Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political updates : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज गुरूवार 26 फेब्रुवारीच्या दिवसभरातील राज्य आणि देशभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

PMC News : विरोधकांची तयारी असतानाही स्थायी समितीनं करमाफीचा निर्णय ढकलला पुढे

पुणे : भाजपच्या जाहीरनाम्यात ५०० चौरस फुटाच्या आतील घरांचा मिळकतकर माफ करावा असे आश्वासन देण्यात आले आहे. हा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या समोर चर्चेला आला होता. हा प्रस्ताव मान्य करण्याची विरोधकांनीही तयारी दर्शविली होती. मात्र, भाजपने यावर प्रशासनाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेऊन अशी भूमिका घेऊन याचा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे करमाफीचा निर्णय स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत होऊ शकलेला नाही.

Walmik Karad : वाल्मीक कराडला मोठा दणका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

संतोष देशमुख खूनप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. वाल्मीक कराड याने यापूर्वी जामिनासाठी आणि दोषमुक्तीसाठी बीड जिल्हा न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात केला हेाता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला होता.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी पक्षाला दिला विश्वास

दादांच्या आकस्मित जाण्यान जी पोकळी निर्माण झाली होती. सर्वच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पहिले अध्यक्षपद स्वीकारावा अशी विनंती केली. दादांनी 35 वर्ष काम करत असताना महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती एका कुटुंब सारखं त्यांनी जपलं होतं. त्यांचे स्वप्न असेच अर्धवट सोडून ते आपल्यातून निघून गेले आणि सगळ्यांचे एकत्रित होते की दादांच्या जागी आपण जर आलात आपण सर्वांच्या साथीने दादांची स्वप्न पूर्ण करून या सगळ्यांच्या मनामधल्या विश्वास आणि मला साथ देण्याची त्यांची हमी या सगळ्या दृष्टिकोनातून मी या अध्यक्षपद स्वीकारला आहे.

Fadnavis Vs Thackeray : आदित्य ठाकरेंना पुढच्या वेळी दावोसला घेऊन जाईन : मुख्यमंत्र्यांच्या विधानावर ‘आता व्हिसा काढायलाच निघालो आहे’ पलटवार

दावोसला आम्ही फिरायला गेलो नव्हतो. तर गुंतवणूक आणण्यासाठी गेलो होते. आदित्य ठाकरे यांनाही पुढच्या वेळी दावोसमध्ये घेऊन जातो, माझी कोणतीही अडचण नाही, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले होते. त्यावर पलटवाार करताना आदित्य ठाकरेंनी होय मी आता व्हिसा काढण्यासाठीच जात आहे. तसेच, त्या ठिकाणी बर्फ असतो, त्यामुळे जॅकेटही घेऊन जाणार आहे, असे उपाहात्मक टोला ठाकरेंनी लगावला.

Parth Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी घोषित

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी पार्थ पवार यांना घोषित करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ही घोषणा केली आहे.

Sunetra Pawar : अजितदादांनी आयुष्यभर शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार जपला, तोच वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे : सुनेत्रा पवार

अजितदादांसारख्या वादळासोबत मी ४० वर्षे संसार केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी तुम्हा सर्वांच्या पाठबळामुळे आणि तुमच्या साथीने अजिबात अशक्य नाही, याचा मला विश्वास आहे. अजितदादांनी आयुष्यभर शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार जपला. या विचारांबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. नवमहराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा वारसा त्यांनी जपला आणि तोच वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

Hasan Mushrif : तुमच्या पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे उभे राहू : हसन मुश्रीफ

तुम्ही आज जी जबाबदारी घ्यायला निघाला आहेत, त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीशी उभं राहू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी तुम्ही जी जी जबाबदारी आम्हाला द्याल, ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडू. अजितदादांचं अधुरं राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही संपूर्ण राज्याला पुढे नेण्याचं काम कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Sunetra Pawar : अजितदादा आपल्यात नाहीत, हे मन अजूनही मानायला तयार नाही : सुनेत्रा पवार

अजितदादांच्या मृत्यूच्या धक्क्यातून आपण अजूनही सावरलेलो नाहीत. त्यांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून येणे शक्यच नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात एकच नाव आहे, ते म्हणजे अजितदादा. ते आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहिल्याचे आपण सर्वांनी पाहिलेले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पाहिलेली अनेक स्वप्न अर्धवट सोडून जावी लागली आहेत. पण त्यांची स्वप्नं अर्धवट राहणार नाहीत, आपण सर्वजण मिळून त्यांचे स्वप्न अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अजितदादा आज आपल्यात नाहीत, हे मन अजूनही मानायला तयार नाही. पण वास्तव मान्य करायला पाहिजे, यातून आपण सावरलं पाहिजे, असे आवाहन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

जिल्हा परिषद व पंचायत समीतीतही स्वीकृत सदस्य निर्णयावर शिक्कामोर्तब

जिल्हा परिषद व पंचायत समीतीतही स्वीकृत सदस्य निर्णयावर शिक्कामोर्तब; राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय.

किमान 5 सदस्य निवडणे बंधनकारक असणार

Sunetra Pawar : आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मांडला प्रस्ताव

Rohit Pawar : रोहित पवार पुणे येथील CID ऑफिसला पोहचले; तपासाचा आढावा घेणार 

आज नुकतेच काही वेळापूर्वी CID ची पत्रकार परिषद पार पडली आहे.

आमदार रोहित पवार हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सातत्याने चौकशीचा पाठपुरावा करत आहेत,

त्यांनी आज (ता.26) पुण्याातील सीआयडीने केलेल्या तपासाचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहेत.

Youth Congress Protest :  भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन

नागपूरमध्ये भाजपच्या कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील एआय समिटमध्ये शर्ट काढून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसह युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अटक केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले जात आहे.

CID update : अनेक पुरावे समोर

तपासामध्ये निष्कर्ष समोर आल्यानंतर त्यापुढील कायदेशीर प्रक्रिया राबविली जाईल. तपासामध्ये बरेचसे पुरावे समोर आले आहेत. आणखी पुरावे आल्यानंतर अंतिम निष्कर्ष निघेल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे सीआयडीकडून स्पष्ट करण्यात आले. गुन्ह्याचा कट, हलगर्जीपणा या दिशेने तपास सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

CID News : तपास योग्य दिशेने सुरू

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. आज सीआयडीकडून पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. सीआयडी आकस्मिक मृत्यूच्या दिशेने तपास करत आहे. तपास योग्य दिशेने आणि योग्य वेगाने सुरू असल्याचे सीआयडीकडून स्पष्ट करण्यात आले.

Assembly live update : मराठी शाळांबाबतची माहिती चुकीची

मराठी शाळा बंद पडत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही शाळा बंद पडल्या असतील पण आजही ८४ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या असून एकूण ७० टक्के विद्यार्थी शिकत आहे. त्यापैकी १६ हजार शाळा स्वयंअर्थसहाय्यित आहे. इंग्रजी शाळांमध्ये ६५ लाख विद्यार्थी शिकत आहेत. मराठी शाळांसोबत इंग्रजीही शिकवू. आपण आपल्या शाळांचा दर्जा नीट ठेवला तर आजही या शाळांमध्ये येण्याची लोकांची इच्छा आहे. शाळा बंदबाबत देण्यात आलेली कपोकल्पित आकडेवारी आहे.

CM Devendra Fadnavis : एसीबीला परवानगीची आवश्यकता नाही

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचप्रमाणे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना अटक करण्याच्या प्रकरणावर भाष्य करत त्यांनी मंत्र्यांबाबत तक्रार आल्यास एसीबी थेट सापळा रचू शकते, असे विधान फडणवीस यांनी केले आहे. एसीबीला मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या परवानगीची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इंडिया एआय समिटमध्ये आंदोलन प्रकरण; दिल्ली–हिमाचल पोलिस आमनेसामने

दिल्लीतील इंडिया एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर दिल्ली आणि हिमाचल प्रदेश पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. हिमाचल पोलिसांना पूर्वकल्पना न देता कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल झाला असून काँग्रेसने केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर VRS विमानांवर बंदीचा निर्णय

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला महिना पूर्ण होत असताना घातपाताचा संशय वाढत आहे. VRS कंपनीच्या लिअरजेटमधून प्रवास करताना बारामतीत त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार-खासदारांसह VRSची विमाने न वापरण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ने चार विमानांवर उड्डाणबंदी घालत चौकशी सुरू केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला दिलासा नाही

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. तपास यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे कराडला तुरुंगातच राहावे लागणार आहे. पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय भूकंप, चंद्रपूरमधील काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळणार, भाजपने मोठा नेता फोडला

चंद्रपूरमधील दिग्गज नेते अविनाश आणि सतीश वारजूरकर यांनी काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे. यामुळे येथे राजकीय भूकंप झाला असून काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान वारजूरकर बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर येत असून त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात बहिष्काराची घटना,  प्रेमविवाहानंतर गावाने तोडले संबंध

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील सरडपार गावात आंतरजातीय विवाह केलेल्या एका दाम्पत्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सचिन सोनटक्के आणि सुजाता सोनटक्के या दाम्पत्याने गावकऱ्यांवर सामाजिक तसेच आर्थिक बहिष्कार टाकल्याचा आरोप केला आहे. सचिन हे अनुसूचित जातीतील तर सुजाता या अनुसूचित जमातीतील असून, मे २०२३ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला. विवाहानंतर कुटुंबात वाद निर्माण झाल्याने सचिन यांच्या आई आणि भावाने गाव सोडून सिंदेवाही येथे वास्तव्यास गेल्याचे दाम्पत्याचे म्हणणे आहे

बारामतीमध्ये पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणीला जोर धरत असून या प्रकरणी बारामती पोलिस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेवून ते गुन्हा दाखल करण्यासाठी गेले आहेत. यादरम्यान कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महान क्रांतिकारी वीर सावरकर जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली. त्यांनी देशाला गुलामगिरीच्या साखळ्यांपासून मुक्त करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य प्रत्येक पिढीला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देत राहील."

हिंगोली मध्ये शरद पवार गटाला जोरदार भाजपचा धक्का 

हिंगोली मध्ये भाजपने शरद पवार गटाला जोरदार धक्का दिला आहे हिंगोलीचे नेते व माजी मंत्री जय प्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिश दांडेगावकर यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नवी मुंबईमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला दीड हजार हून कार्यकर्त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केलेला आहे साडेचारशे ते पाचशे गाड्यांचा ताफा नवी मुंबई शहरामध्ये आतिश दांडेगावकरांनी जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन दाखवत भाजपात पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये भाजपची राजकीय ताकद वाढली आहे.

बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक

पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पासाठी घेतलेल्या मात्र न वापरलेली जमीन परत मिळावी यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी आग्रही झाले आहेत. शेतजमिनीचा कोरा सातबारा मिळावा यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी 27 फेब्रुवारीपासून पेण प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहेत. गेली 17 वर्षे या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे 9 गावे आणि 13 आदिवासी वाड्यांमधील 3 हजार 800 कुटुंबं बाधित झाली आहेत.

रोहित पवार दादांच्या अपघाताप्रकरणी FIR नोंदवण्यासाठी बारामतीत

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी FIR दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार आज बारामती तालुका पोलीस स्टेशनला जाणार आहेत. पोलीस स्टेशनबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केलीय. दरम्यान याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरींनी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी FIR नोंदवून घेण्यास नकार दिला होता, यावरुन पोलीस आणि रोहित पवारांमध्ये वाद झाला होता.

Pune News : माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्ये प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येमागे तीन प्रमुख कारणे असल्याचा दावा सरकारी वकिलांनी विशेष न्यायालयात युक्तिवादादरम्यान केला आहे. या प्रकरणात २१ आरोपींविरोधात पुणे गुन्हे शाखेने १७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, ३९ साक्षीदार तपासले गेले आहेत. आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली असून, उर्वरित प्रक्रिया पुढील सुनावणीत पूर्ण होणार आहे.

वाहनांवरील थकीत दंड न भरल्यास लायसन्स रद्द होणार

पुणे वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार वाहनांवरील दंड ३० दिवसांच्या आत जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे.

'गोकुळ' निवडणुकीसाठी ९ मार्चपासून ठराव प्रक्रिया सुरू होणार

कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ठराव संकलन प्रक्रिया ९ मार्चपासून सुरू होणार असून, तालुकानिहाय संस्थांची यादी २ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी दिले आहेत.

PM Modi Israel Visit : भारत आता आणि भविष्यातही इस्रायलबरोबर खंबीरपणे उभा - PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इस्रायल दौऱ्यावर आहेत.मोदींनी इस्रायलच्या संसदेला संबोधित करत विविध महत्वाच्या विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भारत आता आणि भविष्यातही इस्रायलबरोबर खंबीरपणे उभा असल्याचं वक्तव्य केलं.

एसटीच्या ताफ्यातील शिवशाही बस बंद होणार

 माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या शिवशाही बसेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या ४५३ बसचे रूपांतर निमआराम आणि साध्या वाहनांमध्ये करण्यात येणार आहेत.

अजितदादांच्या अपघाताची SIT चौकशीच्या मागणीसाठी हाय कोर्टात जनहित याचिका दाखल

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची एसआयटी मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी बुधवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT