पुणे जिल्ह्यात वाढलेल्या तीव्र उष्णतेचा परिणाम आता धरणसाठ्यावर दिसू लागला आहे. पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट होत असल्याने आगामी काळात पुण्यावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या चार धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये २६.६१ टक्के म्हणजेच ७.७६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
कांद्याचे दर घसरल्याने केंद्राचे पथक कालपासून नाशिक दौऱ्यावर आले आहे. हे पथक विविध बाजार समित्या आणि नाफेड खरेदी केंद्रांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यलयात केंद्रीय पथक आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक होणार आहे.
काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सतेज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर कोल्हापूर शहराध्यक्ष म्हणून प्रवीण केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस निवड समितीने ही नावे जाहीर केली आहेत.
ठाणे गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील भाजी मार्केटला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांसह 2 ते 3 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
'नीट' पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड झाल्यापासून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी मोटेगावकर हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत, जिथे स्कॅम तिथे काँग्रेस असा थेट आरोप केला आहे. शिवाय मोटेगावकरने लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेत त्या पक्षाचा प्रचार केला आहे. त्यामुळे तो कोणाचा आहे हे स्पष्ट असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे याला पुण्यातून अटक केली आहे. शिरुरे याने शिवराज मोटेगावकरकडून स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर परिसरातील गोदावरी नदीपात्रातील प्रस्तावित वाळूपट्टा लिलावाविरोधात आता ग्रामस्थांनी थेट आरपारची लढाई छेडली आहे. वाळू उपशाला विरोध करणाऱ्या महिलांवर कथित दगडफेक झाल्यानंतर रामपूर आणि नाऊर येथे झालेल्या विशेष ग्रामसभा अक्षरशः वादळी ठरल्या. संतप्त महिलांनी ‘रणरागिणी’चा अवतार धारण करत, “वाळूचा रस्ता तर होऊ देणार नाहीच, पण नदीपात्रातील वाळूचा एक खडाही उचलू देणार नाही,” असा इशारा प्रशासनाला दिला.
नसरापूर येथील तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या प्रकरणाची सुनावणी आजपासून पुण्यातील विशेष न्यायालयात होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या खटल्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले असून, आजपासून नियमित आणि जलदगतीने सुनावणी सुरू होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.