. हा पीकविमा शेतकऱ्यांना आज दिवसभरात वितरित केला असून उर्वरित शेतकऱ्यांनाही गतिमान पद्धतीने पीकविमा वितरीत होणार आहे.

Prakash Ambedkar : आरएसएस छावणीतील हिंदुत्ववादी सोयीनं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते. आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे.

US Iran Conflict : अमेरिकेचे लष्कर होर्मुझच्या जलमार्गातील सुरुंग हटवण्याचे प्रयत्नात

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या इराणच्या छोट्या नौका दिसताच त्या गोळ्या घालून नष्ट करा, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला दिले आहेत. अमेरिकेचे लष्कर होर्मुझच्या जलमार्गातील सुरुंग हटवण्याचे प्रयत्न अधिक वेगाने करत असल्याचाही दावा ही त्यांनी केला.

काँग्रेस विरोधात भाजपच्या महिला मोर्चाचे आंदोलन

महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर आज पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाविरोधात भाजपकडून पुण्यात आंदोलन करत आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात येत आहे.

अशोक खरातचं नवं कांड, उरणमध्ये चार कोटीची जमीन

भोंदूबाबाअशोक खरातचे आणखी एक कांड समोर आले आहे. खरातने उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे.

विधान परिषदेसाठी भाजपची यादी दिल्लीत

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने संभाव्या 30 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली आहे. या यादीमध्ये प्रशांत परिचारक, राम सातपुते, सुरेश हळवणकर, निलय नाईक, प्रकाश पाटील देवसरकर, राजीव पोतदार, संजय केणेकर, सुनील कर्जतकर,प्रज्ञा सातव, राजा राऊत, विजय चौधरी, लक्ष्मण सावजी, सुरेश बनकर, अर्चना पाटील चाकूरकर, दयाशंकर तिवारी. अनंतराव देशमुख, गणेश हाके, नीता केळकर, राजेश पांडे, डॉ. आरती फुसाटे, अतुल काळसेकर, माधव भंडारी, माधवी नाईक यांच्या नावाचा समावेश आहे.

खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारीबाबत खत व बियाणे विक्रेत्यांना प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश

खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाण्यांचा सुरळीत आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षित साठा सनियंत्रण समिती तसेच जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची आढावा बैठक दि. २२ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील खत उत्पादक कंपन्या, बियाणे उत्पादक, वितरक, वाहतूकदार, नोडल एजन्सी आणि संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार

"शिवाजी कोण होता?" या पुस्तकाच्या प्रकाशक प्रशांत अंबी यांना आमदारा संजय गायकवाड यांनी फोन करून अश्लील शिवीगाळ केली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आंबी यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अंबी यांनी अॅड.असीम सरोदे यांच्यामार्फत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT