नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची बुधवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगर आयुक्त पदावर बदली झाली आहे.
त्यामुळे नागपूर महानगर पालिकेच्या रिक्त झालेल्या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
अमेरीका-इस्राईल आणि इरान यांच्यात युध्द सुरू झाल्यापासुन परदेशातील भारतीयांचे मायदेशी परतण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
दुबईमधून आत्तापर्यंत पुण्यातील 128 नागरिक सुखरूप परतले..
आखाती युद्धाची झळ आता हळदीला.. व्यापारी आणि शेतकऱ्यांना फटका. तर हळदीच्या दरातही घसरण.
राष्ट्रवादीच्या २० पेक्षा अधिक आमदारांनी देवगिरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. त्यांनी डीजीसीएच्या प्राथमिक अहवालावर शंका उपस्थित करत सीबीआय चौकशीची मागणी अद्यापपर्यंत का पूर्ण केली जात नाही, असा सवालही उपस्थित केला आहे. यासंदर्भात अजित पवारांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी डीजीसीएच्या प्राथमिक तपास अहवालात अनेक त्रुटी आहेत. त्याबाबत कोणीही समाधानी नाही. दादांच्या अपघातप्रकरणी ज्या ज्या भावना व्यक्त होत आहेत, त्याच्यासहीत परिपूर्ण तपास व्हावा आणि तो तपास लवकरात लवकर जनतेसमोर यावा, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पार्थ पवार यांनी ‘अजितदादांना खूप मिस करत आहे. आज दादा असते खूप खूष असते, अशी मोजकी प्रतिक्रिया दिली आहे.
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनाही आरोपी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांनी केली आहे. तसेच, मुंडे यांनी परळीतील दहा लोकांनाही आतापर्यंत संपवलं आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
आखाती युद्धामुळे अनेक शेतीमालाला फटका बसला आहे. या युद्धाचा जबर फटका हळदीला बसला आहे. सांगलीतील हळदीला गेल्या आठवड्यात प्रतिक्विंटल १४,५०० रुपयांपासून २४००० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. मात्र, युद्धामुळे या बाजारभावात एक हजार रुपये ते १२०० रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईतील व्यापाऱ्यांनी सांगलीतील शेतकऱ्यांना हळद परत घेऊन जा, असा निरोप दिला जात असल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांंमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महाराष्ट्रातील जनतेने हक्काचे हिंदुत्ववादी सरकार निवडलं आहे. त्या सरकारने धर्मांतरविरोधी कायदा कॅबिनेट बैठकीत पास झाला आहे. धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या अंतर्गत लवकरच त्याचा जीआर निघेल. मेहनतीमुळे हा कायदा लागू झाला आहे, असे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव इंदापूर शहराजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या 2 किमी पर्यंत रांगा लागल्या आहेत. होळी सणानिमित्त मुंबई वरून गावी आलेल्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरु आहे. माणगाव पासून ढालघर फाटा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान महापालिका पथकाला विरोध केल्याने MIMच्या दहा नगरसेवकांचं नगरसेवक पद धोक्यात आलंय. ज्या नगरसेवकांनी अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अतिक्रमण हटाव पथकाला विरोध केला, त्यांचं नगरसेवकपद रद्द करावं अशी शिफारस महानगरपालिका आयुक्त करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आता आयुक्त विरुद्ध एमआयएम नगरसेवक असा नवा संघर्ष सुरू झालाय. नगरसेवकांनी हातगाड्या उचलण्याच्या कारवाईला विरोध केलाय.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन संपणार असल्याची अफवा पसरल्यानं नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालीये. बुलढाणा जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याय.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलेय.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विधानसभेत सुनेत्रा पवार, पार्थ पवार एकत्र विधानसभेत दाखल झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
बीडमधून बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव परीक्षा केंद्रावरती थेट हिंदीच्या पेपरला झेरॉक्स कॉपी पुरविण्यात आली होती. याची बातमी दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. झेरॉक्सच्या माध्यमातून कॉपी पुरवण्याचा व्हिडिओ समोर आला होता. तोच व्हिडिओ साम टीव्हीने दाखवला त्यानंतर थेट आता संबंधित जातेगाव केंद्रावरील केंद्र संचालक शिक्षकांवर कार्यवाही होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील सोळा सदस्यांच्या नावांवर आज शिक्कामोर्तब झाले. यासाठी महानगरपालिकेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित पक्षाच्या गटनेत्यांनी दिलेल्या नावांची घोषणा महापौरांनी केली. यावेळी स्थायी समिती सदस्यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सात, भारतीय जनता पक्षाचे सहा, शिवसेना ठाकरे पक्षाचे दोन व काँग्रेसचा मित्रपक्ष जनविकास सेनेचा एक असे एकूण सोळा सदस्यांची घोषणा करण्यात आली. मात्र काँग्रेसच्या सदस्यांमध्ये सर्व नगरसेवक हे वडेट्टीवार गटाचे आहेत. त्यामुळे खासदार धानोरकर यांना मोठा धक्का बसला.
बीड जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गेवराई परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकींचा तपास करताना पोलिसांनी नेकनूर परिसरातील एका गोडाऊनवर धाड टाकली. या ठिकाणी चोरीच्या दुचाकींचे स्पेअर पार्ट बदलून त्या मॉडीफाय करून बाजारात विक्री केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी कारवाई करत दोन आयशर टेम्पो भरून 17 दुचाकी आणि साहित्य असा २५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
नाशिकच्या येवला शहरात आज येवला तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे टिमकी वाजवत प्रतिकात्मक विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव मिळावा,आज पर्यंत विक्री झालेल्या कांद्याला १५०० रुपये हमी भाव द्यावा, लोड शेडिंग बंद करावे, हमी भावाने खरेदी झालेल्या मका पिक्याची रक्कम तत्काळ जमा करावी, केंद्र सरकारची निर्यात धोरणाची भूमिका शेतकरी हिताची असावी,शेती साठी २४ तास वीज उपलब्ध व्हावी अशा विविध मागण्यासाठी कॉंग्रेस तर्फे येवला तहसिल कार्यालया परिसरात प्रतिकात्मक टिमकी बजाव आंदोलन करण्यात आले.
कल्याण गौरीपाडा गुरूआत्मन सोसायटीमध्ये उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी राडा घातल्याचे समोर आले आहे. येथील घरात घुसून तोडफोड, शिवीगाळ करत वॉचमनला देखील मारहाण करण्यात आली आहे. सुरज पातकर असे पदाधिकाऱ्याचे नाव असून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
इराण आणि अमेरिका युद्धामुळे भारतात पेट्रोल डिझेलचा तुटवडा झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून अनेक पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील अशा अफवांमुळे वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र पेट्रोल कंपन्यांकडे तीन महिने पुरेल इतका मुबलक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पंपांवरती गर्दी करू नये असे आवाहन अहिल्यानगर पेट्रोल डिलर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी केलं आहे.
वतमाळच्या झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथील एका वाईन बारमध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बारमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला त्यानंतर त्याचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या मारहाणी मागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने ई-चलन प्रणालीतील त्रुटी आणि वाढत्या आर्थिक दबावाच्या निषेधार्थ आजपासून राज्यभरात भव्य ‘जनआंदोलन’ सुरू केले आहे. त्यामुळं मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन पुकारण्यात येणार असून यासाठी ट्रक, टेम्पो, खासगी बसेस आणि टॅक्सींसह सुमारे १ लाखांहून अधिक वाहने एकत्र येण्याची शक्यता आहे.
बिहारमधील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार केंद्रात जाणार असल्याचे आता निश्चित आहे. नीतीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यसभेवर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नीतीश कुमार केंद्रात जाणार असल्याने बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद बदलणार आहे. बिहारच्या मुख्यमंत्रिपदी भाजप की जेडीयूचा नेता बसणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी निषेध आंदोलन करण्यात येणार आले. कांदा व दूध दरवाढीबाबत तात्काळ निर्णय घेऊन विधानसभेत हमीभाव जाहीर करावा,तसेच महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना न्याय द्यावा,या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये अंतर्गत चुरस सुरू असून जिल्हा परिषदेवर पहिला अध्यक्ष कुणाचा होणार यावरून चढाओढ सुरू आहे. त्या संदर्भात आज राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्वच नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देखील नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे नाव घोषित करणार आहेत. त्याबाबतचा निर्णय कोल्हापुरातील सर्वच महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी आजच्या बैठकीत घेतला.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील काही उमेदवारांनी ओबीसी आरक्षित जागांवर ओबीसी असल्याचा खोटा दावा करून निवडणूक लढून जिंकले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बहुतांश उमेदवार हे मराठा समाजातील असून ओबीसी असल्याचा दावा करत निवडून आल्याचा गंभीर आरोप ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापौर रवी लांडगे यांच्यासह 20 नगरसेवकांची जात पडताळणीची सुनावणी ६ मार्च २०२६ रोजी सुरू होत आहे.
ठाण्यातील बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी व कॅसिनो बंद करा अशी मागणी करणारं पत्र भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलं आहे.
गुन्ह्याच्या शिक्षेतून जामीनावर सुटलेल्या गुंडाला पोलिसांसमोरच ठोकण्याचा प्रकार इचलकरंजीत रात्री उशिरा घडला. इचलकरंजी शहरात गोळीबाराची ही पहिलीच घटना आहे. अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातून पोलिसांसोबत बाहेर पडलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर भररस्त्यात रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात ओंकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक, सांगलीवाडी, जि. सांगली) असे जखमी झाला असून त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. संबंधित जखमी आणि आरोपीचे काही दिवसापूर्वी प्रेम प्रकरणातून वाद झाला होता. त्यातून ओंकार कांबळे याला अटक करण्यात आली होती.
पुण्यात आज रिक्षा संघटना आणि प्रवासी मालवाहतूक संघटनेच्या आंदोलनामुळे रिक्षा वाहतूक दोन तास बंद असणार आहे. ई चलनाविरुद्ध पुण्यात आज रिक्षा संघटना आणि मालवाहतूकदार संयुक्त कृती समितीकडून निदर्शने केली जाणार आहेत. या आंदोलना दरम्यान दोन तास रिक्षा आणि महार प्रवासी मालवाहतूक बंद असणार आहे.
दुबई, अबू धाबी मधून 111 प्रवासी पुण्यात परतल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. 198 नागरिकांपैकी 111 नागरिकांना पुण्यात सुखरूप आणण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.