राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'सुनेत्रा पवार यांच्याबाबत जो निर्णय घेतला गेला त्यात आमच्या पक्षाचा सहभाग नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते नेत्यांनी मला माहिती दिली. कागदपत्रांसह ते नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी एक तारीख दिली. त्यावर माझा कुठलाही आक्षेप नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ते आम्ही मान्य केले. तो निर्णय हा त्यांच्या पक्षाचा होता'.
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी सरकार 1 मार्चपासून सिम बाइंडिंगचा नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या नियमानुसार WhatsApp, Telegram आणि Signal सारखी अॅप्स थेट मोबाईल सिमशी जोडली जातील. जर मोबाईलमधून सिम काढले तर ही अॅप्स तात्काळ बंद पडतील. वाय-फाय किंवा अन्य नेटवर्कद्वारेही सिमशिवाय ही अॅप्स वापरता येणार नाहीत.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता असते. मागील काही महिन्यांपासून प्रामुख्याने 19 किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या महिन्यात कंपन्यांनी सुमारे 49 रुपयांनी दरवाढ केली होती. मार्चमध्येही दरात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र सध्या स्थिर आहेत.
जळगाव जिल्ह्यातील ई-केवायसीच्या त्रुटीमुळे अनेक लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने संतप्त लाडक्या बहिणींनी थेट महिला व बाल विकास कार्यालयात धडक दिली. मात्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलीही उत्तर न देता लाडक्या बहिणींना बाहेर काढून कार्यालयालाच कुलूप लावल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे महिला व बाल विकास कार्यालयाबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
बदलापूर स्त्री बीज तस्करीचे रॅकेटचे धागेदोरे नाशिकपर्यंत असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. नाशिकच्या मालती आयव्हीएफ सेंटरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा घातला आहे. एकाच महिलेने अनेकवेळा स्त्री बीज विक्री झाल्याचं समोर आलं आहे. स्त्री बीज तस्करी प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली. या पाचही जणांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वतःची ओळख लपवून स्त्रीबीजांची तस्करी केल्याचं समोर आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय मशीन मागील एक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, हे मशीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडले आहे.कोट्यवधी रुपये खर्चून बसविण्यात आलेले एमआरआय मशीन उद्घाटनाअभावी सुरूच झालेले नाही. लवकरात लवकर एमआरआय सेवा सुरू करण्याची मागणी केल्या जात आहे.
आगामी शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सीबीएसई बोर्डासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येणार आहे. ज्यामध्ये या तीन भाषांपैकी 2 भाषा भारतीय असणार आहेत तर, इंग्रजीचा परदेशी भाषांच्या गटात समावेश केला जाणार आहे. म्हणजेच इंग्रजी ही भाषा यापुढे अनिवार्य मानली जाणार नाही. ती निवडक भाषांपैकी एक मानली जाईल. विद्यार्थ्यांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन यासारख्या परदेशी भाषांमधून एक भाषा निवडावी लागणार आहे.
'रोहित पवार यांना त्यांचे काका, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी संशय आहे. त्यामुळे ते गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी करत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील अजितदादांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशीसाठी गुन्हा दाखल करण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणला पाहिजे,' असे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
'डीजीसीए-व्हीएसआर'च्या हातमिळवणीतून अजितदादांचा मृत्यू झाला, असा खळबळजनक दावा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. या यंत्रणेची स्वतंत्र चौकशी झाल्यास सर्व भ्रष्टाचार बाहेर येईल. 'व्हीएसआर' हा एक क्रमांकाचा आरोप आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
गडचिरोली भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेले आणि नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून दीड महिन्यापूर्वीच पदभार घेणारे मुक्तेश्वर काटवे यांचा शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. कारगिल चौक परिसरात डुक्कर आडवे आल्याने त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन ते रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.
भाजपचे गडचिरोली नगरपालिकेतील स्वच्छता आणि आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे (56) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला मोकाट डुक्कराने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचे निधन झाले.
राज्यसभेसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहेय. दरम्यान 'राज्यसभेसाठी काँग्रेसमधून 4-5 जण इच्छूक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, इच्छुक असणे म्हणजे उमेदवार नाही. इच्छुकांच्या नावाला पक्षश्रेष्ठींना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर उमेदवारी निश्चित होते.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ अजय तावरेंना जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला आहे.पोर्शे कार अपघात प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) गैरव्यवहार प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्विकारला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ७० हून अधिक जणांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात कोणताही फौजदारी खटला तयार होत नसल्याचे विशेष न्यायालयाचे न्या. महेश जाधव यांनी शुक्रवारी अहवाल स्वीकारताना स्पष्ट केले.
लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड 16 मार्चला होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकत काँग्रेस झेडपीत सर्वात मोठा पक्ष ठरला. तर 18 जागांसह भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 सदस्य निवडून आले आहेत. राज्यात भाजपा-राष्ट्रवादीची युती असल्यामुळे जिल्हा परिषदेत या दोन पक्षांची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. तर, राष्ट्रवादीच्या पाठींब्याने भाजपचा अध्यक्ष होणार आहे.
भिवंडी महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली. त्यामुळे बंडखोर नारायण चौधरी हे काँग्रेसच्या मदतीने महापौर झाले आहेत तर काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सहा बंडखोर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.