Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 5 ऑगस्टला; जामीन अर्जावर निर्णय पुढे ढकलला

Marathi Breaking Live Headlines Updates: बांकीपूर, दतिया पोटनिवडणुकीचा निकाल आज, अभिजित दीपके पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार, विदर्भातील 11 जिल्ह्यात ओबीसींचा एल्गार यासह राज्य आणि देशातील राजकीय घडामोडींचे महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Roshan More

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 5 ऑगस्टला; जामीन अर्जावर निर्णय पुढे ढकलला

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी महेश केदार यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. जामीन अर्जावर सविस्तर युक्तिवाद मांडण्यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितला. त्यानुसार न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.

नाशिकच्या खड्ड्यांवर काँग्रेस आक्रमक; महापालिकेसमोर जोरदार आंदोलन

नाशिक शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी "कर पूर्ण भरतो, मग खड्डे मोफत का?" अशा आशयाचे फलक झळकवत प्रशासनाच्या कारभारावर टीका करण्यात आली. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.

Thane News : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे TDRF जवानाचा अपघाती मृत्यू; भिवंडी इमारत दुर्घटनेत जिवाची बाजी लावून केले होते मदतकार्य

TDRF जवानाचा जीव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी घेतला आहे. विकास लहू गोरे, असे मयत जवानाचे नाव असून नुकतीच भिवंडी येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत, त्यांनी जिवाजी बाजी लावून मदत कार्य केले होते. शहापूर तालुक्यातील बामणे गावातील विकास लहू गोरे हा जवान सकाळी आपल्या घरातून कामावर जाण्यासाठी बुलेटने निघाला असता शहापूर शहरातील भांरगी नदीच्या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यात बुलेटचे पुढील चाक अडकल्याने अपघात झाला. या अपघातात विकास मोरे बाजूला असलेल्या संरक्षण कठ्यावर आपटले. गंभीर जखमी झालेले विकास मोरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात भाजपचे माजी खासदाराची निर्दोष मुक्तता

महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मी म्हणालो होतो, मी दोषी असेल, तर मला फासावर लटकावा, या विधानाची आठवण करून देत आजचा दिवस आनंदाचा आहे, अशी प्रतिक्रिया ब्रिज भूषण शरण सिंह यांनी दिली.

Ahilayanagar News : सततच्या पावसामुळे अकोले येथे अंगावर भिंत कोसळून आठ महिन्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात मुसळधार पाऊस आणि सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक कच्ची तसेच दगडी घरे धोकादायक बनली आहेत. अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून, आईच्या कुशीत झोपलेल्या आठ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रतनवाडी परीसरातील अशोक झडे यांची आठ महिन्याची मुलगी सोनाली हिचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. तर आई अमृता झडे जखमी झाली आहे. अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून झालेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

MSRTC News : आषाढी वारीत एसटी महामंडळाला 41 कोटी 18 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न

आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे 5500 बसेसच्या माध्यमातून 9 लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित प्रवास घडविला. विशेष म्हणजे, यात्रेच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला 41 कोटी 18 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे 5 कोटी 30 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

Amravati : राणा दाम्पत्यावर कुरघोडी; अमरावती भाजप दहिहंडी साजरी करणार असल्याची खासदार बोंडे यांची माहिती

दरवर्षी गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राणा दाम्पत्याकडून भव्य दहीहंडीचे आयोजन करून तरुणाईला आकर्षित करण्याचा मोठा प्रयत्न केला जातो. मात्र यावर्षी भाजप स्वतः अमरावतीत दहीहंडी साजरी करणार असल्याची माहिती खासदार अनिल बोंडे यांनी दिली. दहीहंडी कुठे आणि कशी घ्यायची हे महापौर आणि आमदार प्रवीण पोटे यांनी ठरवावे, असे निर्देश खासदार बोंडे यांनी दिले आहे.

Mahayuti Politics : रायगड अन् नाशिक पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतली; चंद्रशेखर बावनकुळे

रायगडचा पालकमंत्री कुणाला करायचं हा सर्वस्वी अधिकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आहे. हे तिन्ही नेते एकत्र बसून याबाबत लवकर निर्णय घेतील. रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल. तसेच नाशिक पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची मागणी करणे योग्य आहे. पण सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतात. सर्व पक्षांना समन्वयातून निर्णय घ्यावा लागतो, असे भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Highway : मुंबई-आग्रा महामार्गावर खड्ड्यामुळे होत आहेत अपघात

महामार्ग सर्वत्रच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव ते झोडगे दरम्यान असेच मोठे खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने अपघात होत आहेत. आणि त्यात अनेक जण जखमी होत आहेत. नॅशनल हायवे प्रशासनाने तातडीने रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.

Dhananjay Munde : अनेक वक्तव्याने गाजत असलेले धनंजय मुंडे यांचे माजलगावात आणखी एक मोठे विधान

बीडच्या माजलगावात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना सध्याचे राजकारण हे जातीपातीचे, धर्माचे सुरू असून, अशा गलिच्छ राजकारणात माझ्यासारख्याने राहावं की न राहावं, असं मोठं वक्तव्य केले आहे. आज जरी जातीपातीत वाद असले तरी आपल्याकडे मात्र महापुरुषांचे विचार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी मी पहिल्यांदा केली, असेही धनंजय जाधव यांनी सांगितले.

पुणे पोलिस आयुक्तांसह तब्बल 12 जणांना मानवअधिकार आयोगाची नोटीस

गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या आरोपीची भररस्त्यात धिंड काढणे, त्याला मारहाण करून उठाबशा काढायला लावणे आणि नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडल्याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. मानवाधिकार आयोगाने या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम, शिवाजी विभुते, रविकांत नंदनवार, महेश नलावडे या उच्च अधिकाऱ्यांसह अमोल गायकवाड, अमोल वायाळ, भीमराव कांबळे, दत्तात्रय शिंदे, कादिर शेख आणि सूरज अंबासे या कर्मचाऱ्यांना प्रतिवादी केले असून नोटीस जारी केली आहे.

महाराष्ट्रात धर्मांतराविरोधात कायदा लागू, राष्ट्रपतींची मंजुरी

महाराष्ट्र विधानसभेने पास केलेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा’ विधेयकाला राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी मंजुरी दिली आहे. बेकायदा आणि सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्याच्या हेतूने हा कायदा करण्यात आला आहे. या कायद्यानुसार बेकायदा धर्मांतराद्वारे झालेल्या विवाहातून दाम्पत्याच्या अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा जो धर्म होता, तोच धर्म लागू होणार आहे.

पुणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा मिळावा - महापौर मंजुषा नागपुरे

पुणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा मिळावा, अशी मागणी महापौर मंजुषा नागपुरे यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन अतिरिक्त २५ टीएमसी पाणीकोटा मंजूर करावा, जेणेकरून पुढील अनेक दशकांसाठी पुणेकरांची पाणी सुरक्षितता सुनिश्चित होईल, महापौर यांनी मागणी केला.

पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण भरलं

गेल्या काही दिवसापासून पुण्याच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने, भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण 100 टक्के भरले आहे. धरण 100 टक्के भरल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात सुरुवात झाली. सध्या या 45 स्वयंचलित दरवाजांमधून 3 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल करण्यात येणार..विसर्ग वाढवल्यानं नदीकाठच्या गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा दे्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटाला धक्का; पदाधिकाऱ्याचा भाजपात प्रवेश

कल्याण-डोंबिवलीतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्चित खडकुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. पक्षात पद देण्यास विलंब करण्यात आला तसेच एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने बैठकीतून हाकलून लावल्यामुळे नाराज होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, भाजपकडूनही “आमची कासवाची चाल आहे, पण विजय आमचाच होणार,” असे म्हणत शिंदे गटाला प्रत्युत्तर देण्यात आले.

रेशीमबागेतून तयार झालेले, पाताळयंत्री स्वभावाचे’; फडणवीसांवर सपकाळांची बोचरी टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकरी कामगार पक्ष हा काँग्रेसचा मैत्री पक्ष असल्याचे सांगताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. महायुतीत ‘टोळी युद्ध’ सुरू असून पक्ष फोडून मित्रपक्षांना मजबूत करण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.रेशीमबागेतून तयार झालेले, पाताळयंत्री स्वभावाचे’; फडणवीसांवर सपकाळांनी बोचरी टीका केली.

बांकीपूर, दतिया पोटनिवडणुकीचा निकाल आज, भाजपची प्रतिष्ठा पणाला

बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. येथे प्रशांत किशोर भाजपच्या विरोधात मैदानात होते. तर मध्य प्रदेशच्या दायिता मतदारसंघात देखील पोटनिवडणूक झाली. येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. या निवडणुकीमुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT